‘कोठे नेतात मला? तुम्ही रात्री गाणे का नाही म्हणलेत? आज म्हणा हा. मी ते पाठ करीन. छान आहे नाही हा सदरा? हा मला आवडतो.’ तो निर्मळपणे बोलत होता.

‘चल लौकर.’ कोणी खोटा कठोरपणा वाणीत आणून हुकूम देता झाला.

तो मुलगा गेला, बुटांचे आवाज येत होते आणि थोडया वेळाने त्या मुलाचा आरडाओरडा आमच्या कानी आला. तो समजला सारे. तो निसटू पाहात होता. परंतु बळी द्यायला काढलेल्या कोकराला पकडावे तसे त्याला पकडण्यात आले. त्याची मान फासांत अडकवण्यात आली. खट् खट् आवाज झाले. दोघे लोंबकळले. तो मोठा तर पटकन् प्राणहीन झाला. किशोर धडपडत होता. मांगाने जरा गाठ आवळली. संपले सारे. ते चैतन्य, ती उत्साहशक्ती, ते सौंदर्य, ती निष्पापता यांचा बळी घेण्यात आला.

आणि त्या दिवसापासून मी क्रांतिकारक बनलो. प्रचार करू लागलो, संघटना करू लागलो. पोवाडे लिहू लागलो, पत्रके वाटू लागलो. हे भ्रष्ट सरकार आहे. गुलामगिरी लादणारे. मानवता संकटात आहे. प्रत्येक जिवाचा विकास होईल, अशी समाजरचना हवी. त्या विकासास वाव देईल अशी शासनसंस्था हवी. आम्हांला मूर्ख नका समजू. आमची जीवने मातीत गाडली जात आहेत. परंतु यांतून नवजीवन येईल, नवविकास येईल. आमच्यांत एकमत नाही. कोणी अराजक, तत्त्वज्ञानाचे पुरस्कर्ते आहेत. कोणी लोकशाही समाजवादाचे. कोणी अहिंसक उपासक, तर कोणी साधनांचा विचार न करता साध्य कसे हस्तगत होईल याचाच विचार करणारे. कोणी हुकूमशाही अपरिहार्य मानतात, तर कोणी म्हणतात तिच्यातून सत्तेची लालसा असणारे लोक निर्माण होतील. दुधावर साय येते त्याप्रमाणे एक नवीन अधिकारप्रिय वर्ग निर्माण होईल. आपणच सर्वांचे कल्याणकर्ते असे त्यांना वाटेल. विरोधी आवाज सहन करणार नाहीत. काहींच्या मते मानवांना हे मुंग्यांप्रमाणे करणे होय. मनुष्याला आत्मा आहे. बुध्दी आहे. त्याला वैचारिक स्वातंत्र्य हवे. व्यक्तीलाहि काही महत्व आहे. कोणी म्हणतात एका देशात समाजवाद अशक्य आहे; तर दुसरे म्हणतात त्या त्या देशात स्वतंत्र प्रयोग व्हावेत, कोणावर लादू नये. अनेक मते आमच्यात आहेत. आम्ही चर्चा करतो, एकमेकांवर धावून जातो. परंतु एक गोष्ट खरी की, मते कोणतीही असली तरी स्वार्थ सर्वांनी दूर ठेवलेला आहे. सुखावर निखारा ठेवलेला आहे. इतरांना सुख कसे मिळेल, श्रमणारे सुखी कसे होतील, सर्वांना अन्नवस्त्र-घरदार कसे मिळेल, सर्वांना ज्ञानविज्ञान कला यांतील आनंद कसा मिळेल, सर्वांना विश्रांती कशी मिळेल याचाच ध्यास आम्हा सर्वांना आहे.’

तो तरूण बोलत होता. तो का शेवटचे उपनिषद् गात होता? तो मध्येच अर्धवट उठे, पुन्हा उशीवर डोके ठेवी. त्याची मुद्रा तेजाने नुसती फुलली होती; परंतु बोलण्याच्या श्रमाने धर्मबिंदूंनी मुख डंवरले होते. प्रतापने आपल्या रुमालाने त्याचे तोंड पुसले. देवदूताप्रमाणे तो तरूण दिसत होता.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel