''बरं, पुढे पाहू.'' माया हसून आत गेली.

आनंदमोहनांनी विचारविनिमय केला. अक्षयकुमार व रमेशबाबू यांच्या जबान्या  होणार होत्या. त्या कशा द्यावयाच्या ते ठरले. मायेचीही जबानी होणार होती. प्रद्योत स्वतःची जबानी देणार होता. रामदासालाही आनंदमोहन भेटून आले होते.

खटल्याची सुनावणीची तारीख आली. आज हजारो किसान व कामगार कोर्टाभोवती जमले होते. दीनबंधू रामदसाला किती तरी दिवसांन त्यांनी पाहिले नव्हते. माया, अक्षयकुमार, रमेशबाबू कोर्टात येऊन बसली. आनंदमोहन आल. पोलिसांच्या पहा-यात पाहा तो रामदास आला. 'दीनबंधू रामदास की जय, दीनबंधू निर्दोष आहे. दीनबंधूची सुटका करा.' अशा आरोळया हजारो कृतज्ञ कंठांतून एकदम बाहेर पडल्या. प्रद्योतही पाठीमागे पहार्‍यात येत होता. रामदासबद्दलचे जनतेचे हे प्रेम पाहून त्याला काय बरे वाटले? रामदास माकड नसून महान आत्मा आहे असे त्याचे हृदय त्याच्याजवळ आत म्हणाले असेल.

कोर्ट भरून गेले होते. रामदासाने त्या बंगाली तरुणाला पाहिले. हाच का तो प्रद्योत? त्याला माहीत नव्हते. त्याने प्रद्योतला कधी पाहिले नव्हते. प्रद्योतने मात्र रामदासाने फोटो, रामदासाची मायेने काढलेली चित्रे  पाहिली होती. न्यायाधीश आले. सर्वत्र सामसूम झाले. सरकारतर्फे रामदासावरचे आरोप मांडण्यात आले. ती सर्व पत्रे पुढे मांडण्यात आली. त्यानंतर रामदासाने आपले म्हणणे मांडले तो म्हणाला, ''मला वकील वगैरे देण्याची जरूरी नाही. हे जे कारस्थान करण्यात आलं आहे त्याची मला माहिती नाही. ही पत्रं माझी नाहीत. असली पत्रं मी कधी कोणाला लिहिली नाहीत; मला कधी कोणाची आली नाहीत. माझ्या हस्ताक्षराचा नमुना या माझ्या वह्यांतून मिळेल. ज्या बंगाली तरुणांना मी पत्रं पाठविली असं सांगण्यात येत आहे, ते बंगाली तरुण कोठे आहेत? ते सापडले का कोठे? ते सत्यसृष्टीत आहेत की कल्पनासृष्टीतील? ते तरुण येथे आणलेले दिसत नाहीत. एक तरुण मला दिसतो आहे. त्याला का मी पत्रं लिहिली? आणि म्हणून त्यालाही अटक?''

''मी अहिंसा व सत्य मानतो. खादी माझा प्राण. त्याचबरोबर किसान कामगारांची संघटना व्हावी असंही मला वाटतं. परंतु हे प्रश्न अनत्याचारानं सुटावेत असं माझं मत आहे. खेडयापाडयांतून मी जे सांगतो, ते सरकारला माहीत आहे.''

''कोणताही गुन्हा मी केलेला नाही. वंगकन्येशी लग्न लावणं हा जर गुन्हा असेलतर तो मी केला आहे. बंगालमध्ये शिकायला जाणं हा गुन्हा असेल तर तो मी केला आहे. बंगालमध्ये क्रान्तिकारक फार झाले; त्या बंगालमधील मुलीशी जर मी लग्न लावलं तर महाराष्ट्रातही इकडे तसे क्रांतिकारक होतील अशी का सरकारला भीती वाटते? म्हणून का मला काळया पाण्यावर पाठविणार, फासावर चढवणार? सरकारनं लक्षात घ्यावं की, क्रान्तिकारक जन्मतात ते सरकारच्या जुलमातून जन्मतात. पिळल्या जाणार्‍या जनतेच्या अश्रूंतून त्यांच्या सांडल्या जाणार्‍या रक्तातून जन्मतात, क्रान्तिकारक नको असतील तर साम्राज्यवाद सोडा, सर्वांचा विकास होऊ दे. मी जास्त वेळ घेत नाही. ही पत्रं वगैरे सारं काल्पनिक आहे. केवळ असत्यावर उभारलेलं एक कारस्थान आहे. इतके दिवस मला का डांबून ठेवण्यात आलं, जामिनावरही का सोडलं नाही, याचं मला आश्चर्य वाटतं.'' नंतर मायेची अत्यंत महत्वाची जबानी झाली. ती म्हणाली, ''समोर उभा असलेला बंगाली तरुण प्रद्योत माझ्याच गावचा. माझे वडील व त्याचे वडीलपरम मित्र. मी प्रद्योतच्या घरी पुष्कळदा जायची. प्रद्योद खोडया करी व मला भंडावी. लहानपणी आम्ही लुटूपुटूचे खेळ खेळत असू. त्यात प्रद्योत होत असे नवरा व मी होत असे त्याची छोटी नवरी. परंतु मी गंमत असे. प्रद्योत मला फुलं आणून देई, जमती आणून देई. मला भाऊ नाही, प्रद्योत भाऊ असं मला वाटे. परंतु प्रद्योतच्या मनात निराळे विचार खेळत होते. मी त्याची पत्नी व्हावं असं त्याला वाटू लागलं. त्याची ही इच्छा मला दिसू लागली. मी प्रथम म्हणत असे की, 'मला लग्न करावयाचं नाही.' माझा खरोखरच तसा विचार होता. परंतु शांतिनिकेतनात हे रामदास आले. त्यांना मी पाहिलं व मला ते निराळे वाटू लागले. एकदम जीवनात नवीन, मंगल, मधुर, गंभीर असं सुंदर दालन उघडलं. माझ्या हृदयाचे ते सम्राट झाले. मी सुटीत घरी गेले की प्रद्योत माझ्याकडे यायचा. मी माझ्या हृदयदेवाची चित्रं दाखवली. प्रद्योत ती फाडण्यासाठी धावे. मी त्याला 'जा, नको सतावू' असं म्हटलं तर तो म्हणायाचा, 'मी तुला सुखात नांदू देणार नाही.'

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel