२० मननीय विचार

' विधायक सेवा म्हणजे सत्याग्रहाचें सामर्थ्य '

-- महात्मा गांधी
काँग्रेस व हैद्राबाद लढा


हैदराबाद संस्थानांत स्टेट काँग्रेस लढा लढवीत होती.  शेकडों काँग्रेस सेवक कारागृहांत गेले होते.  परंतु पुढें तो लढा स्टेट काँग्रेसने थांबविला.  निजामसरकार सुधारणांचा विचार करीत होते. त्या सुधारणा एकदा का बाहेर पडल्या म्हणजे मग पुढचें धोरण काय तें स्टेट काँग्रेस पुन्हा ठरविणार होती.  स्टेट काँग्रेसने सत्याग्रह थांबविला; आर्य समाज व हिन्दुमहासभा यांनी थांबविला नाही.  स्टेट काँग्रेसचा सत्याग्रह व हा दुस-या संस्थांचा सत्याग्रह यांत फरक आहे.  स्टेट काँग्रेसचा सत्याग्रह व्यापक ध्येयासाठी होता.  नागरिक स्वातंत्र्य व इतर राजकीय सुधारणा यांसाठी तो होता.  आर्य समाज व हिंन्दुमहासभा यांचा सत्याग्रह धार्मिक पूजाविधी वगैरेंच्या स्वातंत्र्यासाठी होता. दे. भ. श्री. अण्णासाहेब भोपटकर यांनी आपल्या पत्रकांत ही गोष्ट मांडली आहे.  नागरिक स्वातंत्र्यांत धार्मिक स्वातंत्र्य ही गोष्ट येऊनच जाते.  स्टेट काँग्रेसच्या व्यापक लढयात ती गोष्ट येतच होती.  ही एकच गोष्ट घेऊन स्टेट काँग्रेस लढत नव्हती ; जीवनाचे व्यापक स्वरूप घेऊन ती लढत होती. हिन्दु-महासभेचे एक चहाते मला म्हणाले, ''तुम्ही असें म्हणता ; परन्तु सर्व हिंदु-महासभावादी असें म्हणत नाहींत.  डॉ. कुर्तकोटी हेंच सांगत होते.  हिंदुमहासभा धार्मिक संघटनेपुरती राखा असें ते सांगत.  परन्तु कुर्तकोटींची चेष्टा झाली.  हिंन्दूच्या राजकीय स्वातंत्र्यासाठी झगडणारी हिंदुमहासभाच असें घोषित होऊं लागलें.  त्या मित्रांस माझें म्हणणें पटलें नाही.  ते कांही असो.  हिंदुमहासभा व आर्यसमाज यांचा सत्याग्रह मर्यादित आहे ही गोष्ट खरी.  स्टेट काँग्रेसचा व्यापक होता.  तिच्या ध्येयांत धार्मिक स्वातंत्र येऊनच जात होते. ''

संस्थानचा शेवटचा सुधारणांचा खर्डा बाहेर पडेपर्यंत स्टेट काँग्रेस थांबली आहे.  सत्याग्रहाची ही नीति आहे.  प्रतिपक्षी आपलें म्हणणें स्पष्ट करूं इच्छित आहे ; त्याला अवसर दिला पाहिजे.  निर्मळ वातावरण व विश्वास ऊत्पन्न केंली पाहिजेत.  चांगल्या हवेंत चांगल्या गोष्टी निर्माण होतात.  विषारी हवेंत रोगजंतूच फैलावयाचे.  म्हणून स्टेट काँग्रेसला सत्याग्रह थांबवावा असा सल्ला महात्माजींनी दिला.  यांत ना भीति, ना मनधरणी.  सत्याग्रह बंद करून विधायक काम करा असें महात्माजींनी सांगितले ; घरांत बसावयास त्यांनी सांगितले नाहीं.  गांवोगांव जाऊन खादी खपवा, स्वच्छता निर्माण करा असें त्यांनी सांगितले.

हैद्राबादमधला सत्याग्रह जनतेपर्यंत गेला नाहीं, आर्यसमाज व हिंदुमहासभा यांचे जथे शहरांत जातात व पकडले जातात.  संस्थानांतील हजारों खेडयांना ना दाद ना फिर्याद.  स्टेट काँग्रेसच्या कांही कार्यकर्त्यांनी सांगितले,  ' आमच्या सत्याग्रहाचा खेडयांत प्रचार कसा करावा हें समजेना. '  विधायक कार्याने हा प्रचार होईल.  ३० सालीं हिन्दुस्थानांत कायदेभंग सुरू झाला.  त्याचा प्रचार विधायक कार्यकर्त्यांच्या झाडूंतून व खांद्यावरील खादींतून आधीं झाला होता.  खादी आपल्या बरोबर राजकारण घेऊन जाते.  खादी हें मृत वस्त्र नाहीं;  ते मृतांस जिवंत करणारें जिवंत वस्त्र आहे.   

नि:शस्त्र सत्याग्रहांत आमची जनता सामील झाली तरच त्यांत अर्थ असतो.  बाहेरच्या जथ्यांनी खरें कार्य होणार नाहीं.  ज्याप्रमाणें स्टॅलिन म्हणतो,  ''इतर देशांत आम्ही जाऊन क्रांति करणार नाहीं.  परन्तु तेथील जनता जर उठली, संघटित झाली, त्यागाला तयार दिसली, तर मग त्यांना आम्ही सहाय्य करूं.  तोपर्यंत आम्ही वाट पाहूं, स्वत:चे बळ वाढवीत राहूं. '' रशिया पदोपदीं दुस-या देशांत लुडबूड करील, असंघटित, स्वत:च्या पायावर उभें न राहणा-या पंगू राष्ट्रास सावरूं पाहील तर रशिया दोहोंकडे फसेल.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel