जातिव्यवस्था, वर्णव्यवस्था स्वत:च्या पायावर उभी असलेली स्वतंत्र योजना नाही.  तिच्यापेक्षा मोठ्या अशा सामाजिक संघटनेच्या योजनेतील हा एक भाग, फार महत्त्वाचा भाग आहे.  जातिव्यवस्थेतील काही दोष-दूर करून तिला राहू द्यायला हरकत नाही, परंतु हे शक्य दिसत नाही.  कारण सामाजिक व आर्थिक शक्तींना या समाजरचनेचे फारसे महत्त्व आज वाटत नाही.  या शक्ती जातिव्यवस्थेच्या पायावरच हल्ले चढवीत आहेत; आणि जातिव्यवस्थेला आधार देणार्‍या इतर गोष्टींनाही सुरुंग लावीत आहेत.  हे आधार बहुतेक नष्ट झालेच आहेत, व हल्लीही झपाट्याने होत आहेत, व दिवसेंदिवस जातिव्यवस्था आधाराशिवाय मोकळी पडत आहे.  जातिव्यवस्था आपणाला आवडते की नाही असा प्रश्न आता उरला नाही.  आपल्या आवडीनावडींना बाजूला सारून भराभरा नवीन बदल होत आहेत.  परंतु या बदलांना वळण लावणे आपल्या हाती आहे.  आजूबाजूस हे फरक होत असताना आपण हिंदी जनतेच्या विशिष्ट वृत्तिप्रवृत्तींचा व स्वभावाचा विचार करून, त्यांना योग्य तो आकार दिला पाहिजे.  भारतीयांनी जी समाजरचना निर्मिली होती, तिच्यातील टिकाऊपणा व संघशक्ती कोणाच्याही सहज लक्षात आल्यावाचून राहात नाहीत.

सर जॉर्ज बर्डवुड एके ठिकाणी लिहितात, ''हिंदू जोपर्यंत वर्णव्यवस्था व जातिव्यवस्था यांना धरून राहतील तोपर्यंत हिंदुस्थान राहील; परंतु ज्या क्षणी ते जातिव्यवस्था दूर करतील, त्या क्षणापासून हिंदुस्थान नाहीसा झाला असे समजावे.  लंडन शहरात जसा गरीब वस्तीचा, हालअपेष्टा काढणारा, अज्ञानात गढलेला असंतुष्ट 'पूर्वभाग' आहे तसा अँग्लोसॅक्सन साम्राज्यातील एक नुसता दु:खीकष्टी पूर्व भाग म्हणून मग हा वैभवशाली देश राहील.''  परंतु जातिव्यवस्था असली काय; किंवा नसली काय; ब्रिटिश साम्राज्यातील अपमानाचे स्थान आम्हाला कधीच प्राप्त झालेले आहे, आणि आमची भविष्यकालीन स्थिती कोणतीही असो; ती ब्रिटिश साम्राज्याच्या मर्यादेत राहणार नाही ही गोष्ट निश्चित.  परंतु सर जॉर्ज बर्डवुड यांच्या म्हणण्यात काहीसे सत्य आहे हे मान्य केले पाहिजे.  त्यांची दृष्टी कदाचित निराळी असेल.  हजारो वर्षे चालत असलेली प्रचंड सामाजिक संघटनेची इमारत जर कोलमडली तर सामाजिक जीवन अजिबात नष्ट होईल.  सारा गोंधळ माजेल.  एकाता कोठे दिसणारच नाही.  संघटना नाहीशी होईल.  बहुजनसमाजाचे हाल होतील.  धरबंध उरणार नाही.  व्यक्तीच्या वर्तनात चमत्कारिकपणा येईल.  वेडेवाकडे प्रकार येतील.  एक समाजरचना कोलकडून पडत असता, लोकांच्या स्वभावास अनुरूप अशी काही कालानुरूप अशी नवी समाजरचना जर उभी करता आली नाही तर वरील प्रकारचे सामाजिक उत्पात अपरिहार्य आहेत.  संक्रमणकाळात उलथापालथ, गोंधळ असणारच; सर्व जगातच आज मोडतोड होत आहे,  भरपूर उलथापालथ होत आहे.  अशा उलथापालथीच्या वेळेस जी दु:खे, ज्या यातना, वेदना भोगाव्या लागतात त्यांतून जीवनाचे धडे राष्ट्रे शिकतात; त्या आगीतून जाऊनच राष्ट्रे वाढतात, बदलत्या परिस्थितीशी नव्याने जुळवून घेतात.

ज्याच्यासाठी धडपडायचे, त्या भविष्यकालीन ध्येयाची स्पष्ट नसली तरी अंधुक तरी कल्पना असल्याशिवाय अधिक चांगल्या स्थितीशी आशा कशी बाळगायची, आणि जे आहे ते मोडून तोडून तरी सारे कसे टाकायचे ?  केवळ शून्यावस्था निर्मून चालणार नाही; कारण त्या पोकळीत एकदम दुसरे काहीतरी घुसेल आणि मग आपण पुन्हा रडत बसू.  ज्या काही विधायक योजना आपण मांडू, आपल्या डोळ्यांसमोर ठेवू, त्या लोकांच्या वृत्तिप्रवृत्तींना अनुरूप अशा हव्यात.  ज्या लोकांच्या बाबतीत आपणास काम करायचे आहे, ते लोक कसे आहेत, त्यांचा स्वभाव काय, त्यांची विचारपरंपरा काय, त्यांच्या प्रेरणा काय, त्यांच्या जीवनाची पार्श्वभूमी कशी आहे, कोणत्या परिस्थितीत आपल्याला कार्य करावयाचे आहे हे सारे विचारात घेऊन आपण नवीन योजना आखल्या पाहिजेत.  या गोष्टींची उपेक्षा करून केवळ हवेत मनोरे उठवू पाहाल तर फसाल किंवा अन्य देशात जे काही झाले किंवा होत आहे, त्यांची केवळ नक्कल करणे म्हणजेही मूर्खपणा ठरेल.  म्हणून हिंदी जनतेच्या जीवनात ज्या समाजरचनेचा अपंरपार परिणाम झालेला आहे तिचा नीट अभ्यास करणे, तिचे स्वरूप नीट समजून घेणे हे आपले कर्तव्य आहे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel