“आजची थोडीफार माणुसकी देवाधर्मांनींच दिली आहे. विश्वास, तुला असं का वाटतं, कीं या विश्वाचा विचार करतां करतां त्याच्या पाठीमागें एखादी महान् प्रेरक शक्ति असावी असं ज्यांना वाटलं ते सारे मूर्ख होते ? त्यांची बुध्दी का गाढी नव्हती ? विवेकानंद तुमच्यापेक्षां का कमी बुध्दीचे होते ? श्रीरामकृष्ण परमहंसांची जीवनसाधना का व्यर्थ पोरखेळ होता ? महान् तत्त्वज्ञानी स्वायनोझा या विश्वाच्या पाठीमागं ऋतसत्याची चिच्छक्ति नसे का मानीत ? मार्क्स म्हणजे का शेवटचा शब्द ? त्या महापुरुषालाहि तुमची जड अंधश्रध्दा आवडणार नाहीं. जुने पंडित “इति श्रुतिषु” म्हणत. तुम्ही “इति महर्षि: कार्लमार्क्स:” असं म्हणतां. तुम्ही वास्तविक असं म्हणावं कीं, “विचार अनंत आहे, आम्हांला ईश्वराचा अद्याप पुरावा नाहीं. वास्तविक त्या क्षेत्रांत आम्हीं संशोधन केलं नाहीं. ज्यांनीं ईश्वरशोधार्थ जीवनं दिलीं, त्यांना जे अनुभव आले, ते त्यांना सत्य असतील.” विश्वास, तुम्हीं थोडं नम्र बनलं पाहिजे. श्रीरामकृष्ण परमहंस वगैरे सारे मूर्ख नि बावळट असं म्हणायचा अहंकार नका दाखवूं. पंडित जवाहरलालहि आत्मचरित्रांत म्हणतात, “रूढींचा, संकुचितपणाचा, अहंतेचा धर्म त्याज्यच होय. परंतु असे कांहीं महात्मे दिसतात कीं, ज्यांच्या जीवनाकडें पाहिलं म्हणजे कांहीं तरी आहे असं वाटूं लागतं. कांहीं नाहींच असं स्पष्टपणं म्हणवत नाहीं.” आणि विश्वास, माझ्या मनांत तर निराळेच विचार येतात. तुम्ही सारेच म्हणतां कीं, मानवप्राणि हा कधीं उत्क्रांतीच्या मार्गानं तर कधीं आकस्मिक क्रान्तीच्या मार्गानं बनत आला आहे. आपली ही पृथ्वी म्हणजे जळणा-या सूर्याचा उडालेला एक कण. हा कण थंड होऊं लागला. पुढं पाणी झालं. केव्हां तरी वृक्षवनस्पति निर्माण झाल्या. पहिला जीव निर्माण झाला. जलचर, स्थलचर, आकाशचर असे पशुपक्षी झाले. शेवटीं वानर आले. त्यांतून मानव आला. लाखों स्थित्यंतरांचे हे ठसे आपल्या जीवनांतहि सुप्त रूपानं असतील. हे संस्कार का नष्ट होतील ? आणि भगवान् बुध्दासारखा एखादा महापुरुष त्या विश्वांत उभा राहतो. विशाल सहानुभूतीची सुई लागून हृदयांत विश्वप्रेमाचं संगीत सुरू होतं. या सा-या विश्वांत मी होतों. या सर्वांतून मी वाढत आलों आहें. या ता-यांत मी होतों. या वा-यांत होतों. या अणुरेणूंत मी होतों. या गवतांत मी होतों. या वृक्षवेलींत मी होतों. या फुलांतून मी हंसलों होतों. या पशुपक्ष्यांत मी होतों. असा थोर विचार मनांत येऊन तो नाचतो, उचंबळतो. फोनोग्राफच्या तबकडीवरील ठसे सुई लागतांच जसे जागृत होतात आणि मधुर गान सुरू होतं, त्याप्रमाणं अशा संताच्या हृदयांत महासंगीत सुरू होतं. “हें विश्वचि माझें घर” असं त्याला वाटतं. धर्माचा हा आरंभ. ही अनूभूति जीवनांत अधिकाधिक राहील असं करीत जाणं म्हणजे धर्माचरण. हा धर्म शास्त्रीय आहे. हा धर्म म्हणजे अफू नाहीं. अति थोर भावना नि अति थोर विचार यांचं मधुरतम मीलन अथं आहे. कधीं कधीं भावना म्हणजे पुंजीभूत विचार असतो; कधीं कधीं विचार म्हणजे पुंजीभूत भावना असते. विश्वास, अशा धर्माला तुम्हीहि प्रणाम कराल.”

भाईजी थांबले. सारींजणें आतां पथा-यांवर पडलीं. दमलेले ते तरुण झोंपीं गेले. संध्याहि झोंपली. भाईजींना झोंप नव्हती. ते अस्वस्थ होते. बाहेर पाऊस पडत होता. ते गॅलरीत येऊन उभे राहिले. अंगावर पाणी येत होतें. गार वाराहि सुटला ते आंत आले. विश्वास जुडी करून झोंपला होता. भाईजींनीं आपली शाल त्याच्या अंगावर घातली. थोडया वेळानें त्यांनाहि झोंप आली.

एक ऑगस्टपासून संप सुरू करायचा असें ठरत होतें. तुफानी प्रचार सुरू होता. सभा, मिरवणुकी, पत्रकें यांचा पाऊस पडत होता. कामावर जातांना व कामावरून येतांना “एक ऑगस्ट ध्यानांत धरा. कामगार क्रान्तीचा जय असो. पोलादी संघटना उभारा.” अशा घोषणा कामगार करीत. आणि एके दिवशीं बिहारमधील किसानांचे पुढारी स्वामी सहजानंद मुंबईला आले होते. कामगारांच्या सभेंत ते बोलणार होते.

“संध्ये, आजची सभा अपूर्व होईल. तूं जा.” भाईजी म्हणाले.

“तुम्ही नाहीं का जात ?”

“मला आज जरा बरं वाटत नाहीं. मी घरींच पडून राहीन.”

एका स्वयंसेवकाबरोबर संध्या सभेला गेली. विराट् सभा जमली होती. ध्वनिक्षेपक होते. परंतु आकाश मेघांनीं भरून आलें होतें. पाऊस येणार कीं काय ? आलाच पाऊस. जणूं सत्त्वपरीक्षा घेण्यासाठीं आला. हजारों छत्र्या उघडल्या गेल्या. परंतु एक कामगार पुढारी उभा राहिला. तो म्हणाला:

“सा-या छत्र्या मिटा. आज अपूर्व शिस्त दाखवा. पावसाच्या मा-याला का भिणार ? कामगारांना आगीच्या वर्षावांतूनहि जावं लागतं. मिटा सर्व छत्र्या.”

आणि खरोखरच छत्र्या मिटल्या गेल्या. ऐक्याची महान् विद्युत् जणूं सर्वांमध्यें संचरली होती. इन्किलाबची गगनभेदी गर्जना झाली. आकाशांतील मेघांनीहि धीरगंभीर उत्तर दिलें.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel