6. विश्वभारती

रामदास व मुकुंदराव आगगाडीत होते. रामदास पडला होता. मुकुंदराव विचारतंद्रीत होते. सारा बंगाल त्यांच्या डोळयांसमोर उभा होता. बंगाली भूमीत गेल्या शे-सव्वाशे वर्षांत महापुरुषांचे केवढे पीक आले ! हिमालयातून सारी तपश्चर्या वाहात येवून बंगालभर तिचा गाळ पसरला आहे. गंगेच्या तीरावरील सारी पुण्याई तेथे वाहत आलेली आहे. हरिद्वार, प्रयाग, काशी सार्‍या पुण्यक्षेत्रांची पवित्रता शेवटी बंगालला भागीरथीने अर्पण केली. त्यातून का हे थोर पीक मिळाले? राजा राममोहन राय या दिव्यपरंपरेचे निर्माते. धर्म, कला, साहित्य, शास्त्र, राजकारण, तत्त्वज्ञान प्रत्येक क्षेत्रात पहिल्या पअकारची माणसे निर्माण झाली. सारा देश त्यांनी दिपविला. दिगंतात देशाची सत्कीर्ती नेली. भगवान रामकृष्णांनी बंगालचे जीवन शुध्द केले. त्या शुध्द जीवनाची प्रभा, प्रतिभा शतरूपाने प्रकट झाली. ते सारे महापुरुष, ती थोर रत्ने ठळक तार्‍यांप्रमाणे मुकुंदरावांच्या डोळयांसमोर प्रशांत तेजाने तळपत होती. त्यांनी त्या पुंजीभूत पुण्याईस प्रणाम केला. डोळे मिटून क्षणभर त्या विभूतींच्या चरणी मनाने ते संपूर्णपणे मिळून गेले.

विश्वभारतीत ही गुरुशिष्याची जोडी आली. तेथील साधे व कलामय वातावरण पाहून त्यांचे मन प्रसन्न झाले. भारतीय लेण्यांतील दिव्य कलाच तेथे सर्वत्र अवतरली आहे की काय असे वाटत होते. भारतील कलेचा आत्मा जणू गुरुदेवांसमोर, श्रीनंदलालांसमोर येऊन तेथे नाचत होता की काय असे वाटे. पावित्र्य व प्रसन्नता यांचा रमणीय संगम तेथे होता. रवींद्रनाथांचे वडील देवेंद्रनाथ यांनी तेथे तपश्चर्या ओतली होती. रवींद्रनाथांचे बंधू द्विजेंद्रनाथ यांनी आपले चराचराला मिठी मारणारे प्रेम तेथे ओतले होते. स्थानाला तपस्येने महत्त्व येत असते.

शांतिनिकेतन ! तेथे निसर्ग हा मुख्य आचार्य होता आणि निसर्गाचा संदेश त्याच्याशी एकरूप होऊन आपलासा करून घेणारे गुरूदेव रवींद्रनाथ तेथील अधिष्ठात्री देवता होते. ते म्हणावयाचे,''मुलांमुलींभोवती स्वच्छ व सुंदर वातावरण असलं म्हणजे मग निराळी कृत्रिम बंधनं लागत नाहीत. सुंदर सडा घातलेला, रांगोळी घातलेली, तेथे थुंकावेसे वाटत नाहीं. खरं पावित्र्य दुसर्‍यासही पवित्र करते.''

रवींद्रनाथांनी पवित्र सौंदर्याची देणगी राष्ट्रीय जीवनाला दिली आहे. जीवनात कला नसेल तर जीवन विकल आहे हे त्यांनी शिकविले. मनुष्य कलेने जगतो. दरिद्री मनुष्यही घराचे कूड जरा रंगवतो, घरातील मडकेच परंतु ते जरा नक्षीचे करते, चंद्रमौळी झोपडीच, परंतु झोपडीसमोर रांगोळीची कमळे काढील; चंद्र, सूर्य, तारे तेथे रेखाटील व म्हणेल स्वर्ग माझ्या अंगणात आहे. कलेचा हात म्हणजे देवाचा हात. सौंदर्य म्हणजे प्रभूचा आशीर्वाद.

विशाल आकाश व अनंत धरित्री यांच्या सान्निध्यात शांतिनिकेतनातील मुले शिकतात. वृक्षाच्या शीतल छायेखाली गुरू बसतो, समोर शिष्य बसतो. कोंडवाडे तिथे नाहीत. चार भिंतीत मनाला व बुध्दीला कोंडून त्याचे कबरस्थान केले जात नाही.

कवी रवींद्रनाथ हे भारतमातेची मुले फुलविणारे कुशल व प्रेममय माळी तेथे बनले होते. भारताची मुले त्यांच्याजवळ जात व म्हणत,

मी फूल तू फुलविणारा हुशार माळी

मी मूल तूच जननी कुरवाळ पाळी ॥


कल्पनासृष्टीतील कवी येथे प्रत्यक्षात वावरत होता. कल्पनेतील सत्याचे प्रयोग पृथ्वीवर करीत होता. भारतीय संस्कृतीवर पाश्चिमात्य संस्कृतीचे कलम व पाश्चिमात्य संस्कृतीवर भारतीय संस्कृतीचे कलम करून एक अभिनव पूर्व-पश्चिमेच्या संगमाची संस्कृती ते निर्मीत होते. ज्ञानविज्ञानाची ते पूजा करीत होते.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel