आटपाट नगर होतं. तिथं एक ब्राह्मण होता. त्याला आवळे जावळे मुलगे होते. त्यांच्या लहानपणींच त्यांचे आईबाप मेले. भाऊबंदांनीं त्यांचं काय होतं नव्हतं तें सगळे हिरावून घेतलं व मुलांना देशोधडीला लावलं. पुढं ती मुलं जातां जातां एका नगरांत आलीं. दोन प्रहरची वेळ झाली आहे. वाट चालतां चालतां दोघे दमून गेले आहेत. दोघाचे जीव भुकेनं कळवळले आहेत. दोघांची तोंडं सुकून गेलीं आहेत. असे ते दोघेजण त्या नगरींत आले.

इतक्यांत एक चमत्कार झाला. एक ब्राह्मण काकबळी टाकण्याकरितां घरांतून बाहेर आला. ब्राह्मणाचं त्या मुलांस पाहिलं. आपल्या घरांतून बोलावून नेलं. जेवूं घातलं. खाऊं घातलं. नंतर त्यांची सगळी हकीकत विचारली.

त्या मुलांनी आपली सर्व हकीकत सांगितली. ब्राह्मणानं दोन्ही मुलांना घरीं ठेवून घेतलं. वेदाध्ययन पढवूं लागला. मुलंही तिथं राहून वेद पढूं लागली. असं करतां करतां पुष्कळ दिवस झाले.

पुढं काय झालं ? तो ब्राह्मण ललितापंचमीचं व्रत करूं लागला. शिष्यांनीं गुरुजीला विचारलं, “हें आपण काय करता?” तेव्हां गुरुजी म्हणाले,“ हें उपांगललितापंचमीचं व्रत आहे. ह्यानं द्रव्य मिळतं, विद्या प्राप्त होते. इच्छित हेतु प्राप्त होतात,” हें त्या शिष्यांनीं ऐकलं. यथाशक्ति त्यांनीं व्रत केलें, तशी त्यांना लौकर विद्या आली. दोघां मुलांची लग्ने झालीं. पुढं ते आपल्या नगरी आले. श्रीमंत झाले. सुखासमाधानानं कीर्ति मिळवून राहूं लागले.

याप्रमाणं कांहीं दिवस गेले. पुढं काय चमत्कार झाला? दोघे भाऊ वेगळे निघाले. थोरला भाऊ दर वर्षी आपलं ललितापंचमीचं व्रत करी, त्यामुळं त्याची संपत्ति कायम राहिली. धाकट्या भावानं व्रताची हेळसांड केली त्याचा देवीला राग आला. त्यामुळं त्याला दारिद्र्य आलं. पुढं ती नवराबायको थोरल्या भावाकडे रहावयास गेलीं. एके दिवशी वडील भावाची बायको दिराला कांहीं बोलली. त्यामुळं त्याला राग आला. मोठा पश्चात्ताप झाला.

आपल्या बायकोला म्हणाला, “मी उपांगललितेचं व्रत टाकलं. त्याचं मला हें फळ आलं. हा अपमान सहन करून इथं राहाणं चांगलं नाहीं, मी आता देवीला प्रसन्न करीन तेव्हांच घरीं येईन.” असं बोलून तो गेला. पुढं त्याच्या भावानं त्याचा पुष्कळ शोध केला; परंतु शोध कांहीं लागला नाहीं. पुढं हिंडतां हिंडतां एकदा तो नगराजवळ आला. त्या नगराबाहेर गुराखी भेटले. त्यांना विचारलं, “ह्या गांवाचं नांव काय? कोणता राजा इथं रहातो? उतरायला जागा कुठं मिळेल?” ते म्हणाले, “ह्या गांवाचं नांव उपांग आहे. इथं राजाही उपांगच आहे. तिथं ललितेचं एक देऊळ आहे. तिथं मोठी धर्मशाळा आहे. तिथं उतरायला जागा मिळेल. आम्ही त्याच गांवांतून आलों. तिकडेच आम्हांला जायचं आहे. तुम्हालांही यायचं असेल तर चला” मग तो त्या नगरांत गेला.

धर्मशाळेत उतरला. देवीचं दर्शन घेतलं. अनन्यभावानं तिला शारण गेला. रात्रीं देवळांतच निजला. देवीनं स्वप्नांत येऊन दृष्टांत दिला. “राजाकडे जा, माझ्या पूजेच्या करंड्याचं झांकण माग, त्याची नेहमी पूजा कर, म्हणजे तुझे मनोरथ पूर्ण होईल.” इतकं सांगून देवी गुप्त झाली व तो जागा झाला.

दुसरे दिवशीं तो राजाकडे गेला, देवीचा दृष्टांत सांगितला, पूजेचं झांकण मागितलं. राजानं तें दिलं. ब्राह्मण तें घेऊन आपल्या गांवीं आला. घरीं नेऊन त्याची पूजा करूं लागला. ललितादेवीचं व्रत करूं लागला. तसे पुन्हां सुखाचे दिवस आले. इच्छित मनोरथ सिद्धीला गेले. पुढं देवीच्या आशीवार्दानं त्याला एक मुलगी झाली. सोबतिणींबरोबर खेळायला जाऊं लागली.

पुढं काय चमत्कार झाला? एके दिवशी मुलीनं तें झांकण घेतलं. नदीवर खेळायला गेली. तिथं जाऊन आंघोळ करूं लागली. इतक्यांत एका ब्राह्मणाचं प्रेत वाहात आलं तिनं त्याच्यावर झांकणांनं पाणी उडविलं, तसा तो ब्राह्मण जिवंत झाला. देवीच्या प्रसादानं त्याला सुंदर रूप प्राप्त झालं. तिनं तें पाहिलं. आपल्याला हा पति असावा असं तिला वाटलं. आपला हेतु त्याला कळविला.

तेव्हां त्यानं हिला विचारलं, “ही गोष्ट घडेल कशी? तशी ती म्हणाली, “मी तुम्हांला घरी जेवायला बोलावतें, जेवायच्या वेळेस आपोषणी हातांत घ्या आणि अडून बसा म्हणजे बाबा तुम्हांला विचारतील. “भटजी, आपोषणी कां घेत नाहीं? तेव्हां सांगा कीं, आपली कन्या मला देशील तर जेवतों, नाहीं तर असाच उठतों. म्हणजे ते देतील.”

त्याप्रमाणं तिनं जेवायला बोलावलं. ब्राह्मण जेवायला बसूं लागला. मुलीचं मागणं केलं. बापानं मुलगी देण्याचं कबूल केलं. सुखासमाधानानं जेवणं झालीं. चांगला मुहूर्त पाहून लग्न लावलं, नवरानवरींची बोळवण केली. मुलगी घरी जातेवेळेस देवीचं प्रसादाचं झांकण घेऊन गेली. त्यामुळे बापाच्या घरांतलं सगळं द्रव्यं गेलं. दळिद्र आलं, तो फार गरीब झाला. तसं त्याच्या बायकोनं मुलीजवळ झांकण मागितलं. मुलीनं ते दिलं नाहीं. तिनं तो रोष मनांत ठेवला.

एके दिवशी आई मुलीच्या घरीं जाऊं लागली. जातांना वाटेंत जांवई भेटला. सासून त्याला ठार मारवलं. झांकण घेऊन घरीं आली. इकडे मुलीच्या व्रताच्या पुण्यानं जांवई जिवंत झाला. उठून घरीं गेला. बायकोला झालेली हकीगत सांगितली. तिला मोठा आनंद झाला. पुढं ही सगळी हकीगत सासूला समजली, तशी ती जांवयाच्या घरीं आली. पटापट पायां पडूं लागली. केलेला अपराध कबूल झाली. तिला पश्चात्ताप झाला. अशा कर्मामुळं तिला गरीबी आली.तिचा नवरा आश्चर्य करूं लागला कीं वारंवार असं कां होतं? ह्याचं कारण कांहीं केल्या त्याच्या लक्षांत येईना. म्हणून वडील भावाकडे गेला. त्याला सगळी हकीकत सांगितली.

तो म्हणाला, “तूं ललितापंचमीच्या व्रताची हेळसांड करतोस, त्या योगानं असं होतं. व्रतनेम यथास्थित कर. देवीची पूजा कर. म्हणजे तुझं कल्याण होईल.” त्यानं तसं वागण्याचा निश्चय केला. घरीं आला. व्रत करूं लागला. कांहीं काळाने दळिद्र गेलं. मनांतले त्याचे इष्ट हेतु पूर्ण झाले. तसे तुमचे आमचे होवोत.

ही सांठां उत्तरांची कहाणी. पांचां उत्तरीं सुफळ संपूर्ण.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel