१९२० सालच्या सुमाराचे माझे कार्य माझ्या प्रांतापुरतेच मर्यादित होते.  आग्रा-अयोध्येच्या संयुक्त प्रांतात मी सर्वत्र हिंडलो.  ४८ जिल्ह्यांतून, खेड्यांतून, शहरांतून, मोठ्या भरण्याच्या गावांतून हिंडलो.  संयुक्त प्रांत म्हणजे हिंदुस्थानचा गाभा आहे, अशी आजपर्यंत समजूत आहे.  प्राचीन व मध्ययुगीन संस्कृतीचे आसन व अधिष्ठान याच प्रांतात.  हा प्रांत म्हणजे अनेक जातिजमातींच्या सरमिसळीची जागा; अनेक संस्कृतींच्या संमिश्रणाची जागा.  या क्षेत्रातच १८५७ चे स्वातंत्र्ययुध्द पेटले व पुढे क्रूरपणाने चिरडून टाकण्यात आले.  संयुक्त प्रांतभर फिरता मला तेथील अनेक प्रकारच्या लोकांची प्रत्यक्ष ओळख व माहिती होत गेली.  उत्तर व पश्चिम बाजूच्या जिल्ह्यांतले जाट म्हणजे त्यांच्या मायभूमीचा खरा नमुना; धट्टाकट्टा, रगेल, त्यातल्या त्यात बर्‍यापैकी स्थितीतला दिसे.  छोटे छोटे रजपूत जमीनदार, रजपूत शेतकरी यांनी मुसलमानी धर्म स्वीकारला असला तरी रजपूत रक्ताचा आणि रजपूत परंपरेचा त्यांना कोण अभिमान वाटे.  कलाकुसरीचे नाजुक नक्षीदार काम करणारे पटाईत कलावंत, कारागीव व छोटेछोटे धंदेवाईक हाते.  त्यात हिंदू व मुसलमानही होते.  किसान व जमीन कसणारी कुळे त्यातल्या त्यात गरिबीत दिवस वाढीत होती.  विशेषत: पूर्वेकडील, अयोध्येकडील या वर्गाची संख्या अफाट होती.  पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या जुलमाने व रक्तशोषणाने पिळून निघालेली, चिरडून टाकलेली ही पददलित जनता, काही फरक होईल आणि आपले नशीब बदलेल अशी आशा करण्याचेही धैर्य होत नसतानाही कसल्यातरी आशेवर व श्रध्देवर जगत होती.

१९२० सालानंतर ३० चा काळ आला.  तुरुंगाच्या वार्‍या करताकरता मधूनमधून जी फुरसत मला मिळाली ती मी हिंदी जनतेत हिडण्यातच घालविली.  विशेषत: १९३६-३७ सालातील निवडणुकीच्या दौर्‍यात सारा हिंदुस्थान मी पालथा घातला.  शहरे, गावे, खेडी सर्वत्र फिरलो.  फक्त बंगालमधील खेड्यापाड्यांतून मी गेलो नाही.  क्वचितच बंगाली ग्रामीण जनतेचे मला दर्शन झाले, हे माझे दुर्दैव; परंतु बाकी सर्वत्र मी गेलो.  प्रत्येक प्रांतातून मी दौरा काढला आणि खेडोपाडी हिंडलो.  मी राजकीय आणि अर्थिक प्रश्नांवर भर देत असे.  त्या वेळच्या माझ्या भाषणांवरून पाहिले तर निवडणुका आणि राजकारण याशिवाय माझ्या मनात दुसरे काही असेल असे वाटणार नाही.  परंतु माझ्या मनाच्या एका कोपर्‍यात सदैव काहीतरी खोल, गंभीर, अधिक स्पष्ट असे काही असे.  निवडणुकींचा त्याच्याशी फारसा संबंध नव्हता.  जाणार्‍या घटकेचा, तात्पुरत्या प्रक्षोभांचा, गडबडीचा त्याच्याशी संबंध नसे.  दुसर्‍याच एका प्रक्षोभक विचाराने मला घेरले होते.  दुसर्‍याच एका तसल्या विचाराने मी पछाडलो गेलो होतो.  भारताच्या शोधार्थ जुने ग्रंथ, जुने शिलालेख व अवशेष, जुन्या कलाकृती, प्राचीन प्रवासवर्णने यात माझी पहिली सफर झाली, आता ही दुसरी सफर चालली होती.  माझ्यासमोर प्रत्यक्ष भारतभूमी होती, भारतीय जनता होती.  भारताची अगाध मोहिनी व विविधता यांचा मला अधिकाधिक साक्षात्कार होऊ लागला व मला जसजसे अधिक दर्शन घडे तसतसे ज्या अमूर्त कल्पनांची ही साकार मूर्ती बनली त्या साकार कल्पनांचे आकलन करणे मला किंवा कोणालाही किती कठीण आहे याची जाणीव जास्त स्पष्ट होऊ लागली.  भारताच्या प्रचंड विस्तारामुळे किंवा विविधतेमुळे काही गोष्टी सुटून जात असे नव्हे तर भारताच्या अंतरंगाच्या अथांग खोलीचा, गंभीर आत्म्याचा ठाव मला लागेना.  मधून मधून तळ दिसे व त्याने मन वेडे होई.  एखादा प्राचीन लेखपट असावा, ज्याच्यामागून एकावर एक अनेकांनी आपले विचार, आपले मनोमय जीवन लिहून ठेवलेले असावे, आणि मागून येणार्‍यांनी नवीन लिहिले तरी जुने सारे नष्ट झालेले नसावे, पुसले गेले नसावे; त्याप्रमाणे हा भारत मला दिसला.  त्या त्या युगातील, त्या त्या काळातील ते विचार आणि ती स्वप्ने ही सारी आपल्यामध्ये एकत्र असतात.  कधी त्यांची आपणांस जाणीव असते, कधी नसते.  ज्याला आपण भारत म्हणून म्हणतो त्या भारताला या सर्वांनी आकार दिला आहे.  भारताची संमिश्र आणि गूढ मूर्ती या सर्वांतून घडलेली आहे.  ही भारताची मूर्ती ईजिप्तमधील त्या दुर्बोध स्फिंक्स पुतळ्याप्रमाणे वाटते.  तिच्या मुखावरील हास्याचा अर्थ लक्षात येत नाही.  नाही ना समजत माझे स्वरूप असे म्हणत जणू ती हसते असे वाटते.  मी भारताच्या चारी दिशांना हिंडलो.  सर्वत्र मला ते दुर्बोध हास्य दिसे, कूटात्मक सस्मित मुखमंडल दिसे.  भारतीय जनतेत बाह्यत: जरी विभिन्नता असली, अपार विविधता असली तरी आतून या सर्वांची एकच घडण असल्याचा तीव्र अनुभव येई.  हजारो वर्षे गेली तरी आपण त्या आंतरिक एकतेमुळे एकत्र राहिलो.  कितीही राजकीय घडोमोडी झाल्या, आपत्ती आल्या तरी ही एकता मेली नाही.  भारताची एकता मला आता केवळ एक बुध्दिगम्य कल्पना म्हणून उरली नाही.  तो आता एक भावनागम्य प्रत्यक्ष अनुभव झाला.  त्या अनुभवाने मला पार भारून टाकले.  ती आमूलाग्र एकता इतकी प्रभावी आणि सामर्थ्यसंपन्न होती की, कितीही उत्पात झाले, प्रलय ओढवले, प्रक्षोभ माजले, राजकीय विभागण्या झाल्या तरी ती अजिंक्य आणि अमरच राहिली, विजयीच राहिली.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel