आई म्हणाली, ''बाळा आमच्या या वाराणसींत सर्व ब्राह्मण अर्धकच्चे आहेत. उत्तम पंडित एका तक्षशिला नगरींतच सांपडतात. तुला जर सर्व शास्त्रांत पारंगतता संपादावयाची आहे, तर तेथें जाऊन गुरुगृहीं वास केला पाहिजे.''

त्याच दिवशीं बोधिसत्त्वानें वाटखर्ची बरोबर घेऊन वाराणसींतून प्रयाण केलें व जितक्या लवकर तक्षशिलेला जाणें शक्य होतें तितक्या लवकर तो तेथें जाऊन पोहोंचला. तेथें एका प्रसिद्ध आचार्याच्या घरीं जाऊन त्यानें अध्ययनास सुरुवात केली. परंतु तेथील मंद अभ्यासक्रमानें हत्तीचा सण येण्यापूर्वीच घरीं पोहोंचणें शक्य नव्हतें म्हणून तो आचार्याला म्हणाला, ''गुरुजी, या रोजच्या अभ्यासक्रमानें माझें काम भागणार नाहीं. मला निकडीच्या कामासाठीं अध्ययन पुरें करून लवकर घरीं गेलें पाहिजे.''

त्या आचार्यानें बोधिसत्त्वाला निराळें शिकवून त्याच्या अध्यापनाची फार काळजी घेतली, बोधिसत्त्वानेंहि आपल्या आंगच्या हुषारीनें आचार्याला संतुष्ट करून तीन वेदांचे आणि हस्तिसूत्रानें अध्ययन हत्तीचा सण येण्यापूर्वीच पुरें केलें. आणि त्या सणाच्या पूर्व दिवशीं तो आपल्या घरीं येऊन पोहोंचला. हत्तीच्या सणाची सर्व तयारी झालीच होती. दुसर्‍या दिवशीं हस्तिशाळेंत ब्राह्मणसमुदाय जमून होमहवनाला सुरुवात झाली. राजाहि आमच्या अमात्यांसह येथें आला. इतक्यांत बोधिसत्त्व या ठिकाणीं येऊन राजाला म्हणाला, ''महाराज, आजच्या सणाची आमच्या कुलांतील कोणीच ब्राह्मण येथें हजर नसतां तयारी चालली आहे हें काय ?''

राजा म्हणाला, ''बाबारे, तुझ्या कुलांत तूंच काय तो शिल्लक राहिला आहेस आणि तुझें अध्ययन अपुरें असल्यामुळें यंदाची दक्षणा शहरांतील सर्व ब्राह्मणांना वांटून देण्यांत येणार आहे. म्हणून तुझी या ठिकाणीं जरूर पडली नाहीं.''

बोधिसत्त्व म्हणाला, ''महाराज, माझें अध्ययन पुरें झालें नाहीं ही गोष्ट आपणाला कोणीं सांगितली ? '' राजा म्हणाला, ''हे सर्व ब्राह्मण सांगत आहेत.''

बोधिसत्त्व म्हणाला, ''तर मग या ब्राह्मणांनीं पुढें येऊन मला प्रश्न विचारावे किंवा मजबरोबर वेदमंत्र म्हणण्यास आरंभ करावा. आणि जर त्यांतील एक जण देखील मला जिंकू शकला तर आमच्या कुलपरंपरेंत चालत आलेली वहिवाट मोडून सर्व दक्षिणा या ब्राह्मणांला द्यावी. पण जर ते हरले, तर त्यांना माझ्याविषयीं विनाकारण गैरसमजूत उत्पन्न केल्याबद्दल योग्य शासन व्हावें.''

वेदाविषयीं आणि हस्तिसूत्राविषयीं त्यांतील एक देखील ब्राह्मण बोधिसत्त्वाला प्रश्न करण्यास धजला नाहीं; तेव्हां बोधिसत्त्वानेंच वेदमंत्र आणि हस्तिसूत्र त्या सभेंत म्हणून दाखविलें. तेव्हां ते सर्व ब्राह्मण या तरुणाची बुद्धि पाहून चकित होऊन गेले ! व राजाला भलतीच गोष्ट सांगितल्याबद्दल त्यांनीं त्याची क्षमा मागितली. राजानें पूर्वीची वहिवाट कायम करून सर्व दक्षिणा बोधिसत्त्वाला देवविली. आपल्या कुलाची परंपरा एकुलत्या एका तरुण मुलानें राखल्याबद्दल बोधिसत्त्वाच्या आईला फार आनंद झाला.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel