“आई, माझें लग्न म्हणजे माझ्या आयुष्यांतील आनंदाचा ना प्रसंग? त्या प्रसंगीं नको गाऊं तर कधीं गाऊं?”

“मी जातें उठून. तुझ्याजवळ बोलण्यांत अर्थ नाहीं.” असें म्हणून आई उठून गेली. ते लाडू तेथेंच होते. त्यांच्याभोंवतीं मुंग्या जमूं लागल्या होत्या, त्यांच्यावर माशा बसत होत्या.

“या बघ मुंग्या, आपण चर्चा करीत बसलों परंतु मुंग्या मुकाट्यानें साखर खात होत्या. माशा मेजवानी झोडीत होत्या. गुणा, प्रत्यक्ष आनंद आपणांस कधींच नाहीं का मिळणार? भिकारी होण्याची का फक्त चर्चाच? प्रत्यक्ष भिकारी होऊन हिंडूं का केव्हां?”

“जगन्नाथ, संसारांत राहून भिकारी हो. संसारांतील एकनाथ हो. दामाजी हो, तुकाराम हो. भिकारी व्हायला घर सोडलेंच पाहिजे असें नाहीं. घरांतील सारें दरिद्री जनतेस द्यावें. म्हणजे निराळें भिकारी होण्याची जरूरी नाहीं. झाडाचीं फळें जगासाठीं, नदीचें पाणी जगासाठीं. सूर्याचा प्रकाश सर्वांसाठी. तसें तुझें होवो. तुझी संपत्ति सर्वांसाठी.”

“ती सर्वांचीच आहे. श्रमणा-यांची आहे. ती श्रमणा-यांना मी देईन. खादीस देईन. गोपालनास देईन. भिकारी झालेल्या शेतक-याचा संसार सुखाचा व्हावा म्हणून मी भिकारी बनेन. आणि गुणा तूं?”

“मी भिकारी आहेंच. मला व्हायचें थोडेंच आहे?”

“दोन भिकारी आहेंच. मला व्हायचें थोडेंच आहे?”

“दोन भिकारी मित्र. बाहेर गरीब परंतु मनानें श्रीमंत. खरें ना?”

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel