पहिला : त्या माझ्या मित्रानें पुनर्विवाह केला तेव्हां माझी आई त्याला बोलली. म्हणाली, ''येऊं नकोस आमच्या घरीं'', आतां आमच्याच घरीं हा प्रकार! ताईचा काय अपराध ?

दुसरा : त्या पुजार्‍याला जर पत्नीशिवाय दोन महिने राहतां येत नाहीं, तर तुझी ताई वर्षांनुवर्षें कशी बरें राहील ?

पहिला : तो पुजारी असें करील हें कोणाला माहीत होतें ? आमच्याकडे पूर्वीपासून तो आहे.

दुसरा : त्याची बायको माहेरीं झाली का बाळंत ?

पहिला : कोणाला ठाऊक ? आमच्या गळ्याला फांस लावला आहेन खरा.

दुसरा
: आणि आतां म्हणे सोन्यामारुतीच्या सत्याग्रहाला गेले आहेत !

पहिला : आतां चार महिने तोंड कशाला दाखवील !

दुसरा : तुझ्या ताईचें तूं पुन्हा लग्न लावून दे. सुखाचा संसार करील.

पहिला : परंतु आई आहे ना ?

दुसरा : तुझी आईहि आतां तयार होईल.

पहिला : नाहीं रे. त्यांना या काळोखातील गोष्टी एक वेळ खपतात, परंतु उघड मोकळेपणानें विवाह खपत नाहीं.

दुसरा : इतर पुष्कळशा जातींत म्होतूर आहे. परंतु ज्यांना ज्यांना श्रेष्ठ समजून घेण्याची इच्छा आहे, ते या गोष्टी टाळतात.

पहिला : खोटी श्रेष्ठता काय कामाची ?

दुसरा : आमच्या जातींत पुनर्विवाह नाहीं म्हणून आमची जात श्रेष्ठ असें हे लोक मिरवीत असतात! स्त्रियांच्या जीवनाच्या होळ्या पेटवून फुकाचा मोठेपणा हे संस्कृतिरक्षक घेत असतात !

पहिला : कारण त्यांना मरेपावेतों पुन:पुन्हां लग्न करण्याची सदर परवानगी असते! समाजांतील विषमतेची ही परम सीमा आहे !

दुसरा : पति मेल्यावर किंवा पत्नी मेल्यावर दोघांनी तसेंच व्रतस्थ राहणें हा सर्वोच्च आदर्श होय यांत शंका नाहीं. परंतु ज्यांना हे झेंपत नाहींत, त्यांच्यावर का ते लादावयाचे असतात ? ही लादालादीची संस्कृति कुचकामाची आहे. केशवपन करुन, भूषणें दूर करुन, साधीं लुगडीं देऊन, अंधारात ठेवून, मंगल समारंभांत न आणून, हृदयांतील विकारांचे बीज का मरणार आहे ? बाहेरचें हें कुत्रिम वातावरण कितीसें उपयोगी पडणार ? कच्च्या कैरीला उबवून उबवून पिकविण्याप्रमाणें पिवळी करण्याप्रमाणें हें आहे. यांत रस नाहीं, गोडी नाही, गंध नाहीं, स्वाद नाहीं! कांहीं नाहीं !

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel