वेदपुरुष : भीष्मांना मरणशय्येवर पाताळगंगेचें पाणी हवें होतें. दुर्योधनाच्या भरलेल्या पाण्याच्या झा-या त्यांनीं परत केल्या! हृदयांतील पाणी म्हणजे पाताळगंगेचें पाणी.

वसंता : हें हृदयपाताळांतील पाणी डोळ्यांच्या नळाबाहेर येत असतें व जीवाला समाधान होतें !

वेदपुरुष : परंतु अशा बिनवारशी लोकांसाठीं कोण रडेल ?

वसंता : ते पहा कांहीं विद्यार्थी येत आहेत. डॉक्टरहि आहेत बरोबर.

डॉक्टर : मेला वाटतें !

विद्यार्थी : सुटला बिचारा !

डॉक्टर : तें इंजेक्शन नसतें दिलें तर बरें.

विद्यार्थी : अनुभव आला.

डॉक्टर : दुसरे त्यामुळें वांचतील.

विद्यार्थी : चला.

डॉक्टर : खटारा येणार आहे. जाऊं दे.

वसंता : गेले हंसत हंसत !

वेदपुरुष : अति झालें नी हंसूं आलें.

वसंता : हिंदुस्थानांत मरणाचेंहि हंसें होत आहे !

वेदपुरुष : हिंदुस्थानचा मह्मत्युदेव हा खरा राजा आहे. वसंता! राष्ट्राचा सार्वत्रिक अध:पात झाला आहे. कोणत्याहि संस्था घ्या. तेथेंहि वशिले, गरीब-श्रीमंत, राव-रंक हे भेद आहेत. तेथेंहि सर्वासाठीं एक कर्तव्य नाहीं! सर्वत्र भेदांचा बुजबुजाट आहे. घाण आहे, दुर्गंधि आहे. तुम्हीं तरुणांनीं उठून ही घाण जाळली पाहिजे! सर्वत्र मंगल, समता व आनंद निर्माण करण्यासाठीं उठलें पाहिजे! हा तुमचा महान् धर्म! ही तुमची सोन्यामारुतीची पूजा!

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel