जीवनमित्रास!

(मरण ज्याच्या जवळ आले आहे, परंतु जो जगू इच्छित आहे, असा एक तरुण आपल्या जीवनास उद्देशून म्हणतो. इंग्रजीत अशी एक लहान कविता मी वाचली होती. ती कल्पना मनात येउन ही मी मराठीत लिहिली आहे.)

“चिरमित्र सखा सहोदर
मम तू मित्र उदार सुंदर
सहसा निघतोस सोडुनी
मम माया सगळीच तोडुनी।।

वदु काय कसे कळेच ना
वच कंठातुन ते निघेच ना
सगळे स्वचरित्र आठवे
हृदयी शोक अपार साठवे।।

सदया सखया! मनोहरा!
वद केवी उघडू मदंतरा
मज सोडुन ना गड्या निघे
मम आशा मम हेता तू बघे।।

किति येता विचार मोहना!
प्रिय मित्रा मम गोड जीवना
सखया! मज एक ठाउक
घडली भेट तुझी, न आणिक।।

जमली तव नित्य संगती
परि केव्हा कधि वा किमर्थ ती
न कळे न वळे मला लव
सगळे त्या प्रभुचेच लाघव।।

धरिली तव फार आवडी
किति माझी जमली तुझी गडी
दिनरात्र सदैव सन्निधी
तुझी माझी नव्हती तुटी कधी।।

हसलो रडलो कितीकदा
परि देशी मज धीर तू सदा
सुखदु:खरसी सखा खरा
मज देशी न कधीहि अंतरा।।

रडवीत अनंत आपदा
परि तू मन्निकटी उभा सदा
पुशिशी स्वकरे मदश्रुते
प्रियबंधो किति केवि वर्ण ते।।

सखया! सकला मदंतर
स्थिति तू जाणिशि जेवि ईश्वर
सदसत् मम जे तुजप्रती
कळलेले तुज सांगु मी किती।।

विहरून अभिन्न आपण
भुवनी जो मिळाला कधी कण
कटु गोड तसाच चाखिला
न दुजा भाव मनात राखिला।।

बघता तरि तू अमूर्तसा
हृदयी राहुन निर्मिशी रसा
तव रूप न देखिले जरी़
तव तो वास सदा मदंतरी।।

नयने नयनांत पाहणे
तुज बाहेर तसे विलोकणे
वरिशी मशि एकरूपता
असशी व्यापुन पूर्ण हृतस्थिता।।

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel