‘लाभालाभ, जयापजय सारखे करा.’  हा गीतेचे उपयोग केवळ संन्याशाला नाही. हे महावाक्य सर्वांनीच स्मरावयाचे आहे, डोळ्यांसमोर राखावयाचे आहे. ज्याला लाभालाभ सम झाले, ज्याने हे साधिले, त्याने अखेर साधली असे समजा; त्याने रंगेरी मारली असे जाणा; त्यांना विजय मिळालाच असे समजा. ज्याला ही कला साधली, ज्याला हे वरील तत्त्व आचरणात अनुभविता आले, त्याला यश येतेच येते. मनाची एकाग्रता होताच, बुध्दीची स्थिरता होताच, तिची समाधी लागताच फळे आपोआप येतात. परिणाम समोर दिसू लागतात. आपण इतका वेळ भांबावून गेलो होतो, हतबुध्द झालो होतो, निराश झालो होतो, अडचणीत सापडली होतो- याचे कारण ध्येय सूर्याप्रमाणे स्वच्छ असे डोळ्यांसमोर नव्हते. ध्येयाची निश्चितता नव्हती. ध्येयमंदिराचा कळस दुरून दिसू दे- मग किती का ते दूर असेना- आपण त्याला गाठूच गाठू. खरा नेम धरा की, तेथे जावयाचे. पक्ष्यांची मान व बाणाचे अग्र एका टोकात येताच अर्जुनाचे गांडीव टणत्कार करील व यशोदेवता त्याला माळ घालील.

आपले प्रयत्न कोणत्या ध्येयासाठी आहेत हे पुष्कळ वेळा आपणास स्वच्छ माहीत नसते. कोणत्या गोष्टींसाठी धडपडण्याचा मला हक्क आहे, अधिकार आहे, पात्रता आहे, हे आधी पाहिले पाहिजे. कशासाठी मी जन्मलो, काय करण्यासाठी-ते शोधून काढा. आपली इच्छा-शक्ती नागिणीप्रमाणे झाली पाहिजे. फणा वर करून, नीट नेम धरून ती नागीण उडी घेते व अचूक दंश करिते. त्या नागिणीप्रमाणे आपण योग्य ठिकाणी उभे राहून नीट तोल सांभाळून, दृष्टी अचूक करूनच ध्येयावर उडी मारिली पाहिजे. स्वच्छ बुध्दी पाहिजे, ध्येय स्पष्ट पाहिजे. ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. घोटाळा नको. हे का ते नको. दोन डगरीवर हात नको. एक व ते एकच. ज्याच्या बुध्दीला शत फाटे फुटले, त्याचे नशीब फुटले. डोंगरावरचे सारे पाणी एकाच दिशेने जाईल तर त्याची नदी होईल, परंतु ते बारा वाटांनी जाईल तर त्याचा मागमूस राहणार नाही.

कोणते तरी ध्येय ठरवून त्याच्यासाठी मग सारे जीवन अर्पण करा. ध्येय कोणतेही असो. शाळेतील शिक्षक व्हावयाचे आहे ?.... व्हा. शिक्षक व्हा. त्यालाही आपला देश स्वतंत्र करता येईल. शिक्षणाचे काम करून स्वातंत्र्यात त्याला भाग घेता येईल. मोठ्या आनंदाने तो हे करू शकेल. परंतु केव्हा त्याला हे साधेल ? आपल्यासमोर बसलेली मुले...... ती ताजी फुले ..... ह्या देवाच्या मूर्ती आहेत, ही मुले म्हणजे सिंहाचे बच्चे आहेत, ध्रुव, शुक, प्रल्हाद, रोहिदास...... चिलया यांचे वंशज आहेत, यांचे भाऊ आहेत. अशी श्रध्दा गुरुजवळ कोठे असते ? ज्या शिक्षकाला मुले म्हणजे दगडधोंडे, गध्दे, टोणप्ये असेच दिसतात...... त्याला काय करता येणार आहे ? मुलांच्याबद्दल अत्यंत थोर भावना करून त्याला शिकवू दे. मुले खरोखरोच पुढे शिवाजी-बाजी, तुकाराम-रामदास- होवोत, वा न होवोत परंतु ‘ही मुले मोठी होतील’ याच जिवंत व उत्कट भावनेने शिक्षकाने शिकविले पाहिजे. जो गुरु या भावनेने शिकवील, जो शिक्षण शिकविताना ही दृष्टी ठेवील, तो राष्ट्राला वीरांचा पुरवठा करील; तो राष्ट्राला थोर कार्यकर्ते देईल. त्याने आपले कमळ फुलवीत राहावे- ध्येय पूजीत रहावे- भ्रमर आपोआप येतील.

आणि तो कोण आहे? कुंभार? काही हरकत नाही. तोही आपल्या बांधवांना स्वतंत्र करील. त्याने मडकी पक्की भाजावी, ठोकून ठोकून तयार करावी. त्याच्या स्फूर्तीने त्याचा आवा पेटविणारे मजूर- तेही पेटतील. कुंभाराच्या मनात चांगली मडकी करण्याचे घोळत होते, परंतु त्याच क्षणी मनाच्या मृत्तिकेतून तो वीर निर्माण करीत होता. शालिवाहनाने मातीचे घोडेस्वार करून साम्राज्य स्थापिले. मातीसारख्या पडलेल्या नि:सत्त्व लोकांतून तेजस्वी घोडेस्वार निर्माण केले.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel