आमच्या महाराष्ट्रांत, त्या पुणें शहरांत सोन्यामारुतीच्या पुढें सत्याग्रह सुरु झाला आहे. धर्मासाठीं मेलें पाहिजे. मग महिनाभर तुरुंगांत जाणें तें काय! परंतु मी जों जों ऐकतों तों गोत्यांत पडतो. कोणी म्हणतात, हा खरा सत्याग्रह नाही. कोणी म्हणतात, ही स्वत:ची प्रतिष्ठा आहे. कोणी तोंडाने म्हणतात कीं, तेथें सर्वांनी गेलें पाहिजे. खरे काय ? त्यागाची गोष्ट निघाली कीं माझे हृदय उचंबळते! हे क्षुद्र शरीर महान् ध्येयासाठी फेकून द्यावें असें माझ्या मनांत अहोरात्र येत असतें. सोन्यामारुतीसमोर जाऊन आपणहि सत्याग्रह करावा, तेथें लाठी खाऊन डोकें फुटावें, हा जीवनाचा नारळ देवासाठीं फुटावा, असें वाटत आहे. सोन्यामारुतीसमोर जावयास मी अधीर आहे, पुण्यांतील होळींत सामील व्हावयास मी उतावीळ झालों आहें. पद्मिनीची चिता पेटली असतां कोण रजपूत स्त्री मागें राहील ? हिंदु धर्मांसाठीं त्यागाचा यज्ञ पेटला असतां कोण घरांत बसेल ? कोण गाणें ऐकेल ? गोड खाईल ? वेदपुरुषा! पुणें पेटलें आहे ना सारे ? वर्तमानपत्रांत कांहीं येत नाही. सांग, त्या लोकमान्यांच्या पुण्याची पुण्याई मला सांग. त्यागाच्या कथा ऐकून माझे कान कृतार्थ होऊं देत! धर्मांचे वैभव ऐकून माझा आत्मा डोलूं दे. वेदपुरुषा, सांग !

वेदपुरुष
: काय सांगू बाळ ? बहुतेक सारें पुणें मजेंत आहे. तुकाराम बोलपटाचा बत्तिसावा आठवडा चालला आहे. लग्नाचा मोसम जोरांत सुरु झाला आहे, थाटानें वराती निघत आहेत. नळे, चंद्रज्योति, झाडें  पेटवलीं जात आहेत. उसाचीं गु-हाळें सुरु आहेत, रसपानें चाललीं आहेत, समारंभ होत आहेत. वसंतव्याख्यानमालेंत चर्चा होत आहेत. पेशव्यांच्या पर्वतीवर राज्यारोहणाची आरास केली जात आहे. युनियन जॅक फडकत आहे. सरकारी मंत्र्यांना लोकमान्यांच्या वाड्यांत मेजवान्या होत आहेत. तेथें आरास केली जात आहे. हारतुरे, अत्तर, गुलाब सारें होत आहे. सोन्यामारुति! त्याची कोणाला आहे फारशी आठवण ?

वसंता :
काय ? केसरीलाहि आठवण नाहीं?

वेदपुरुष : सोन्यामारुतीपेक्षां सर्व राष्ट्रांचा अपमान करणार्‍या थोर पुरुषांची पूजाअर्चा करण्यांत केसरीकंपू अधिक मग्न झाला आहे. पस्तीस कोटी लोकांना किडे म्हणणार्‍या अहंकारी पुढार्‍याची तेथें पवित्र पूजा होत आहे.

वसंता : पस्तीस कोटी लोक किडे ? आमचे लोकशाही पक्षाचे सनातनी पुढारी असें म्हणतात ?

वेदपुरुष : ते महान् मंत्री म्हणे नगरला गेले होत. तेंथें हजारों लोकांनी त्यांचें काळ्या निशाणांनी स्वागत केलें. त्या हजारों लोकांना उद्देशून हे महान् मंत्री आपल्या खोलींत गोंडे घोंळणार्‍यांजवळ म्हणतात म्हणाले, ''या वानरांची काडीइतकीहि किंमत नाहीं हो. हीं काळीं निशाणें माझे बूट पुसायला उपयोगी पडतील. कोल्हयांच्या कुईकुईनें सनातनी सिंहाचा रोमहि वांकडा होत नाहीं!'' हे शब्द जर खरे असतील तर केवढी नीच आहे ही वृत्ति ?

वसंता : तेल्यातांबोळ्यांचे पुढारी लोकमान्य. त्यांच्या पवित्र वाड्यांत बहुजनसमाजाची नालस्ती करणार्‍याची पूजा ? काय सांगतां तुम्ही ?

वेदपुरुष : खरे तेंच मी सांगत आहे. ज्या वाडयांत लोकमान्यांनी मोतीलाल घोष यांना प्रेमानें मिठी मारली, जें दृश्य पाहून हजारों प्रेक्षक सद्गदित झाले, ज्या वाडयांत देशबंधु दास, बिपिनचंद्र पाल यांच्या विभूति लोकमान्यांना भेटावयास आल्या, त्या वाड्यांत राष्ट्रांचा तेजोवध करणार्‍यांची आज पूजा होत आहे

वसंता : कुत्रें भाकरीसाठीं मरतें. राष्ट्रें केवळ भाकरीच्या भिकार चतकोरनितकोरासाठीं स्वाभिमान सोडीत नसतात. स्वाभिमान न सोडतां मिळेल तें राष्ट्रांने घेतलें पाहिजे व स्वाभिमानानें उरेलेलें मिळविलें पाहिजे राष्ट्रें स्वाभिमानानें जगतात, भाकरीनें नाहीं.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel