अनीह आत्मा मनसा समीहता हिरण्मयो मत्सख उद्विचष्टे ।

मनः स्वलिङगं परिगृह्य कामान् जुषन्निबद्धो गुणसङगतोऽसौ ॥४५॥

आत्मा चित्स्वरुप परिपूर्ण । निःसंग निर्विकार निर्गुण ।

त्यासी संसारबंधन । सर्वथा जाण घडेना ॥१९॥

जो स्वप्रकाशें प्रकाशघन । निजतेजें विराजमान ।

जो परमात्मा परिपूर्ण । त्यासी क्रियाचरण कदा न घडे ॥६२०॥

विचारितां निजनिवाडें । मनाचें जडत्वचि जोडे ।

त्यासीही संसार न घडे । भवबंध घडे तो ऐका ॥२१॥

नवल मनाचें विंदान । शुद्धीं उपजवी मीपण ।

तेचि वस्तूसी जीवपण । सगुणत्वा जाण स्वयें आणी ॥२२॥

मनःसंकल्पाचें बळ । शुद्धासी करी शबळ ।

लावूनि त्रिगुणांची माळ । भवबंधजाळ स्वयें बांधे ॥२३॥

जेवीं घटामाजील घटजळ । आकळी अलिप्त चंद्रमंडळ ।

तेवीं मनःसंकल्पें केवळ । कीजे शबळ चिदात्मा ॥२४॥

घटींचें हालतां जीवन । चंद्रमा करी कंपायमान ।

तेवीं शुद्धासी जन्ममरण । मनोजन्य सुखदुःखें ॥२५॥

आत्मा स्वप्रकाश चित्स्वरुप । मन जड कल्पनारुप ।

तें मानूनि आपुलें स्वरुप । त्याचें पुण्यपाप स्वयें भोगी ॥२६॥

जीवाचा आप्त आवश्यक । सुहृद सखा परमात्मा एक ।

तो मनाजीवाचा नियामक । द्रष्टा देख साक्षित्वें ॥२७॥

अविद्या प्रतिबिंबे नेटका । जीव जो कां माझा सखा ।

तो मनोभ्रमें भ्रमोनि देखा । भोगी सुखदुःखां मनोजन्य ॥२८॥

मनाची एकात्मता परम । जीवासी पडला थोर भ्रम ।

आपण असतांही निष्कर्म । कर्माकर्म स्वयें भोगी ॥२९॥

सूळीं जीव मनाचा नियंता । तोचि मनाच्या एकात्मता ।

मनाचिया सुखदुःखव्यथा । आपुले माथां नाथिल्या सोशी ॥६३०॥

जेवीं अतिआप्तता प्रधान । रायासी लावी दृढबंधन ।

मग राजा तो होय दीन । तो भोगवी तें आपण सुखदुःख भोगी ॥३१॥

ते दशा झाली जीवासी । मनें संसारी केलें तयासी ।

मग नाना जन्ममरणें सोशी । अहर्निशीं सुखदुःखें ॥३२॥;

त्या मनासी निग्रहो न करितां । जीवाची न चुके व्यथा ।

मनाचेनि छंदें नाचतां । साधनें सर्वथा व्यर्थ होती ॥३३॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel