सदाचरणानें व सुनीतीनें वागण्याचा उपदेश

(ओवी)

सूत सांगे शौनकांदिकां । सोमकांत वदे पुत्रांदिकां ।

गोपुरावरी एकांतिका । नेलें पुत्रासी उपदेशा ॥१॥

सोमकांत वदे पुत्रास । अनेक नीतीच्या बोधांस ।

शांत करुनियां चित्तास । हेमकंठ ऐके ता ॥२॥

सुप्रभातीं उठावें । शुद्धस्थानीं बैसावें ।

देवादिकाम स्मरावें । अपराधाच्या क्षमेसी ॥३॥

भूमीची प्रार्थना करणें । गणपतिपंचायतन स्तवणें ।

येणेंपरी प्रातःस्मरणें । नित्यनेमें करावीं ॥४॥

उपास्यदेवता भक्तीपूर्वक । मानसपूजा ध्यानपूर्वक ।

क्षमस्व क्षमस्व विधीपूर्वक । म्हणूनियाम उठावें ॥५॥

प्रातर्विधि नैऋत्य दिशेस । जाऊन करणें अवश्य ।

क्षीरवृंक्षादि कंटक वृक्ष । दंतधावनिं योजावे ॥६॥

काष्ठ आणितां वनस्पतींस । बल ओज तेज यशास ।

बुद्धि, द्रव्य, पश्चांदिकांस । प्रार्थनापूर्वक मागावीं ॥७॥

सीतोदकाचें मुख्य स्थान । संध्यापूजादि औपासन ।

अधिकारपरत्वें करुन । ब्राह्मणासह जेवावें ॥८॥

मग करावें पुराणश्रवण । नंतर करावें तांबूलभक्षण ।

पुढें विश्रांती घेऊन । येणेंपरी वर्तावें ॥९॥

(गीति)

परनिंदा, परपीडा, आत्मस्तुति ही कधीं न यो वदना ।

गुरुद्रोह वेदनिंदा, ऐशीं कर्मे कधीं न यो ध्याना ॥१०॥

परपत्‍नीसेवनादिक, तैसें भक्षण अभक्ष्य वर्जावें ।

असत्य भाषण करणें, ऐशां कर्मांस नित्य वर्जावें ॥११॥

दीन दरिद्री अंधां, अन्न समर्पी तसेंच वस्त्रांस ।

संतांचें पालन हें, भक्तिपुरस्सर करीत जा वत्स ॥१२॥

दुष्टांना दंडावें, अपराध्यांना तसेंच शत्रूला ।

शासन करणें बा हा, राजाचा मुख्य धर्म जो कथिला ॥१३॥

शत्रू आणिक घातक, यांना जाणुन ठेवीं विश्वास ।

ज्ञाते पुरुष जाणुन, विचार घेणेंचि योग्य समयास ॥१४॥

नीतीशास्त्रांमाजी राजाला मुख्य मुख्य षड्‌गुण ।

तैशाच तीन शक्ती, साह्य अशा मुख्य मुख्य साधून ॥१५॥

राजानें राज्याचा, करणें जो कारभार तो भारी ।

त्यामाजी ठेवावें, दाक्षिण्यचि वर्म हेंच स्वीकारीं ॥१६॥

दान करावें ऐसें, अपुली शक्ति असेल त्यापरि हें ।

त्यामध्यें दात्यानें, न करावें न्यून अधिक अंतर हें ॥१७॥

(स्वागता)

हेर हे असति राजकुमारा । नेत्र रुप करिती चहुं-बारा ।

दूत हे असति राजकुमारा । वक्‍त्ररुप करिती श्रुत हेरा ॥१८॥

योग्य दंड करणेंच ही नीती । सोडितांच घडते ही अनीती ।

शासनास भिउनी जन सारे । धर्म आचणिं ते रत सारे ॥१९॥

कोणि जे करिति हे जन स्तौत्य । कोणि मानिति असें जन वंद्य ।

हर्षरोष धरणेंच अयोग्य । वागणें समसमानच योग्य ॥२०॥

सर्वही मसलती करि गुह्य । काम राग असे षड्रिपु साह्य ।

ज्यास हे असति साध्य कुमारा । जिंकितो इतर शत्रुच हेरा ॥२१॥

(गीति)

ज्या ज्या वस्तू असती, उपजीवन चालण्यास त्या योग्य ।

नाश करुं नये त्यांचा, हेंचि असें वागणें तुला योग्य ॥२२॥

देवालय, उद्यानें, चैत्य तशा ज्या अनेक कार्यांस ।

दिधल्या उत्पन्नासी, परतहि घेणें अनिष्ट भूपास ॥२३॥

(दिंडी)

स्त्रियांपाशीं जी गुह्य अशी गोष्ट । नको बोलूं तूं होति सदा कष्ट ।

लहान मोठयाही सेवकांसि वागे । मनोवृत्ती ही वेधती प्रेमभावें ॥२४॥

(गीति)

विद्याधिश मुख्य असे, क्षेमंकर ज्ञानवंत हे तीन ।

असती प्रधान त्यासी, पाचारी भूप त्या त्वरें करुन ॥२५॥

पुत्रास राज्य द्यावें, आयती करणें अशी दिली आज्ञा ।

यास्तव याज्ञिक कर्ते, आणिले ब्राह्मण करावया यज्ञा ॥२६॥

कौटुंबिक आप्त सखे, नगरांतील मुख्य जन सारे ।

आमंत्रुनी तयांना, आणविले त्वरित त्यांस सत्कारें ॥२७॥

गणपतिपूजन करुनी, धार्मिक विधियुक्त हेमकंठास ।

राज्याभिषेक करणें, आज्ञापी नगरवासि लोकांस ॥२८॥

राजा मंत्र्यांसि म्हणे, मत्पुत्रासी तुम्हांस अर्पियलें ।

तुमचा पुत्र म्हणुनियां, पालन करणें तुम्हांकडे दिधलें ॥२९॥

आजवरि तुम्ही सर्वहि, माझ्या आज्ञेस पूज्य मानियलें ।

आतां तसेंच वर्तुनि, मत्पुत्रा पाहिजेच तोषविलें ॥३०॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel