वेदपुरुष : साळुंख्या फार धीट असतात! त्यांचा आवाजहि खणखणीत असतो.

वसंता : असेंच विश्वांत फिरत रहावें असें कधीं कधीं मला वाटतें! झाडाला पाला खावा, नदीचे पाणी प्यावें, सृष्टीचें वैभव पहावें, विचारावें!

वेदपुरुष : अवधूत निराकारी । तयाची तिन्ही लोकीं फेरी ॥

वसंता : परंतु असें वाटणें कायमचें टिकत नाहीं, त्या त्या वेळेपुरती ती ती भावना उत्कट असते, तो तो विचार तीव्र असतो.

वेदपुरुष
: ज्याच्या सर्व जीवनांत एकच भावना, एकच विचार, एकच प्रतिभा, एकच उत्कटता सदैव भरून राहिलेली दिसेल, तो परम थोर होय. स्थिरता हा महान् गुण आहे. एक प्रकारची त्यांत नि:शंकता असते.

वसंता : स्थिरता हें जडतेचेंहि लक्षण असूं शकेल. स्थिरता म्हणजे स्थाणुता.

वेदपुरुष : तें ठरविणार कोण ? ज्याचे त्यानेंच ठरवावें.

वसंता : तो मनुष्य आपणाकडे कां धांवत येत आहे ?

वेदपुरुष : आपण थांबूं.

वसंता : या झाडाखालीं उभें राहूं.

वेदपुरूष
: ही शालजोडीं घेऊन जा.

वसंता : ही कोणाची ?

वेदपुरुष : एक गांधी मार्ग आला होता. त्याला त्या पलीकडच्या गांवांत रात्री पाटलानें राहूं दिलें नाही. तो हिंडत आला माझ्या झोपडीजवळ. माझ्या झोंपडींत तो निजला. पहांटे उठून तो गेला. परंतु त्याची शाल येथें राहिली. तो गांधी कोठें गेला आम्हांला काय माहीत ? मीं ती शाल नीट ठेवून दिली. पोरांना सांगून ठेवलें कीं कोणी गांधी आला तर ध्यान ठेवा. तुम्हांला त्यांनी पाहिलें म्हणून मी आलों.

वसंता : परंतु ही आमची नाहीं.

भिल्ल : तुम्हांला ते कोठें तरी भेटतील. तुमच्यांतलेच ते असतील.

वसंता : त्यानें मुद्दाम तुझ्यासाठीं ती ठेवली असेल. घे ती तुला.

भिल्ल : नको रे दादा. गांधींच्या लोकांना कोणी उतरूं देत नाहीं, झोंपूं देत नाहीं. त्यांच्याजवळ ही असूं दे.

वसंता : पण मी त्यांना कोठें शोधू ?

भिल्ल : तें मी काय सांगू ? पण तुम्ही भाऊ घेऊन जा.

वसंता
: बरें.

भिल्ल : गांधीची चळवळ पुन: सुरू होणार वाटतें ?

वसंता : कदाचित् होईल.

भिल्ल : तुम्हांला यश येवो. भारी जुलूम. नदीच्या वाळवंटांत आम्ही टरबुजें खरबुजें लावतों. परंतु त्याच्यावरहि किती कर! मध्येंच पाऊस पडून हीं टरबुजें वाहून गेली. परंतु कर भरावा लागतोच. गरिबांचा कोणी नाही.

वसंता : बरें. आम्ही जातों.

वेदपुरुष
: ''गरिबांचें कोणी नाहीं'' हे शब्द सर्वत्र ऐकूं येत आहेत. ''आम्ही उठून हे अन्याय दूर करूं'' असे शब्द सर्वांच्या तोंडून कधीं ऐकावयास मिळतील ? हे गरीब वानर सोन्यामारूति केव्हां होतील ?

वसंता
: त्यांना राम भेटतील तेव्हां !

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel