मायेच्या दृष्टीतून अंगार वर्षत होता. सती पार्वतीसारखी जणू कोपायमान झाली होती. तिच्याही भावना भकडल्या. तिचाही ज्वालामुखी जागृत झाला व गर्जू लागला-

''माकड, माकड कोणाला रे म्हणतोस माकड? ते का माकड आहेत? त्यांचा आत्मा महान आहे. सारा भारतवर्ष त्यांना आपला वाटतो. सर्व प्रांतातील गुण घ्यावेत असं त्यांना वाटतं. ते तुमच्या वंगभूमीत, तुमच्या संस्थांतून राहिले. तुमच्या गुणांचे कौतकु करते झाले. महापूर आला तर स्वयंसेवक झाले. पूजादिवसांत वंगीय स्वयंसेवकसंघ घरी गेले, पण हे काम करीत राहिले. अरे, ही दगडधोंडयाची भूमी म्हणून हिणवू नकोस. दगडांतून देवमूर्ती निघतात. अरे, तेथील मजुरांनी अंगातील कपडे महापुराच्या वेळेला बंगालमध्ये पाठवले. त्या मजुरांच्या पायांची धूळ लाव. पवित्र हो. महाराष्ट्र ही त्यागभूमी आहे, पवित्र भूमी आहे. तेथील अणुरेणू मला पवित्र वाटतो. रामरायाचे पाय या भूमीला लागले. महाराष्ट्रात का महान विभूती झाल्या नाहीत? ते शांतीचे व ज्ञानाचे सिंह न्यायमूर्ती रानडे, ते स्वाभिमानाची ज्योत पेटवणारे विष्णुशास्त्री, ते सरकारशी व दृष्ट रूढींशी झगडणारे धैर्यमूर्ती आगरकर, स्वराज्याचा मंत्र देणारे भारतभूषण अमर लोकमान्य, महात्माजींचे राजकीय गुरू थोर गोपाळ कृष्ण गोखले ! किती थोर विभूती सांगू? इकडे हुतात्मे झाले नाहीत? फाशी कोणी गेले नाहीत? हातात गीता घेऊन फाशी जाणारे चाफेर का इकडे थोडे झाले ! मोटारखाली चिरडून घेणारे बाबू गेनू नाही का झाले? इकडे काय नाही? केवढा ल्या शिक्षणसंस्था, इतर संस्था ! स्त्री-शिक्षणाला वाहून घेणारे, तीन मुली घेऊन १९०० मध्ये एका झोपडीत आश्रम काढणारे व आज हिंदुस्थानात अद्वितीय असे महिला विद्यापीठ स्थापणारे ते ऋषितुल्य महर्षी अण्णासाहेब कर्वे आणि ते सूर्यासारखे तेजस्वी इतिहासाचार्य राजवाडे, एक ओळही इंग्रजी लिहिणार नाही अशी त्यांची प्रतिज्ञा, ज्योतिषशास्त्राचा हजार पानांचा इतिहास लिहिणारे शंकर बाळकृष्ण दीक्षित; त्यांना न्यायमूर्ती रानडे सांगत होते, ''इंग्रजीत लिहा हा इतिहास. विश्वविख्यात व्हाल.' परंतु ते म्हणाले, 'जगाला ज्ञान हवं असेल तर माझी भाषा जग शिकेल.' केवढा स्वभाषेचा अभिमान ! स्वभाषेचा अभिमान असूनही महाराष्ट्रीय बंधूंनी इतर भाषांकडे तुच्छतेने न पाहता आदरानं सारं घेतलं. त्यांनी तुमचे ग्रंथकार मराठीत आणले, तुम्ही काय करीत आहात? मराठीतील ज्ञानकोशाचे ते प्रस्तावनाखंड; ते शब्दकोश, चरित्रकोश, व्यायामकोश. मराठीतील त्या 'उषःकाल' 'मी'ल 'पण लक्षात कोण घेतो?' 'रागिणी', 'अजिंक्यतारा', 'विंध्याचल', 'दौलत', 'दोन ध्रुव या सुंदर कादंबर्‍या ! आणलं आहे त्यातील काही बंगालीत? मराठीतले खाडिलकर, कोल्हटकर, केळकर, गडकरी, अत्रे हे महान नाटककार, त्यांची चव दिलीत का बंगालला? तुम्ही आपल्या अहंकारात राहा. महाराष्ट्र निरंहकार आहे. तो स्वतःची दवंडी पिटीत नाही व दुसर्‍याचं गुणग्राहकतेनं घेतो. महाराष्ट्रात ध्येयनिष्ठा आहे. अपार त्याग आहे. कोणाची मदत नाही, पै-पैसा मिळत नाही, तरीही ध्येयाला मिठी मारून ठायी-ठायी कामं करीत राहणारे शेकडो महाराष्ट्रीय तरुण आहेत. स्वाभिमान सोडते तर त्यांना पैसे मिळते. परंतु आत्मा न विकता उपाशी, तापाशी, व अनवाणी हे हिंडतात, फिरतात, कामं करतात. प्रद्योत, कोणाला कसला अभिमान नको. परमेश्वर सर्वत्र आपले तेज ठेवीत असतो. वंगभूमीही मोठी, महाराष्ट्रही मोठा. गुजरातही थोर, मद्रासही पूज्य. महाराष्ट्रीय हृदय मी बंगालला देईन; महाराष्ट्रीय आत्म्याची ओळख करून देईन. मराठीतील सुंदर स्त्रीगीतं, ओव्या, कहाण्या बंगालीत उतरीन, ही का वंगभूमीची सेवा नव्हे? ही व्यापक सेवा आहे. मातांची माता जी भारतमाता, तिची ही सेवा आहे. भारतमातेच्या सर्व लेकरांची परस्परांत, ओळख करून देणं ही खरी मातृसेवा. हिंदमातेचा माझ्या शिरावर वरदहस्त आहे. तिचा या मुलीला मंगल आशीर्वाद आहे. प्रद्योत, अहंकार सोड, भ्रम सोड. पवित्र हो. वंगभूमीची खरी सेवा करायची असेल तर निर्मळ व निर्मम हो. तोच खरा मातृभक्त की जो इतर मातांचीही पूजा करतो. वंगमातेचा खरा उपासक महाराष्ट्रमातेचाही पूजक होईल. प्रद्योत, मी वंगभूमीची सेवा करीत आहे. तू मात्र तिला कलंक लावीत आहेस. एका भगिनीची विटंबना मांडून तू का मातृसेवा करीत आहेस?''

''एका भगिनीची अब्रू तू धुळीत मिळवू पाहात आहेस, हा मात्र वंगीय तरुणतरुणींचा अपमान आहे, परस्त्रीला वाटेल ते बोलणं हा खरा त्यांचा अपमान आहे. त्यांना कळलं तर तुझे तुकडे करतील. बंगाली तरुणी तुला फाडून खातील. प्रद्योत, किती अमंगळ बोललास ! आणि माझ्या सौभाग्यावर घाला घालून काय मिळविलंस? माझ्या डोळयांतून अखंड अश्रुधारा चालाव्यात यातच का तुझा आनंद? कशाला श्रीरामकृष्ण, अरविंद, विवेकानंद, रवींद्र यांची पवित्र नावं उच्चारतोस?''

''प्रद्योत, प्रद्योत, तुझे शब्द मी सहन केले. कारण लहानपणापासून मी तुला भाऊ मानला आहे. तुला माहीत नाही, परंतु मला तुझी आठवण येऊन नेहमी रडू येत असतं. मला तुझ्यावर फार रागावता येत नाही. तू माझा भाऊ का नाही होत? मला भाऊ नाही. प्रद्योत, मला भाऊ नाही. हो, माझा भाऊ हो; माझी इच्छा पूर्ण कर. महाराष्ट्रात भाऊबीजेचा केवढा सोहळा असतो म्हणतात. तू माझा भाऊ होऊन येत जा.''

''तू त्यांना तुरुंगात घातलं आहेस. तू माझा भाऊ हो. मी ते सारं विसरेन. भ्रातृप्रेमात सारं पाप धुऊन निघेल. त्यांच्या दवाखान्यात मी सेविका होईन व ते सुटून येईपर्यंत त्यांच स्मरण करीत अब्रूनं राहीन. माझ्या पोटात बाळ वाढत आहे. त्याच्याकडे बघून दिवस काढीन. एक दिवस ते येतील. कदाचित लवकरच येतील. प्रद्योत, नाही तुला दया येत? नाही तुला बहिणीची करुणा येत? तुला बहीण नाही, मला भाऊ नाही, आपण बहिण-भाऊ होऊ. ये प्रद्योत, ये माझ्याजवळ व मला 'ताई' म्हणून हाक मार. 'माझी बहीण माया' असं म्हणं.' ते पाहा, ते पाहा तुझे डोळे निराश झाले. तमोगुण जाऊन तो सत्त्वगुण तेथे झळकू लागला. ते पाहा ओले ओले तुझे डोळे. नको पुसू. गळू देत धारा, विकारांची घाण धुऊन निघेल. दृष्टी पवित्र बंधुप्रेमानं भरून येईल. प्रद्योत, या आरामखुर्चीत पड व भरपूर रड. प्रद्योतचा पुनर्जन्म होईल. जीवनात क्रांती होईल. भर्ता होऊ पाहणारा भ्राता होईल. पहिला प्रद्योत मरो, नवीन जन्माला येवो.''

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel