( ही कथा  संपूर्णपणे काल्पनिक आहे.प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा.) 

तुमच्या गुन्ह्याला क्षमा नाही. मी त्यांना सांगितले.रात्र होण्याची वाट पाहत होतो.त्यांचे मला जे कांही करायचे होते त्यासाठी गावाबाहेर जाणे जरुरीचे होते.रात्री अकरा वाजता त्यांना मी धरून धरून लिफ्टपर्यंत नेले.मोटारीत बसून गावाबाहेर टेकडीजवळ गेलो.बरोबर कात्री सुरा नेला होताच. 

टेकडीजवळ कांही बाके कॉर्पोरेशनने टाकली होती. त्यातील एका बाकावर त्यांना बसविले.

मी आता त्यांचे काय करणार म्हणून भीतीचे भाव त्यांच्या चेहऱ्यावर होते.

त्यांना कांहीही हालचाल करता येत नव्हती.मी मारलेल्या फवाऱ्याने बेमालूम काम केले होते.

मी त्यांना म्हणालो.मी तुमचे जे कांही करणार आहे ते आता तुम्हाला कळेलच.

जर तुम्ही माझे नाव कुणालाही सांगाल तर मी तुम्हाला जिवंत सोडणार नाही.

मी त्यांचे कान,नाक, जीभ व  प्रायव्हेट पार्ट कापून टाकला!!    

कदाचित अतिरक्तस्त्रावाने त्यांचा तिथेच मृत्यू झाला असता.

कदाचित ते बेशुद्धावस्थेत कुणाला सापडले असते.

त्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये भरती केले असते.कदाचित ते वाचलेही असते.

मी त्यांना टेकडीवर नेल्याच्या सर्व खुणा पुसून टाकल्या होत्या.मी हातमोजे घातले होते.बुटावर जाड मोजे चढवले होते.कुठेही ठसे उठणार नाहीत याची काळजी घेतली होती.  

दुसऱ्या दिवशी अरविंद कुणाला तरी विचित्र अवस्थेत मेलेला सापडेल अशी माझी कल्पना होती.त्याच्या आयुष्याची दोरी चिवट होती. त्याच्या आयुष्यात अजून कांही दिवस महिने वर्षे लिहिलेली होती.प्रचंड रक्तस्राव झालेल्या अवस्थेत तो कुणालातरी सापडला.त्याने पोलिसांना फोन केला.पोलिसानी त्याला सरकारी हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केले.त्याची अशी अवस्था कुणी केली याबद्दल चौकशी सुरू केली.अरविन्दने कुणाविरुद्ध तरी लैंगिक गुन्हा केलेला असला पाहिजे त्यामुळेच त्याला अशी शिक्षा देण्यात आली याबद्दल पाेलिसांची खात्री पटली होती.गेल्या महिन्याभरात जिथे जिथे स्त्रियांवरील अत्याचाराच्या बलात्काराच्या घटना घडल्या होत्या, त्याची चौकशी पोलिसांनी सुरू केली.

अरविंद हॉस्पिटलमध्ये अत्यवस्थ अवस्थेत होता.त्याचा प्रचंड रक्तस्राव झाला होता.तो यातून बरा होईल की नाही याबद्दल डॉक्टर  साशंक होते.अरविंद संबंधी भयानक बातमी कळताच सुषमा मॅडम गावाहून लगेच परतल्या होत्या.पोलिस त्यांची चौकशी करून  गुन्हेगाराचा माग येण्याचा प्रयत्न करीत होते.पोलिसांना उपयुक्त होईल अशी कांही माहिती सुषमा मॅडम देऊ शकल्या नाहीत.    

अपराधी,ज्या स्त्रियांवर अत्याचार झाला त्यांच्या नातेवाईकांपैकीच असला पाहिजे याची पोलिसांना खात्री होती.त्याशिवाय प्रायव्हेट पार्ट कापून टाकण्याची शिक्षा दिली गेली नसती.पोलिस अर्थातच माझ्याकडे आले.त्यांचे येणे मला अपेक्षितच होते.मी पूर्ण तयारीतच होतो.अरविंदचे नि माझे स्नेहाचे असलेले संबंध त्यांना सांगितले.ते माझ्याकडे अधूनमधून येत असत आणि मी त्यांच्याकडे जात असे याची खात्री त्यांनी करून घेतली.ज्या दिवशी कालिंदीवर अत्याचार होवून तिचा भयानकरित्या खून झाला, तेव्हां मी प्रथम अरविंदरावाना बोलावले होते हेही त्यांना सांगितले.कालिंदी सुषमाकडे डिफिकल्टी विचारण्यासाठी जात असे याची त्यांनी खात्री करून घेतली. सुषमाने माझ्याबद्दल कांहीही संशयास्पद सांगितले नसावे.संभाव्य गुन्हेगाराच्या यादीतून मी मुक्त झालो.

अजून दोन गुन्हेगारांना मला शिक्षा द्यायची होती.दोघेही माझ्याशी संबंधित होते.एक जण सोसायटीचा रक्षक होता तर दुसरा माझ्याकडे दूध पिशव्या टाकणारा पोरगा होता.मला पूर्ण काळजीने त्यांना शिक्षा करावी लागणार होती.अन्यथा मी पोलिसांच्या पंज्यात अडकलो असतो. 

कोणतीही हालचाल न करता कांही दिवस शांत राहण्याचे  मी ठरविले.वाघ ज्याप्रमाणे सावजावर झडप घालण्यापूर्वी दबा धरून बसतो तसा दबा धरून मी बसलो होतो.जवळजवळ तीन महिन्यांनी अरविंद घरी आला.त्याचे काय करण्यात आले त्याची सर्वांनाच माहिती झाली होती.जो तो त्यच्याकडे एखाद्या कधीही न पाहिलेल्या जंगली जनावराप्रमाणे रोखून पाहत असे.त्यांनी कांहीतरी दंडनीय लैंगिक गुन्हा केला असलाच पाहिजे त्याशिवाय अशी शिक्षा त्याला होणार नाही याची सर्वाना खात्री होती.मुली स्त्रिया त्यांच्याकडे विचित्र नजरेने पाहत होत्या.पुरुषही त्यांच्याकडे तोच तो अशा नजरेने   पाहात असत.सुषमाचे व त्यांचे संबंध अगोदरसुद्धा विशेष स्नेहाचे नसावेत.कदाचित सुषमा नाइलाजाने त्यांच्याबरोबर राहत असेल.

अजून अरविंदची तब्येत सुधारली नव्हती.ऑफिसमध्ये रुजू होण्यासाठी त्याला अजून कित्येक महिने लागले असते.सुषमाही त्याची विशेष देखभाल करीत नसावी. सुषमाकडेही लोक विचित्र नजरेने पाहत होते.सुषमा अरविंदकडून  घटस्फोट घेणार अशा वावडय़ा उठत होत्या.अरविंदला जिवंत राहणे दिवसेंदिवस त्रासदायक होत होते.नाक कान कापल्यामुळे तो विचित्र दिसत होता.जीभ कापल्यामुळे त्याला बोलता येत नव्हते.सुरुवातीला त्याला कांही खाता पिताही येत नव्हते.सर्व कांही घशात नळी टाकून किंवा सलाईन मार्फत द्यावे लागत होते.आता तो तोंडाने खाऊ शकत होता.परंतु त्याला जेवताना अतिशय त्रास होत असे.अशा जगण्याला कंटाळून एक दिवस तो गच्चीवर गेला.आणि त्याने खाली उडी मारली.त्याच क्षणी त्याचा मृत्यू झाला.

अरविंदने केलेला गुन्हा भयानक होता. त्याला मिळालेली शिक्षाही तशीच होती.अरविंदचे वय, त्यांचे माझ्याशी असलेले स्नेहसंबंध,कालिंदीने त्याला काका म्हणून मानणे,या सर्व गोष्टी लक्षात घेता त्याच्या गुन्ह्याचे स्वरूप जास्तच गंभीर होत होते.  

मी आता सुरक्षा रक्षक गंगारामचा नंबर लावला होता. गंगारामला सर्वांच्या देखत मोटारीतून बाहेर नेणे धोक्याचे होते.तो माझ्याबरोबर बाहेर गेला हे अनेकजणांनी सांगितले असते.एक दिवस मी ऑफिसमधून घरी येत असताना गंगाराम लगबगीने कुठेतरी जाताना दिसला. वारयोषितांच्या वस्तीच्या दिशेने तो जात होता.मी त्याच्या पाठोपाठ मोटार नेऊन त्याला हाक मारली.मला पाहताच तो दचकला.मी त्याला चल मोटारीत बस तुला घरी सोडतो असे सांगितले.तो कुठे जात आहे ते माझ्या लक्षात आल्याचे अजिबात दर्शविले नाही.तो मुकाटय़ाने मोटारीत बसला.मी मोटार गावाबाहेर घेतली.आपण इकडे कुठे जात आहोत असे त्याने मला विचारले.इथे जवळच माझे एक काम आहे ते झाले की आपण घरी जाऊ असे मी त्याला सांगितले.तो मुकाटय़ाने गप्प बसून राहिला.अधूनमधून तो माझ्याकडे संशयी नजरेने पाहत होता.मी मोटर चालवता चालवता स्प्रे हातात घेऊन त्याच्यावर मारला.त्याच्या अगोदर मोटार उभी करून मी चेहऱ्यावर मास्क बांधला होता.त्याने मला आता मास्क लोक लावीत नाहीत. करोना गेला ना? मग तुम्ही मोटारीत असताना मास्क कशाला लावता असे विचारले.मला धुळीची अॅलर्जी झाली आहे. पेट्रोलच्या वासाचा मला त्रास होतो.आता जास्त त्रास होऊ लागला म्हणून मी मास्क लावला असे त्याला सांगितले.गंगारामवर स्प्रे मारल्यावर त्याचा परिणाम माझ्यावर होऊ नये म्हणून मी मास्क लावला होता.

स्प्रे मारताच त्याच्या परिणामाने तो जवळजवळ निर्जीव   होऊन पुढच्या सीटवर लवंडला होता.गावापासून जवळच एक किल्ला होता.त्या किल्ल्यावर मोटार मुश्किलीने जाऊ शकेल असा कच्चा   रस्ता होता.मी मोटार त्या किल्ल्यावर घेतली.त्या किल्ल्यावर एक कडा कडेलोटाचा कडा म्हणून ओळखला जात होता.जुन्या काळी गुन्हेगाराला देहांताची शिक्षा फर्मावल्यावर कडेलोटाची,फाशीची, किंवा सुळावर चढविण्याची शिक्षा फर्मावली जाई.कडेलोटाच्या कडय़ावर आता सुरक्षितता म्हणून बर्‍यापैकी उंच कठडा बांधला होता.कठडा जवळजवळ पांच फूट होता.

संध्याकाळचे सात वाजले होते.या वेळी किल्ल्यावर कुणीही येत नसे.किल्ला तसा पडित अवस्थेत होता.गंगाराम फवार्‍याच्या परिणामामुळे आता अर्धमेल्या अवस्थेत होता.त्याला धरून चालवत चालवत कड्याच्या टोकापर्यंत नेला.कठड्याला टेकवून त्याला बसता केला.गंगाराम सिगरेट ओढतो हे माला माहीत होते.नेहमी तो विडय़ा ओढीत असे. सिगरेट शिलगवून मी ती त्याच्या ओठात ठेवली.निष्प्राण डोळ्यानी तो माझ्याकडे पाहात होता.त्याला बहुधा मी इथे कां आणले ते कळले असावे.

मी त्याच्याशी बोलू लागलो.गंगाराम तू रक्षक आहेस.संकुलातील लोकांचे रक्षण करावे अशी तुझ्याकडून अपेक्षा आहे.संकुलातील मुले, लहान मोठी माणसे,वृद्ध माणसे,तुझ्याकडे विश्वासाने पाहतात.तू रक्षक असून भक्षक झालास.तू वेश्यांकडे जात असावास.आतासुद्धा तू तिकडे जात  असावास.तिथे तुझी अरविंदरावांशी व सुभाषशी गाठ पडली असावी.त्यातून तुमच्यामध्ये मैत्री निर्माण झाली.ती बदनाम गल्ली हाच तुमच्यामध्ये समान धागा होता.

तुम्ही माझ्या मुलीला कालिंदीला भक्ष्य  करण्याचे ठरवले.अरविंदरावांची आमच्याशी असलेली ओळख तुम्ही या कामासाठी वापरली.त्या माझ्या लहान मुलीचे तुम्ही लिंगपिसाटानी  अनन्वित हाल केले.मी तुम्हा तिघांना बरोबर ओळखले.अरविंदला मी त्याच्या गंभीर गुन्ह्याची तशीच गंभीर शिक्षा दिली आहेच.त्याला जीवन असह्य झाल्यामुळे त्याने गच्चीतून उडी मारून त्याच्या जीवनाचा शेवट केला.

हा कडेलोटाचा कडा आहे हे तुला माहीत आहेच.तू केलेला गुन्हा गंभीर आहे.मी तुला कडेलोटाची शिक्षा फर्मावली आहे.तुला तसाच कड्यावरून खाली फेकून दिला तर तुझ्यावर दया केल्यासारखे होईल.त्या अगोदर तुला आणखी कांही शिक्षा करण्याचे माझ्या मनात आहे.हे शब्द उच्चारताच त्याचा हात त्याच्या प्रायव्हेट पार्टवर गेला.अरविंदचे मी काय केले ते त्याला माहीत होतेच.आता मी त्याचे तसेच करणार असे त्याला वाटले.माझ्या मनात दुसरीच कांही योजना होती.

मी बरोबर एक जाड रूळ आणाला होता.प्रथम मी तो रूळ त्याच्या हातावर मारून त्याच्या हातांची हाडे मोडून टाकली.त्याचे हात लुळे पडले.खांद्यापासून लोंबू लागले.असह्य वेदनांनी तो गुरासारखा ओरडू लागला.त्याच्यावर फवाऱ्याचा परिणाम झालेला असल्यामुळे त्याला ओरडता सुद्धा येत नव्हते.तोंडातल्या तोंडात तो गुरगुरल्यासारखा आवाज करीत होता.मी थोडा वेळ तसाच जाऊ दिला.होणार्‍या असह्य वेदनांनी तो विव्हळत होता.नंतर त्याच रुळाचा वापर करून मी त्याचे दोन्ही पाय मोडून टाकले.

*लोळागोळा झालेल्या अवस्थेत तो माझ्यासमोर पडला होता.*

*त्याला नंतर उचलून मी कठड्यावरून दरीत फेकून दिला.*

* त्या अगोदर मी खिशातून गावठी दारुची बाटली काढली.त्यातील बरीच त्याला पाजली.उरलेली त्याच्या अंगावर शिंपडली.*

*दारूच्या नशेत तो कड्यावरून खाली पडला.किंवा येथे त्याचे मित्र व तो दारू पार्टीसाठी जमले होते.*

*त्यातून बाचाबाची, भांडण, मारामारी आणि शेवटी गंगारामला दरीत फेकून देण्यात आले असावे.असे एकूण चित्र निर्माण केले.*

*आणि शांतपणे घरी निघून आलो.*

*माझ्या मोटारीचे,किंवा बुटाचे ठसे राहणार नाहीत याची काळजी घेतली होती.*

*हातमोजे तर मी घातले होतेच.त्यामुळे ठसे उमटण्याची शक्यताच नव्हती.*

*आता फक्त सुभाष  शिल्लक राहिला होता.*

(क्रमशः)

१६/५/२०२२©प्रभाकर  पटवर्धन 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel