पावसाचं आणि धरणीचं, झालं एकदा ब्रेकअप..
रुसून गेल्या धरणीचा, बिघडून गेला मेकअप..!

कधीच नाही भेटणार तुला,
पाऊस गेला सांगून..
धरणी म्हणाली मग त्याला,
मुकाट येशील मागून..!

रागाने पाऊस आपले, घेऊन गेला ढग..
जिरवूया आता म्हणे, धरणीची रग..!

हिरमुसली धरणी
अन सुकून गेल्या वेली..
सौंदर्याची तिची मग, रयाच गेली..!

तिला असे पाहून,
पावसा आले भरून..
काय उपयोग असतो, उगाच भांडण करून..!

मनातल्या मनात,
धरणी होती झुरत..
पावसा ये ना धावत,
मनी याचना होती करत..!

न राहावून पावसाने,
ढग केले गोळा..
चित्त नव्हते थाऱ्यावर,
भाव त्याचा भोळा..!

वाऱ्यावर होऊन स्वार,
तो आला प्रियेसाठी..
बिलगता धरणीची, गंधाळली माती..!

ओल्या त्याच्या स्पर्शाने, तिचे शहारले अंग..
अन पुन्हा मिळाला धरणीला,
तिचा हिरवा रंग..!

धरणी म्हणाली पावसाला,
पुन्हा कधीच नको भांडू..
विरहात सख्या माझे,
अश्रू नको सांडू..!
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel