5. प्रयाण

रामदासची सातवी यत्ता संपली; पुढे काय करावयाचं? एके दिवशी मुकुंदराव व तो रामपूरच्या नदीतीरी बोलत बसले होते. बहुळा नदीचा प्रवाह मोठा सुंदर दिसत होता. एके ठिकाणी लहानसा धबधबा पडत होता. ध्येयाला मिळवण्यासाठी नदी निःशंकपणे उडी घेत होती. स्वच्छ पाण्याचा फेस तेथे उसळत होता. नदीतील दिव्यता तेथे प्रकट होत होती.

''दगडधोंडयांशी टक्कर घेतल्याशिवाय ही दिव्यता दिसली असती का? नदीचं हे निर्मल यश बाहेर उसळत आहे. तिच्या त्यागातून हे वैभव प्रकट होत आहे. तिच्या मरणातून तिला अमर जीवन मिळत आहे.'' मुकुंदराव म्हणाले.

''ध्येयप्राप्तीसाठी मार्गावरील सर्व विरोधांवर निकराचा हल्ला चढवला पाहिजे.'' रामदास म्हणाला.

''मग तू तुझ्या ध्येयप्राप्तीचं काय ठरविलंस ! हिंदुस्थानातील सर्व मोठ-मोठे आश्रम पाहून येणार ना? निरनिराळया महान संस्थांतून थोडेथोडे दिवस राहून येणार ना? महात्माजींच्या तत्त्वाप्रमाणे चालणारे आश्रम पाहा. गुरुकुलं पाहा. रामकृष्ण परमहंसांच्या शिष्यांनी चालविलेल्या संस्था पाहा. गुरुदेव रवींद्रनाथांच्या विश्वभारतीत जाऊन तेथील वास घेऊन ये. जा. विशाल दृष्टीचा, मोठया मनाचा होऊन ये. विशाल भारताचा परिचय करून घे. विशाल भारतात ठायी ठायी कशी कामं चालली आहेत. ठिकठिकाणी कसे प्रश्न आहेत ते पाहा. बिहारमधील किसानांची संघटना बघ. कानपूर, कलकत्ता येथील कामगारांच्या पोलादी संघटना पाहून घे. नवीन ओळखी जोड. नवीन भाषा शिक. नवभारताला संकुचित प्रांताभिमान नको आहे. आपल्या पूर्वजांनी पूजेमधील कलशात सारा हिंदुस्थान पाहावयास आपणास शिकवले आहे.

गंगे च यमुने चैव गोदावरि सरस्वति
नर्मदे सिंधुकावेरि जलेऽस्मिन् सन्निधिं कुरु ॥


असे आपण म्हणतो. सार्‍या नद्या देवघरातील त्या तांब्यात मी पाहतो. माझ्या या मस्तकात सार्‍या हिंदुस्थानचा विचार हवा. रामदास, हे ध्येय तुझे. तू त्यासाठी जग. त्यासाठी मर.'' मुकुंदराव सांगत होते.

''मी आधी विश्वभारतीत जाईन. तेथे काही वर्षं राहून मग हिंडेन फिरेन म्हणतो. संगीतवादनाचा काही अभ्यास करावा असंही मनात आहे. बंगालमधील अभयाश्रम, खादीप्रतिष्ठान वगैरेही सुटीत पाहीन. परंतु मुख्य केंद्र विश्वभारती. तुम्ही याल का माझ्याबरोबर? तुम्ही चला. येथे तरी तुम्ही कोठे राहणार?''

''रामदास, शेतकर्‍यांत व कामगारांत वणवा पेटवून द्यावा, असं माझ्या मनात येत आहे. त्यांची हलाखी पाहून हृदयाचं पाणी होतं. मी आता विश्वभारतीत येणं म्हणजे तो माझा बौध्दिक विलास होईल.'' मुकुंदराव म्हणाले.

''थोडे दिवस या. मी एकदा तेथे रुळेपर्यंत या. मला नाही म्हणू नका. तुम्ही मग निघून जा. मी आग्रह करणार नाही.'' रामदासने प्रार्थना केली.

''बरं तर, येईन. थोडे दिवस त्या पवित्र स्थानी राहून परत येईन.'' मुकुंदराव म्हणाले.

नदीतीरावरील शिवालयात घंटा वाजली.

''घंटा वाजली, देवानं संमती दिली.'' रामदास म्हणाला.

''तुझे गोविंदराव फार आढेवेढे नाही ना घेणार?'' मुकुंदरावांनी विचारले.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel