समाजात निरनिराळ्या विशिष्ट भलभलत्याच चुकीच्या कल्पना व भलभलतेच विचार रूढ होत असतात. त्या त्या काळात अशा भ्रामक कल्पना आपणास नेहमी दिसून येतील. आजच्या काळातील लोकांचीही अशीच एक चुकीची दृष्टी बनली आहे. आज कोणाला काहीही करावयास सांगा, एखादे नवीन तत्त्व सांगा, एखादा नवीन विचार सांगा, एखादे नवीन स्वदेशीचे व्रत, एखादा नवीन आचार सांगा, - की लगेच ते विचारतील, “यापासून लभ्यांश कोणता ? आमचा फायदा काय होईल ? किती होईल ?”  प्रत्येक प्रसंगी गिधाडाप्रमाणे “फायदा काय ? तुकडा केवढा मिळेल ?” असे विचारणे ही विचारसरणी आज रुढ झाली आहे. बाजारी दृष्टी सर्वत्र बोकाळली आहे. त्या प्रश्न विचारणार्‍याला उलट आपण प्रश्न विचारावा..... “फायदा कोणाचा विचारीत आहेस ? राष्ट्राचा का तुझा ? तुझा आजचा या क्षणाचा तात्पुरता की, भावी पिढीचा कायमचा ?” या प्रश्नाचे उत्तर त्याच्याकडून नीट मिळाल्यांशिवाय त्यांच्या प्रश्नाला उत्तर देण्याच्या भानगडीत आपण पडू नये.

फायदा काय, असे विचारणारी व्यक्ती नेहमी स्वत:च्या तात्पुरत्या फायद्यालाच मनात धरून बोलत असते. स्वत:चा फायदा हेच व्यक्तीचे नेहमी उद्दिष्ट दिसून येत असते. अमक्या अमक्या तर्‍हेने वागल्यास, काही ठराविक मुदतीत तुमचा अमुक फायदा होईल, असे सांगितले तर लगेच तसे करावयास माणसे तयार होतात. फायदा होणार असेल तरच करणे योग्य, नाहीतर अयोग्य - असे आजचे योग्यायोग्यतेचे बाजारी माप आहे.

व्यक्ती या शब्दांतील अर्थ विशाल असेल तर हरकत नाही. ‘आमचा फायदा काय,’ असे विचारताना, ‘आमचा’ हा जो शब्द त्यात सर्व समाज, सारे राष्ट्र येत असेल, तर हरकत नाही. ‘फायदा’  हा जो शब्द त्याचा अर्थही विशाल असेल, केवळ चार दिडक्या एवढाच नसेल तरीही हरकत नाही. परंतु असा विशाल अर्थ घेण्यास मनुष्य तयार नसतो. अशी ही विशाल दृष्टीच कोणाला मुळी नसते. ‘चांगले कर’  असे सांगताच, फायदा काय असे विचारतात. परंतु स्वत: वाटेल तसे रोज वागतात, त्या वेळेसही ‘असे केल्याने फायदा काय,’ असे जर स्वत:ला विचारतील तर किती छान होईल ? सद्गुणाने फायदा होत नाही, सद्गुण होळी करावयास सांगणार आहे, त्याग करावयास लावणारा आहे. परंतु तुझ्या दुर्गुणाने तरी काय फायदा होतो ? तुझे दुर्गुण शेवटी सर्व समाजाच्या अंगात विषसम भिनतील व सर्व समाजाचा नाश होईल. तुझी पापे सर्वत्र पसरून तुझा व तुझ्या समाजाचा दोघांचा बळी घेतील. सदाचाराचा, सद्गुणाचा फायदा आज दिसला नाही, तरी उद्या दिसेल परंतु तुझ्या असद्विचाराचे व असद्वर्तनाचे काय तुझ्या व्यसनांचे व पापांचे काय ?

मानवी ज्ञानात जी जी मौल्यवान् भर पडली, जो जो प्रत्येक नवीन शोध लागला, नवीन शोध मिळाला, त्या सर्वांच्या मुळाशी त्याग आहे. जे जे नवीन तत्त्व सापडले, जी जी नवीन सिध्दी मिळाली, त्या सर्वांच्या मुळाशी यज्ञ आहे. मानवजातीचा इतिहास ही गोष्ट निरपवाद शतमुखांनी सांगत आहे. “त्यागेन एकेक अमृतत्वमानशु ।” ज्यांनी ज्यांनी स्वत:च्या स्वार्थावर पाणी सोडले, मानवजातीच्या कल्याणासाठी अहोरात्र अखंड श्रम करण्यातच ज्यांनी जीवनाची सफलता मानली, अशा व्यक्तींकडूनच ज्ञान संवर्धिले गेले, सत्य प्रकट केले गेले. भारतवर्षात आपण असे चटकन् म्हणायचा संभव आहे, की त्याग फक्त संन्याशाने करावा !परंतु प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक कार्यात संन्याशी लागत असतात, ही नवीन गोष्ट आज आपणास शिकावयाची आहे. समाजाच्या नानविध क्षेत्रांत संन्यास आज वावरू लागला पाहिजे; त्याची सर्वत्र जरूरी आहे. ज्या कामात संन्यास नाही, ज्या वर्गात संन्यास नाही, तेथे तेज चढत नाही.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel