प्रकरण १८
सौम्या आणि पाणिनी पटवर्धन निवांत पणे एका हॉटेल मध्ये बसले होते. “ टोस्ट बटर आणि कडक कॉफी ”.
पाणिनी ने वेटर ला सांगितलं.
“ अजून डोक्यात गौतम चा विषय आहे?”  पाणिनी च्या मनातले विचार जाणून सौम्या ने विचारलं.
“ तो मला धोकादायक वाटतो सौम्या. म्हणजे नाटकी. विशेषतः स्वतःचे ठसे देताना तो जास्तच उत्साही वाटला मला.” पाणिनी म्हणाला आणि आपल्या विचारत हरवला.दरम्यान वेटर ने आणलेल्या टोस्ट आणि कॉफी चा त्या दोघांनी समाचार घेतला.
“ काय सुचवायचं आहे तुम्हाला सर? ” –सौम्या.
“ त्या घरातून त्याला जे काही हवं होतं, ते त्याने जाताना आपल्या बरोबर घेतलं हे नक्की.आणि ते सुध्दा अगदी आपल्या नाकावर टिच्चून, आपल्याला पत्ता न लागता.”  पाणिनी म्हणाला.
“ नाही सर, मी त्याच्याकडे सतत बघत होते.कोणतीच गोष्ट त्याने घेतली नाही.” सौम्या म्हणाली
“ नीट आठव.”  पाणिनी म्हणाला.
 सौम्या ने आपल्या स्मरण शक्तीला ताण दिला. “ त्या टेबलावरचे कागद त्याने बोटं पुसायला घेतले तेवढेच.”
“ त्या टेबलावरचे काहीतरी त्याला हवं होतं.आणि ते उचलण्यासाठी त्याने आपल्या हाताचे ठसे देण्याचं आणि नंतर बोटं पुसण्यासाठी  टेबलावरचा कागद घेण्याचं नाटकं केलं.”  पाणिनी म्हणाला.
“ आता तुम्हाला वाटत असेल तर खरंच असेल तसं. आपण काय करायचं आता?” –सौम्या
“ आपण गौतम पिसे ला पुन्हा भेटणार आहोत आणि  त्याच्याशी मनमोकळ्या गप्प मारणार आहोत.” पाणिनी म्हणाला.
ते तिथून लगेचच  आईना हॉटेल  ला फोन लावला.तेव्हा त्याला सांगण्यात आले की पंधरा मिनिटांपूर्वीच त्याने हॉटेल सोडलंय आणि कुठे जाणार आहे या बद्दल काही सांगितलेले नाही.
“ आता?” सौम्या ने विचारलं.
“आपण जाऊन येऊ त्या हॉटेलात.”  पाणिनी म्हणाला.
थोड्याच वेळात ते दोघे हॉटेलात आले.
“ तुमच्या हॉटेलात माझा मित्र गौतम पिसे उतरला होता, त्याला थोडया वेळेपूर्वी तातडीने हॉटेल सोडावे लागले त्यामुळे बिलाचे पैसे भरताना त्याने तपासले नाही पण आता त्याचा मला फोन आला की त्याच्या बिलामध्ये एका फोन कॉल चे मोठे बिल लावलं गेलंय.”  पाणिनी रिसेप्शनिस्ट ला म्हणाला.
“ एक मिनिट मी बघते पण आम्हाला नेहेमीचा अनुभव आहे की एकदा फोन वर बोलायला लागलं की माणसांना भान नाही रहात किती वेळ बोललो आपण याचं आणि बिल वाढत जाते.” – रिसेप्शनिस्ट म्हणाली.
“ तसं नाही,म्हणायचं मला. त्याने जो फोन केलाच नाही याचं बिल त्याला लावलं गेलं,असं त्याचं म्हणणं आहे.”
“ कुठे लावला होता? ” रिसेप्शनिस्ट ने विचारलं.
“ भांडवा मधील कुणाचा तरी नंबर.”  पाणिनी म्हणाला.
रिसेप्शनिस्ट ने शांतपणे आपल्या कप्प्यातून फोन चे बिल काढले आणि पाणिनी पुढे ठेवले.  “ हा पहा नंबर. त्याने तीन वेळा या एकाच नंबर ला फोन लावले होते.”
“ त्यांची खात्री आहे की त्याने दोनदाच लावला होता.”  पाणिनी म्हणाला.
“ आमचं रेकोर्ड तीन वेळा फोन केला असं दाखवतंय. तरी सुध्दा मी पुन्हा तपासते.”
“ थँक्स ”  पाणिनी म्हणाला.
ती आपले रेकोर्ड तपासायला गेली तो पर्यंत पाणिनी ने तो फोन नंबर टिपून घेतला.त्या बिलावरून त्याच्या हेही लक्षात आलं की गौतम पिसे त्या हॉटेलात चार तासच थांबला होता.
रिसेप्शनिस्ट परत त्याच्या कडे आली.  “सर्व चार्जेस बरोबर आहेत मिस्टर. त्याने एकूण तीन वेळा फोन केला.एक हॉटेलात आल्या आल्या.एक संध्याकाळी सहाच्या सुमाराला.आणि एक हॉटेल सोडताना.”
“ ठीक आहे तुम्ही एवढं म्हणताय तर बरोबर असेलच. मी सांगतो त्याला की मी स्वतः येऊन तुमच्याशी बोलून खात्री केली म्हणून.”  पाणिनी म्हणाला. आणि सौम्या ला घेऊन बाहेर पडला.
“ सर, तुम्ही तिच्याशी बोलत असतांना मी तो नंबर डिरेक्टरी मधे शोधला.” सौम्या म्हणाली आणि पाणिनी चाटच पडला.
“ अग, पण फोन नंबर वरून नाव कसं शोधालंस? ”  पाणिनी ने विचारलं.
“ मी मरुशिका क्लब चे नाव प्रथम डिरेक्टरी मध्ये शोधले.त्या यादीत मरुशिका क्लब नंबर तीन चा हा नंबर आहे.” सौम्या म्हणाली
“ ग्रेट सौम्या ! तुझ्या हुशारीला दाद द्यायलाच हवी.”  पाणिनी म्हणाला.
सौम्या काही बोलली नाही.
“ आता जरा विचार करुया सौम्या. त्याने सहा वाजता एक फोन केला आणि नंतर हॉटेल सोडताना एक. आता यातून काय अर्थ निघतो सांग.”  पाणिनी म्हणाला.
“ शेवटचा फोन हे कळवायला केलं असेल की त्या घरी त्याची गाठ स्वतःला सिया माथूर म्हणवणाऱ्या बाईशी पडली आणि स्वतःला गुप्तहेर समजणाऱ्या ....” सौम्या आपलं तर्क सांगू लागली.
“ एवढी खात्री देऊ नको सौम्या.”  पाणिनी म्हणाला.
“ तुम्हाला काय वाटतंय मग? शेवटचा फोन काय सांगण्यासाठी केलं असेल त्याने? ”
“ कदाचित हे सांगण्यासाठी की सौम्या सोहोनी ने आपण सिया माथूर असल्याचे नाटकं केलं आणि ख्यातनाम वकील पाणिनी पटवर्धन ने आपण गुप्तहेर असल्याचं भासवून तिथले ठसे घेण्याचं काम केलं.”
“ नाही हो सर, मला नाही वाटत तसं कारण दार उघडताच त्याने जेव्हा आपल्याला पाहिलं तेव्हा तो पुरता हबकूनच गेला होता.”—सौम्या
“ तो हादरला होता हे नक्की पण सुरुवातीला. कारण  आत कोणी असेल याची त्याने कल्पनाच केली नव्हती.पण तुझी ओळख मी सिया माथूर अशी करून दिली, अप्रत्यक्षपणे, आणि मी पोलीस असल्याचं भासवलं तेव्हा तो अजूनच टरकला असेल पण त्याने नंतर जरा स्वतःला सावरलं असेल असं मला वाटतय. तो जसजसा विचार करायला लागला तसतसं. त्याला तिथून जे हवं होतं ते कसं मिळवायचं याच विचारात तो होता.”  पाणिनी म्हणाला.
“ म्हणजे आपण तिथून कसं सटकायचं याचा तो विचार करत असावा?”—सौम्या
“ नाही, ते तो सहज करू शकत होता म्हणजे दारात उभा असतानाच तो पळून जाऊ शकत होता, अगदी बाहेरून कडी लावून आपल्याला कोंडून तो जाऊ शकलं असता, किंवा तिथून तो पोलिसांना फोन करू शकलं असता पण त्याने या दोन्ही गोष्टी केल्या नाहीत कारण तसं केलं असतं तर त्याला तिथून जे न्यायचं होतं ते नेता आलं नसतं. नाही सौम्या, त्याला हवं ते मिळालं आहे आणि ते मिळालय हे  मरुशिका ला सांगायलाच त्याने शेवटचा फोन केलं असणार.”  पाणिनी म्हणाला.
“शाई लागलेली बोटं पुसण्यासाठी टेबला वरचा कागद घेण्याच्या मिषाने त्याने टेबला वरचे जे कागद उचलले ते मासिकाच्या वर्गणी बाबतचे कागद होते की ...  ” –सौम्या पुटपुटली.
“ आपण जाऊन बघू तिथे, बोटं पुसून झाल्यावर केराची टोपली कागद टाकायला मिळाली नाही असं भासवून त्याने आपल्या खिशात टाकले.अगदी सहज करतोय असे भासवून. तेच कागद त्याला हवे असणारे कागद असू शकतात सौम्या.”  पाणिनी म्हणाला.
“ तो पोलिसांना आपल्या बद्दल निनावी फोन करून टिप देऊ शकणार नाही का?” –सौम्या ने विचारलं.
“ देऊ शकेल टिप.”  पाणिनी म्हणाला.
“ तरीही तुम्ही म्हणताय की आपण पुन्हा तिथे जाऊन तपासणी करू म्हणून?”
 “ जावंच लागेल आपल्याला.”  पाणिनी म्हणाला.
“ पण सर, फार धोकादायक आहे ते.”
“ आपण आत जाण्यापूर्वी सर्वतोपरी दक्षता घेऊ सौम्या. पटकन आत शिरू आणि जी तपासणी करायची आहे ते उरकून लगेच बाहेर येऊ. ”
“ मरुशिका क्लब वर केले गेलेले तीन फोन्स ! काय वाटतंय तुम्हाला सर? ” सौम्या ने विचारलं.
“ गौतम पिसे इथे या शहरात आला असणार,त्याने तेव्हा प्रथम सगळं अलबेल आहे ना, पुढे जायचंय ना हे विचारण्यासाठी त्याने पहिल्यांदा फोन केलं असावा आणि पुढे जा असा आदेश त्याला मरुशिका कडून मिळाला असावा. त्या नंतर तो आपण येण्यापूर्वी त्या अपार्टमेंट मधे आला असावा आणि त्याला जे हवंय ते शोधण्यासाठी त्याने सगळं सामान उलथ पालथ घातलं असणार आणि त्याला ते सापडलं नाही म्हणून ते कळवण्यासाठी दुसरा फोन केला असावा किंवा त्याला हवं ते मिळाले असेल आणि ते कळवण्यासाठी त्याने दुसरा फोन केलं असेल, त्यावेळी मरुशिका ने त्याला विशिष्ठ पत्रा बद्दल विचारले असेल आणि त्याला सापडलेल्या वस्तू मधे ती नाहीत म्हंटल्यावर मरुशिका ने त्याला पुन्हा अपार्टमेंटमध्ये जाऊन ती पत्र आणायचा आदेश दिला असेल.आणि त्यासाठी तो आला असेल तेव्हा नेमके आपण तिथे असल्याने त्याची अडचण झाली असेल.पण आपल्या नकळत त्याने शाई पुसण्यासाठी टेबला वरची पत्र कागद म्हणून वापरली आणि त्याचा बोळा टाकायला केराची टोपली नाही  म्हणून स्वतःच्या खिशात टाकून आपल्या समोर निघून गेल्यावर  आपला पराक्रम सांगण्यासाठी मरुशिका ला तिसरा फोन केला असेल.आणि  हॉटेल सोडून नोघून गेला असेल.माझ्या निरीक्षणा नुसार टेबल वरच्या पत्रा पैकी एक मासिकाच्या वर्गणी बद्दल होतं, ते मी माझ्या खिशात टाकलं, एक, मॉडेल एजन्सी चं होतं आणि एक रियल इस्टेट बद्दल म्हणजे कोणत्यातरी मिळकती बाबत होतं ”  पाणिनी म्हणाला.
बोलता बोलता ते त्या अपार्टमेंट जवळ पोचले.
“ तू बाहेरच थांब सौम्या. मी एकटाच आत जातो, मला आत काही झालं तर मला सोडवायला तू बाहेर हवीस.”  पाणिनी म्हणाला.
पाणिनी पटवर्धन  आपल्या जवळची किल्ली दाराला लावून आत  शिरला दिवे लावले.टेबलावर आता फक्त रियल इस्टेट कंपनीचं पत्र होतं. म्हणजेच मॉडेल एजन्सी चं पत्र तिथून गायब झालं होतं, म्हणजे गौतम ने ते नेलं असावं.दिवा बंद करायची तसदी न घेता पाणिनी नी झपाट्याने तिथून बाहेर पडला . आपल्या मागे दार ओढून बंद केलं आणि रस्यावर सौम्या कडे आला. त्याच वेळी सायरन वाजवत पोलिसांची गाडी आली. पाणिनी ने सौम्या ला पटकन बाजूच्या गल्लीत नेलं. गाडीतून पोलीस उतरले आणि त्यांनी सिया मथुर च्या अपार्टमेंट ची बेल वाजवली.
( प्रकरण १८ समाप्त)

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel