त्यांना अभिमान नाहीं. सेवाग्रामला गेले तेव्हां म्हणाले, “मी गव्हर्नर जनरल आहे, या अर्थ काय ? याचा अर्थ इतकाचकीं कोणाहि हिंदी माणसाला आता ग.  जनरल करु शकाल. माझ्यासमोर ही मुलें आहेत. यांच्यातीलहि कोणी उद्यां होईल.”  गव्हर्नर जनरल असोत किंवा कोठें आश्रमांत असोत. त्यांचें जीवन एकरुपच आहे.

मागें मद्रासला गेले तेव्हां म्हणाले, “आपल्या प्रांतांतला हिंदुस्थानांतील सर्वश्रेष्ठ अधिकारी बनला या दृष्टीनें माझ्याकडे नका बघूं. एका मद्राश्याला मान मिळाला ही दृष्टी नकों.”

ते आज परिपक्व झाले आहेत. ‘गोष्टी सांगेन युक्तिच्या चार’ हे आता त्यांचें काम. त्यांच्याजवळ द्वेषमत्सर जणूं उरले नाहींत असें वाटतें. गोड मुरांबा व्हावा तसे ते झाले आहेत. जपून चला असें सर्वांना सांगतात. देशाला मोठे करा सांगतात. “स्वातंत्र्य आले आहे त्याची जाणीवहि तुम्हांला नाही. तुम्ही मुक्त आहांत. स्वातंत्र्याचे फळ मिळाले आहे. वायां नका दवडूं. संयमी बनाल तर स्वर्ग निर्माण कराल” असें मागें थोर कवि सुब्रम्हण्यम् भारती यांच्या स्मारकाच्या उद्धाटन प्रसंगी ते म्हणले. सेवाग्रामला म्हणाले, “मृताची इच्छा राहिली तर त्याच्या आत्म्यास शांती नसते. गांधीजींना व्यक्तिगत इच्छा नव्हती. या देशावर त्यांचें फार प्रेम. येथील प्रत्येक व्यक्ति उद्योगी नि सच्छील होईपर्यंत महात्माजींच्या आत्म्याला कोठली शांति?”

मागें एकदां म्हणालें, महात्माजी ही देवानें भारताला दिलेली थोर देणगी आहे. तुम्हां आम्हाला मोठया भाग्यानें मिळाली. परंतु त्या देणगीला आपण पात्र आहोत कीं नाहीं. हरि जाणें.

राजाजींची मुलगी गांधीजींच्या देवदासांना दिलेली. ते गांधीजींचे आप्त झाले, परंतु हृदयानें आधीच एकरुप झालेले होते. भारतीय तरुणांनी अशा या थोर सेवकापासून अपार काम करण्याची, आपल्या बुध्दीस पटेल त्याला निर्भयपणें चिकटून राहण्याची, साधेपणानें जगण्याची स्फूर्ति घ्यावी. राजाजी भारताचीं वाढती प्रभा बघायला भरपूर जगोत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचें अभिनंदन, त्यांना प्रणाम.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel