बेलबागीं नांदतो लक्षमीकांत शेषशायी ।
दर्शन घेतां मुक्ती, यांत कांहीं संशय नाहीं ॥धृ०॥
स्तव करितां भावार्थें प्राणी तो निर्भय झाला ।
आनंदमय चित्तांत, नाहीं भय काळत्रयीं त्याला ।
निधान वैकुंठीचें, पहा त्रैलोक्यपाळकाला ।
पायीं मुख लावितां गोड मुक्तीचा प्याला ।
लोटांगण घालित भेटूं या जगश्रीमंताला ।
तथा न धरितां सत्य अढळपद येते हाताला ।
धरावे एकनिष्ठेनें पाय ।
मिळे मग पायापाशीं ठाय ।
इच्छिलें देइल संशय काय ।
पाहातां कोण अधिक याशिवाय ।
पातक जन्मोजन्मीं जाय ।
करितसे शत्रूचा निरउपाय ।
सौम्यरूपी देवा, लय लावा विष्णूचे पाईं ॥१॥
स्थळ निर्मळ, बागांत पुष्प तरुवर सुवास येती ।
केळी, बकुळी, आवळी, सिताफळी, नारळी हालती ।
तुळसी, वृक्ष भोंवते द्राक्षीमंडप संगीन जाती ।
समोर पटांगण, कारंजें, गरूडवाहनमूर्ती ।
शांताकृत हें ध्यान लक्ष्मीनारायण ध्याती ।
धन्यकळा निर्मिता दोहीकडे शिवसुत गणपती ।
चिरे उथळी घोटीव साजती ।
महिरपा खांब सरूचे सुती ।
नादघंटा खणखण वाजती ।
विणे, पखवाज, टाळ गाजती ।
परोपरी शृंगार विराजती ।
पाहतां अवघेच नांवाजती ।
नित्य शोभा दिसते जाजती ।
टाहो फोडती मोर अहोदिन शुभचिन्हें गाई ॥२॥
निश्चय धरितां पाईं पडे अभिमान समर्थातें ।
सज्जन प्रीति पाळुन दुष्टवध करि अपल्या हातें ।
जग आधार श्रीपाल्या वाचे जमा अनंतातें (?) ।
व्यर्थ न जाय कदा मग शासन करी कृतांतें ।
अचल चित्त, एकाग्र, न लावा नेत्राचें पातें ।
न्याहाळा सुंदर चतुर्भज रूप अपल्या रूपातें ।
नसावा सद्‌भजनीं अनमान ।
कीर्तनाकडे लावावे कान ।
करितां हरिनामाचें स्नान ।
पराजय शत्रू रानोरान ।
क्षणिक माया निरसे देहभान ।
जसें लेकरूं धरी आईचें थान ।
करा प्राशन अवघे गुणनिधान ।
होनाजी बाळा म्हणे, ध्यान हें जो अंतरिं ध्याई ।
तो नर जाणा धन्य, देव राहतो त्याचे ठाई ॥३॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel