पुष्कळशी विश्वविद्यालये बंद पडली होती.  काही ठिकाणी तेथल्या स्थानिक पुढार्‍यांनी अशा वेळीसुध्दा चळवळ शांततामय मार्गाने चालावी, सविनय कायदेभंग चालवावा असा प्रयत्न करून पाहिला, पण त्या वेळच्या परिस्थितीत ते जमणे कठीण होते.  वीस वर्षे लोकांच्या कानी कपाळी ओरडून दिलेली अहिंसेची शिकवण लोक विसरले, पण काही उपयोग होईल अशा रीतीने शरीरबल वापरायला जी मनाची व इतर तयारी लागते ती त्यांची मुळीच झालेली नव्हती.  त्या अहिंसामय मार्गाच्या शिकवणीमुळेच या वेळी लोकांच्या मनात काय करावे व काय करू नये असा संदेह उत्पन्न होऊन लोक कचरत होते. दंडेली करायचे मनात आले तर नेमकी तीच शिकवण आड येत होती.  आपले ब्रीद बाजूला ठेवून काँग्रेसने आगाऊच जनतेला हिंसा-अहिंसा वाद किसत बसू नका असा नुसता इशारा जरी केला असता तरी झाली त्याच्याहून शतपट हिंसा जनतेने केली असती यात शंका नाही.

पण काँग्रेसने अशी काहीही सूचना दिली नव्हती, इतकेच नव्हे तर काँग्रेसने लोकांना जो अखेरचा संदेश दिला होता त्यात चळवळीचे मार्ग अहिंसामय असणे महत्त्वाचे आहे असे पुन्हा अगत्यपूर्वक बजावले होते.  पण एका विशिष्ट गोष्टीचा परिणाम जनतेच्या मनावर घडला असण्याचा संभव आहे.  काँग्रेसच्या ह्या ठरावात देशावर चढाई करून आलेल्या परकीय शत्रूविरुध्द आपले संरक्षण सशस्त्र मार्गाने करणे न्याय्य व इष्ट आहे असे म्हटलेले होते, मग हल्लीच दुसर्‍या कोणा परकीयांनी चालविलेल्या अन्य तर्‍हेच्या चालू आक्रमणाविरुध्दही तेच का करू नये, तेच तत्त्व का लावू नये ?  स्वत:चे संरक्षण करायला किंवा दुसर्‍यावर लढाई करून जायला शरीरबलाचा उपयोग करता कामा नये हा निषेध एकदा काढून टाकला खरा.  पण त्याचे परिणाम हे असे अपेक्षित झाले.  कारण विचारातल्या बारीकसारीक छटा उमगणे कोणालाच फारसे साधत नाही.  हिंदुस्थानच्या आवतीभोवती सार्‍या जगभर आत्यंतिक हिंसेचे नाना प्रकार पसरलेले लोकांना दिसत होते, आणि प्रचाराचा सतत चाललेला डंका हिंसेला उत्तेजन देत होता.  त्यामुळे लोकांच्या मनात तात्विक अडचण काही उरली नव्हती, हिंसा करायला संधी येण्याची व अंगात पुरेसा आवेश संचरण्याचीच काय ती बाकी राहिली होती.  विचाराचा फारसा कीस काढीत न बसणार्‍या लोकांखेरीज देशात काँग्रेसबाहेरचे व खुद्द काँग्रेसमधलेही असे काही लोक होतेच की त्यांची अहिंसेवर श्रध्दा नव्हती, शरीरबलाचा उपयोग करण्यात काही पाप आहे असे त्यांना मुळीच वाटत नव्हते.

पण प्रसंगाच्या निमित्तने अंगात वारे एकदा संचरले की, बहुतेक लोकांना काही विचार सुचत नाही, आणि मग इतके दिवस मनातल्या मनात दडपून ठेवलेल्या आकांक्षा उसळून उठतात आणि त्या आवेगात त्या आकांक्षा पुर्‍या होण्याच्या दिशेने माणसाच्या हातून घडायचे ते घडते.  आणि म्हणून, सत्तावनच्या मोठ्या बंडानंतर प्रथमच, हिंदुस्थानातील ब्रिटिश राजसत्ता शक्तीच्या (हातात काहीही शस्त्र नसलेल्या शक्तीच्या !) जोरावर उलथून टाकण्याकरिता असंख्य लोक बंड करून उठले.  त्या राजसत्तेला लोकांनी दिलेले हे आव्हान वेडेपणाने भलत्याच वेळी दिले गेले, कारण या दोन पक्षांपैकी सारे शस्त्रबल फक्त सरकारपक्षाजवळच होते, आणि तेही आजपर्यंत कधीच हिंदुस्थानात नव्हते इतके प्रचंड होते.  लोकांच्या नि:शस्त्र जमावाची संख्या कितीही मोठी असली तरी शक्तीच्या जोरावर काही करू म्हटले तर सशस्त्रबलच शेवटी प्रभावी ठरते.  सरकारच्या या सशस्त्रबलाने आपली निष्ठा बदलल्यावाचून लोकपक्षाचे बल पराजय पावणार हे ठरलेलेच होते. दंगे करणार्‍या लोकांच्या जमावांची त्या दृष्टीने तयारी नव्हती व त्यांनी भलत्याच वेळी लढा सुरू केला.  लोकांच्यावर सरकारशी लढा करण्याचा हा प्रसंग आला तो एकाएकी आला, आणि त्या प्रसंगी त्यांचे वागणे कितीही चुकीचे व भलत्याच मार्गाने झालेले असले तरी त्यांच्या वर्तणुकीवरून त्यांचे स्वातंत्र्यप्रेम व परकीय सत्तेची त्यांना आलेली चीड दिसून आली.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel