''तसे काही नाही. आपली कृपा आहे.''

''मी उगाच स्तुति नाही करीत. तुम्हीच नवसमाज सांभाळा. पहिला अंक कधी काढायचा? आज आहे जुलैची पहिली तारीख.''

''१५ ऑगस्टला काढू. स्वातंत्र्य दिनापासून 'नवसमाज' सुरू होऊ दे.''

''ठीक. पण जमेल एवढयांत?''
प्रभाकरची निवड झाली. प्रभाकर कंबर बांधून कामाला लागला. १५ ऑगस्टला नवसमाजाचा पहिला अंक निघाला आणि वाचकांच्या नुसत्या उडया पडल्या त्याच्यावर. लेख, गोष्टी, कविता उच्च प्रकारच्या आणि मुखपृष्ठ सुरेख आणि अंतरंगाची कल्पना देणारे होते. वृत्तपत्रांतून उत्कृष्ट अभिप्राय आले. एकजात सर्वांनी 'नवसमाज'ची पाठ थोपटली होती. दीनदयालजीही खूश होते. अंक एकापेक्षा एक सरस निघत होते.

सात आठ अंक निघाले असतील नसतील. गावात नगरपालिकेच्या निवडणुकीची धामधूम सुरू झाली. दीनदयालजी उभे राहिले. त्यांच्या विरूध्द एक पेन्शनर हेडमास्तर उभे होते. हे हेडमास्तर फार लोकप्रिय होते. समाजसेवेच्या प्रत्येक क्षेत्रांत अग्रभागी असत. गावातले कुठलेही सेवाकार्य असो तेथे ते असायचेच.

आणि एक दिवस निवडणुकीनिमित्त सभा झाली. म्युनिसिपल निवडणूक हा विषय होता. प्रभाकर बोलणार होता. लोकांची अफाट गर्दी झाली. प्रभाकरचे प्रवाही आणि प्रभावी भाषण सुरू झाले. कॉलेजमधला दांभिकतेविरूध्दचा सारा जोश त्याच्या अंगात संचारला. म्हणाला, ''नगरपालिका सुधारल्यावाचून स्वराज्य झोपडयांपर्यंत पोचणार नाही. सर्व लोभ, भय सोडून त्यागी समाजसेवकांना निवडून देण्याची हिम्मत मतदारांनी बाळगल्यावाचून नगरपालिका कशा सुधारणार? उद्याच्या निवडणुकीत सर्व मतदारांनी दाखविले पाहिजे की, खरे खोटे तुम्ही ओळखता. आपला हितकर्ता कोण ते तुम्हांला समजते. तुम्ही मते कोणाला देणार? तुमच्या सेवेसाठी अखंड तळमळणा-या ह्या हेडमास्तरांना - ज्यांनी लोकशिक्षणाचे कार्य सतत तीस वर्षे केले आहे त्यांना, की केवळ पैसा आहे म्हणून नगरपालिकेचे राजकारण करू पाहणा-या दीनदयालजींना?''

प्रभाकरच्या वक्तृत्वाचा परिणाम जनतेवर झाला आणि दीनदयालजींवरही. दुस-या दिवशी दीनदयालजींनी त्याला बोलाविले व सभेतील भाषणाविषयी विचारले.

ते म्हणाले, ''मी तुमचे काय घोडे मारले होते माझ्याविरूध्द प्रचार केलात!''

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel