वसंता, वेदपुरुष खालीं उतरलें. तिकिटें देऊन ते निघून गेले.

वसंता : कोठें जायचें ?

वेदपुरुष : आपलें ठरलेलें थोडेंच आहे! पाय नेतील तिकडे जाऊं.

वसंता : या रस्त्यानें चला जाऊं.

वेदपुरुष : चल.

वसंता : संध्याकाळ ज्या गांवाजवळ होईल तेथें मुक्काम करूं.

वेदपुरुष : तुला गाणीं येतात का! पोवाडे येतात का ?

वसंता : हो. कितीतरी गाणीं मला येत आहेत.

वेदपुरुष : त्या गावांत रात्रीं तूं म्हण. लोकांना बरें वाटेल.

वसंता : खेड्यांतील लोकांना कोणी कांहीं दोन शब्द सांगितले तरी ते त्यांना नवीनच वाटतात.

वेदपुरुष : त्यांच्याकडे कोण जातो ? विचाराचे वारे पसरवणारे आहेत कोठें ? गांवोगांव बिचार गेले पाहिजेत. पुन:पुन्हा गेले पाहिजेत. वानरांमध्यें राम-लक्ष्मणांनीं राहिलें पाहिजे. खेड्यापाड्यांतील लोक विचारासाठीं भुकेले आहेत.

वसंता : त्याचा अनुभव मागें आम्हांला आला होता निवडणुकीच्या वेळेला. एका खेड्यांत आम्ही गेलों. त्या गांवांत एक म्हातारी मेली होती. तिरडी बांधणें चाललें होतें. परंतु इतक्यांत आम्ही गेलों. आमचें शिंग फुंकले. दवंडी झाली. लोक म्हणाले '' आधीं गांधीची सभा. म्हातारीला मग नेऊं. नाहीं तरी मेलीच आहे !'' आम्हांला तें पाहून किती आनंद झाला ? दुसरीकडे असाच एक अनुभव आला. नदीतीरावर क्रिया चालली होती. पिंड तयार होत होते. आमचा झेंडा पाहून त्यांच्यांतील एक मनुष्य पुढें येऊन म्हणाला, ''आम्हांला येथें सांगा दोन शब्द.'' मीं म्हटलें, ''तुम्ही दु:खांत आहांत.'' ते गृहस्थ म्हणाले, ''म्हणून तर आम्हांला आनंद देणार्‍या काँग्रेसच्या कथा सांगा.'' ते शब्द मी विसरणार नाही.

वेदपुरुष : आनंद देणारें त्यांना पाहिजे आहे. त्यांच्या दु:खमय, निराशामय जीवनांत सुखाचा किरण देणारें कोणी तरी त्यांना पाहिजे आहे. आशेचा, सामर्थ्याचा, उत्साहाचा संदेश त्यांना पाहिजे आहे. परंतु कोण जातो त्यांच्याकडे ? त्यांना लुटायला सारे तयार आहेत. परंतु त्यांना द्यावयाला कोण तयार आहे ?

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel