फार दिवसांपूर्वीची गोष्ट. त्या काळात मोठमोठे यज्ञ होत असत. बाराबारा वर्षेही चालत. यज्ञप्रसंग म्हणजे उत्सवाचे. जणू जत्राच तेथे भरे. हजारो लोक यायचे-जायचे. परस्परांस भेटायचे. तेथे बसलेल्या दुकानांतून माल न्यायचे. तेथे होणाऱ्या कथाकीर्तनांतून, पुराणप्रवचनांतून धर्म शिकायचे. तेथे खेळ असत, कुस्त्या असत. नवीन नवीन नाटके व्हायची व चांगली ठरतील त्यांना बक्षिसे मिळावयाची. अशी त्या काळातील गंमत. एकदा देवांच्या मनात आले की, कधी झाला नाही एवढा मोठा यज्ञ करावयाचा. त्यांनी दानवांना विचारलं की, "याल का यज्ञाला?" दानव हो म्हणाले. मानवांनाही निरोप आला. मानवांनीही जायचे ठरविले. देव, दानव, मानव सारे एकत्र जमणार? कधी झाली नव्हती अशी गोष्ट होणार होती.

देवांनी हजारो विमाने या सर्वांना आणण्यासाठी पाठवली. सरसर विमाने येत होती; उंच जात होती. त्या विमानांचा आवाज नसे होत. ती शान्त-दान्त विमाने होती. सारी मंडळी जिवंतपणी स्वर्गात चालली. ढगांतून उंच चालली. त्या विमानांतून हवा मिळण्याची व्यवस्था होती. मानवांना हवेशिवाय राहण्याची सवय नाही. देवांनी हवेशिवाय राहायचा कधीच म्हणे शोध लावला होता. स्वर्गात आनंदीआनंद होता. नक्षत्रांची तोरणे होती. कल्पवृक्षांच्या माळा ठायी ठायी होत्या. देव स्वागताला उभे होते. देव-दानव, मानव परस्परांना भेटत होते. आणि महान यज्ञ झाला. स्वर्गातील गाईंचे सुंदर तूप अग्निनारायणाला देण्यात येऊ लागले.

"आई, तूप का जाळतात? आपल्याला का देत नाहीत? आपण घरी नेऊ!" एका मुलाने विचारले.

"देवाला द्यायचे. अग्निदेवाला. काहीतरी विचारू नकोस. लोक हसतील!" आई म्हणाली.

"मी कोरडी भाकर खायची नि या देवाला किती तूप! आई, मला न देता तुला खाववेल का गं?"

"बोलू नको."

"सांग नं!"

"अरे, तुला आधी देईन, मग उरले तर मी खाईन!"

"मग देव असा कसा हावरा? आम्हा मुलांना उपाशी ठेवून आपण तुपाशी जेवतो आहे. ते बघ तूप ओतताहेत, बघ!"

"बोलू नको रे, बाळ!"

काही दिवस गेले. यज्ञ चालला होता; परंतु एके दिवशी चमत्कार झाला. सर्वांना आपण फिरत आहोत असे वाटू लागले. हळूहळू सारे नाचू लागले. ते अग्निकुंड नाचू लागले. तूप ओतणारे, मंत्र म्हणणारे नाचू लागले. तुपाची भांडी नाचू लागली. देव, दानव, मानव सारे नाचू लागले. अप्सरा नाचू लागल्या. नंदनवन नाचू लागले. ऐरावत नाचू लागला. कल्पवृक्ष नाचू लागला. दूरवर सारे नाचता नाचता बघू लागले. सारे ब्रम्हांड नाचत आहे असे त्यांना दिसले. समुद्र, नद्या, नाले नाच करिताहेत. हिमालयादी पर्वत नाचत आहेत. कोणाला काही कळेना. प्रथम मौज वाटली; परंतु मागून सारे घाबरले. विश्वकंप होणार की काय? सारे ब्रम्हांड, सारे त्रिभुवन का कोसळणार? कोट्यावधी तारे का एकमेकांवर आपटणार? काय आहे हे सारे?"

"चला, शोध करू!" कोणी म्हणाले.

"सारे दानव, मानव तर येथे. जाऊन कोणाला विचारणार? कोणाला पुसणार?"

"मी जातो. मी नेहमी त्रिभुवनात हिंडणारा, वाऱ्याप्रमाणे जाणारा; प्रभूचे गीत गाणारा नि नाचणारा, मला नाही भय. मला सवय आहे नाचत हिंडायची, गिरक्या घेत जाण्याची." असे नारद म्हणाला.

"नारदा, लौकर ये. आम्ही किती वेळ नाचत राहणार? दोन तास झाले. बसलो तरी गरगर फिरतो. निजलो तरी गरगर फिरतो. वाचव बाबा!" सारे म्हणाले. नारद प्रकाशाच्या वेगाने निघाले. सारे बघत भूतलावर उतरले. क्षणात हिंदुस्थानातही आले. ज्ञानकिरणांच्या प्रकाशात झटकन सारा देश त्यांनी पाहून घेतला. तो त्यांना एक माणूस नाचताना दिसला. ते पटकन त्याच्याजवळ आले. कोण होता तो मनुष्य? तो का वेडा होता? तो एक शेतकरी होता. समोर सुंदर शेत होते. भाताला लोंबी आल्या होत्या. जवळच फुलाचा मळा होता. पलीकडे सुंदर बैल चरत होते. शेतकऱ्याच्या हातात विळा होता. बांधावरचा चारा तो कापीत होता. वाऱ्याची झुळूक येई नि ते शेत डोले. शेतकरी आनंदला. तो तसाच उभा राहीला. शेताकडे बघून नाचू लागला.

 माझं शेत माझं शेत लई लई छान
 शेत माझं शेत आहे माझा प्राण।।
 राबेन येथे खपेन
 काम येथे राम
 राला ना माझ्या मुळी कधी वाण।।
 र्गात गेलेले खाली येतील
 नी शानी ते काय खातील?
 शेत वाचवील त्यांना देउनिया धान्य।। माझं।।

असे गाणे गात तो नाचत होता. जणू त्याची समाधी लागली होती. आणि त्याचे शेत नाचू लागले. झाडे-माडे नाचू लागली. बैल नाचू लागले. टेकड्या नाचू लागल्या. हळूहळू त्याच्या नाचात सारे त्रैलोक्य ओढले गेले. त्याच्या त्या सेवाकर्मात, त्या स्वधर्माच्या आचरणात सर्वांना खेचून घेण्याची शक्ती होती. नारद बुद्धिमान. त्याच्या चटकन सारे लक्षात आले. यज्ञयागांचे धर्म निस्सार आहेत. समाजाच्या सेवेचा कोणता तरी उद्योग मन लावून करीत राहणे म्हणजे खरा धर्म, म्हणजे एकमेकांची झीज भरून काढणारा खरा सहकारी यज्ञधर्म. यज्ञ शब्दाचा हा अर्थ. मी पिकवीन, तुला देईन; तू विणून मला दे. एकमेकांना सारे सांभाळू आणि जीवनाचा सर्व बाजूंनी विकास करून घेऊ. नारदाला त्या शेतकऱ्याच्या नाचात, त्या मंगल कर्मोत्साही नृत्यात सारा धर्म दिसला. त्याने त्या शेतकऱ्याच्या चरणांना वंदन केले. तंबोरा हातात घेऊन तोही नाचू लागला. त्या वीणेच्या तारांचा झंकार ऐकताच शेतकरी हळूहळू भानवर आला. परंतु नारद नाचतच होता-

 काम करा काम करा
 मध्ये राम
 मध्ये काम
 मुखामध्ये नाम।।काम।।

कऱ्याने नारदाचे पाय धरले नि विचारले,

"देवा, कोण आपण?"

"मी तुझा शिष्य."

"असे कसे देवा होईल?"

"तसेच आहे. आपापले काम नीट करीत राहणे म्हणजेच धर्म, हे महान तत्व तू त्रिभूवनाला नकळत शिकवलेस. तू साधा शेतकरी परंतु विश्वाला आपल्याबरोबर तू नाचायला लावलेस, धन्य तू!"

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel