लाखों आई-बापांना आपल्या मुलांची काळजी घेतां येत नाही.  त्यांच्या जवळ ज्ञानाचा अभाव असतो व द्रव्याचा अभाव असतों लाखों आई-बापांना मुलांची काळजी कशी घ्यावी हें माहीत नसतें.  मुलांना मारहाण होते.  त्यांची आबाळ होते.  आई-बाप अडाणी.  मुलांना कोठून ज्ञान मिळणार?  मी येथील मिलमधील कामगार बंधूच्या मुलाच्या बारशास गेलों.  त्या घरांत अंधार.  लहानसें घर?  त्या बाळाला कोठून मिळणार चांगलें घर?  त्याच्या गरीब आई-बापांनी काय करावे? प्रेमाचा प्रकाश फार तर देतील.  देतील कोठलीं पुस्तकें, कोठली खेळणीं, कोठला आराम? लहान मुलांची समाजांत काळजी घेतली जावी असें वाटत असेल तर समाजरचना बदलली पाहिजे.

ज्या समाजांत सारे आईबाप सुशिक्षित असतील, त्या समाजांत सर्वांना पोटभर खायला, अंगभर ल्यायला, रहावयाला स्वच्छ लहानसें का होईना पण सोयीस्कर घर असेल, असा समाज आपण निर्मिला पाहिजे.  आसन्नप्रसवा मातांस श्रम करावे लागणार नाहींत, त्यांना कारखान्यांत रजा मिळेल, बाहेर भत्ता मिळेल असें केलें पाहिजे.  शास्त्रीय प्रसूतिमोचनाचें ज्ञान असणा-या प्रेमळ दाया ठायीं ठायीं सेवेस वाहिलेल्या पाहिजेत.  आईबाप कामावर गेल्यावर जेथें सर्व मुलांची काळजी घेतली जाईल अशी बालसंगोपनगृहें सर्वत्र पाहिजेत.  तेथें खेळ, फुलें, बुध्दीचा, शरीराचा व हृदयाचा विकास करणा-या नाना वस्तू असतील, तेथें मुलांत मिसळतील, खेळतील असे सहृदय शिक्षक हवेत.  हे सारें कधी होणार?  समाजरचना बदलेल तेव्हा.

मुलांच्या शरीराची काळजी घेतली पाहिजे, मनाची घेतली पाहिजे.  सारे समान, सारे सुखी होऊं दे.  सारी देवाची लेंकरे, अमुक एक जात, अमुक एक धर्म, वाईटच असें नका त्याला शिकवूं.  गारुडी मुलाच्या शरीराला नाना वळणें लावून त्याच्या घडया घालतो त्याप्रमाणें आपणहि मुलांच्या मनांस संकुचित विचारांत अडकवतां.  ही हत्या आहे.  मी कोकणांत नुकताच गेलों होतों.   लहानपणच्या एका मित्राच्याघरी गेलों.  त्या मित्राच्या लहान मुलाला ड्राईंगचा नाद.  बाप कौतुकानें मुलांस म्हणाला, ' यांना दाखव रे कांही काढून.' त्या लहान निष्पाप बाळानें सूर्य काढला, चंद्र काढला.  बाप पाहून म्हणाला, 'हा मुसलमानाचा चंद्र कशाला रे गाढवा? '  त्या मुलाला काय माहींत कीं चंद्र मुसलमानांचा असतो.  ' चांदोबा चांदोबा भागलांस का ' असें म्हणत तो नाचतो.  मी दु:खी झालों व त्या मित्राला म्हणालों, ' अरे, आपल्या बायका सडा घातल्यावर रांगोळीनें चंद्रसूर्य काढतात.  चंद्रसूर्य स्वर्गात नसून माझ्या अंगणांत आहेत.  स्वर्ग माझ्या घरी आणीन, आनन्द मिळवीन.' मित्र हंसला.  आई - बापांनो, लहान मुलांचे महत्त्व वाटत असेल तर त्यांना प्रेम शिकवा.  या हिंदुस्थानांतील सर्व धर्माच्या व सर्व जातींच्या मायबापांनी आपल्या मुलास माणुसकी शिकवावी.  मुलांची मनें द्वेष, मत्सरानें भरूं नयेत, असें हांत जोडून सांगणे आहे.  ती सर्वात मोठी बालसेवा होईल.

आपल्या देशांत स्वावलंबन कमी.  मुलांना निर्भयता व स्वावलंबन यांचे धडे दिले पाहिजेत. त्रिचनापल्ली जेलमध्यें असतांना तेथील आयरिश सुपरिटेंडेंट एक दिवस म्हणाला, ' युरोपांत मुलांना निर्भयतेचे शिक्षण मिळतें. लहान मुलें एकटीं बाहेर जातील.' परन्तु आपल्याकडे म्हणतील, '' एकटा जाऊं नकोस; चुकशील;  अंधार आहे गाडी घोडे येतील.  मुलांना असें पंगू नका बनवूं.  तसेच त्यांच्या गोष्टी त्याला स्वत: करूं दे.  त्याला श्रमाची महतीहि पटवा.  जो श्रमतो, राबतो तो माणूस.  बाकी शेणगोळे.  हा सिध्दांत त्याच्या मनावर बिंबवा.  बालदिन साजरा करणें म्हणजे सर्व मुलांची जेथें काळजी घेणे शक्य होईल असा समाज निर्मिण्याची जबाबदारी अंगावर घेणें.  त्यांची मनें प्रेमळ, स्वाभिमानी  व  निर्भय बनविणें.  त्यांच्यामध्यें ज्ञानाची जिज्ञासा वाढविणें व शरीरश्रमाची आवड उत्पन्न करणें.  शरीरानें, बुध्दीने व हृदयाने त्यांना वाढविणें,  शिक्षक व आईबाप यांचेवर ही जबाबदारी आहे.  सुंदर क्रीडांगणे, सुंदर फुलबागा ठायी ठायीं असाव्यांत.  मुलांना फुलाशेजारी वाढवावें, म्हणजे फुलाप्रमाणे रसमय, पवित्र, निर्मळ, सुगंधी त्यांची जीवनें होतील.''

--वर्ष २, अंक ४०.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel