पति टाकुनि जातो गावा । कुणि तरी राहावा । संचित कर्माचा ठेवा । काय तरी देवा ॥धृ०॥

सण दिपवाळीचा आला, आनंद झाला । इष्काचा डोम पाझरला, सांगते त्याला । पार नाहीं माझ्या दु:खाला, डोंगर कोसळला । चिकासी हुरडा आला, भ्रांत कशाला । कांहीं केलें कमी तुम्हांला धनद्रव्याला । मग प्रवास नको अपल्याला, घोर जिवाला । तुम्ही तिकडे, मी इकडे . कुणास करूं धावा ? ॥१॥

तुम्ही सुखसमुद्र, मी कांता कोमळ तुमची । तुम्ही नेत्र, मी बाहुली, धुळ चरणाची । तुम्ही गुलाब, मी शेवंती, हवा बागाची । तुम्ही चंद्र, मी चांदणी सत्यवचनाची । तुम्ही जंबिया, मी तलवार धार पट्टयाची । खुणमुद्रा ठसली ही अक्षर ब्रह्माची । पोटच्या लेकरावाणी लोभ ठिवावा ॥२॥

जायचें नाव निघताच कपाळ उठते । उभें वारें सुटतें तिळ तिळ काळिज तुटतें । हरणीला गवसलें फाशीं शरीर कंठते । तशी गत मज झाली, उभें वारें मज सुटतें । मुखचंद्र पहा ना, इष्कामधिं लटपटते । ही मूठ भरमाची जनलोकामधिं फुटते । छातिसी छाती मिळूं द्या, बेत ठरवावा ॥३॥

आली ममता अंत:करणीं सखीला धरुनी । मिठी घालुन पतिच्या चरणीं करी मनधरणी । पाहिलें उभयतां सखिला नेत्र भरुनी । जायाची कल्पना हरुनी मन थीर करुनी । नको करूं चेडे चेटुक करुनी भवते फिरुनी । रामा लिंबाची (?) धरणी विठ्ठल स्मरणीं । नित प्रसंगांत गुण घ्यावा हरि अठवा ॥४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel