ह्या धामधुमीच्या काळात ठिकठिकाणी अनेक शहरांतून व खेडेगावांतूनही ब्रिटिशांची सत्ता इतकी संपुष्टात आली होती की, त्याचे आश्चर्य वाटते.  त्यानंतर हिंदुस्थान 'पुन्हा जिंकायला' (हाही शब्दप्रयोग रूढ आले) काही ठिकाणी काही दिवस तर काही ठिकाणी काही आठवडे, सरकारला लागले.  हा प्रकार विशेषत: बिहार, बंगालमधील मिदनापूर जिल्हा, व संयुक्त प्रांताचे आग्नेय कोपर्‍यातले जिल्हे या भागांतून घडला.  संयुक्त प्रांतातील जालिया हा जिल्हा असाच 'पुन्हा जिंकण्यात' आला.  तेथे झालेल्या दंग्याबद्दल चौकशी करण्याकरिता नेमलेल्या विशेष न्यायालयात त्या दंग्याबाबत अनेक खटले चालले.  परंतु त्यांपैकी कोणत्याही खटल्यात त्या दंग्यांच्या काळात जमावाने कोणा माणसाला मारहाण अगर दुखापत केली असे एकही विधान कोणी खरे म्हणून केले नाही ही गोष्ट विशेष लक्षात ठेवण्यासारखी आहे.  दंग्यामुळे उद्भालेल्या परिस्थितीत नेहमीच्या पोलिसदलाकडून शांतता प्रस्थापित होईना, परंतु सन १९४२ साली आरंभालाच सरकारने एक नवे दल 'खास सशस्त्र पोलिस दल' (स्पेशल आर्म्ड् कॉन्स्टॅब्युलरी) या नावाचे उभारले आणि त्या दलाला लोकांनी निदर्शने किंवा दंगा केला तर तो कसा मोडावा याचे विशेष शिक्षण दिले.  लोकांवर दाब ठेवून त्यांची कोणतीही चळवळ चालू न देण्याची महत्त्वाची कामगिरी या दलाने बरीच केली आणि पुष्कळ प्रसंगी त्यांनी आयर्लंडमध्ये ब्रिटिश सरकारने काढलेल्या असल्याच प्रकारच्या 'ब्लॅक ऍंड टॅन्स' या नावाने प्रसिध्द असलेल्या दलाप्रमाणे दंडुकेशाहीही गाजविली.  दंगे शमवून जिकडे तिकडे सरकारी अम्मल पूर्ववत चालू करण्याच्या कामी सरकारने हिंदी फौज अशी फारशी उपयोगात आणली नाही, मात्र हिंदी फौज या नावाने ओळखल्या जाणार्‍या सैन्यापैकी विशिष्ट वर्गाच्या, विशिष्ट गटांच्या तुकड्या कधी कधी या कामाकरिता आणल्या होत्या.  बहुधा ब्रिटिश सैनिकच या कामगिरीवर नेमले गेले, व गुरखेही नेमले गेले.  कधी कधी या दोन वर्गांव्यतिरिक्त असलेल्या हिंदी सैनिकाकडेही ही कामगिरी आली व जादा पोलिसही या कामाला लावले जात.  परंतु अशा प्रसंगी त्यांना त्यांच्या मूळच्या प्रांताव्यतिरिक्त दूरच्या कोठच्या तरी प्रांतात हे काम देऊन तेथे पाठविण्यात येई.  तेथील भाषा त्यांना माहीत नसल्यामुळे तेथे मग ते परक्याप्रमाणे वागत.

पुढार्‍यांना अटक झाल्यानंतर जनतेने जे काही केले ते साहजिक, तसेच ती परिस्थिती आल्यावर सरकारने जे काही केले तेही साहजिकच होते.  पिसाळलेल्या जमावाने केलेले अत्याचार व इतर लोकांनी शांततामय मार्गांनी केलेली निदर्शने ही दोन्हीही चिरडून टाकणे सरकारला प्राप्त होते व आपले स्वत:चे रक्षण करण्याकरिता आपल्या दृष्टीने जे शत्रू होते त्यांचा बीमोड करण्याचा प्रयत्न करणे हेही सरकारला प्राप्तच होते.  लोक इतके का खवळून गेले ते कळण्याची व कळल्यानंतर मनाला पटवून घेण्याची अक्कल व इच्छा सरकारला असती तर आला तसा हा आणीबाणीचा प्रसंग आलाच नसता आणि हिंदुस्थानचा प्रश्न सुटायच्या मार्गावर किती तरी पुढे गेला असता.  सरकारची सत्ता जो कोणी अमान्य करून सरकारला उघड आव्हान करील त्याला एकदाचे निरंतर  (निदान सरकारच्या समजुतीप्रमाणे तरी निरंतर) चिरडून गाडून टाकण्याकरिता सरकारने मोठ्या कसोशीने तयारी केली होती; या लढ्याला आरंभ स्वत: त्यांनीच केला व प्रतिपक्षावर पहिला वार केव्हा करावयाचा त्याचा मुहूर्तही त्यांनी आपली सोय पाहून ठरवला; देशभर चाललेल्या राष्ट्रीय किंवा कामगारांच्या किंवा शेतकर्‍यांच्या चळवळीतून ज्यांनी प्रामुख्याने आजपर्यंत कार्य केले त्या सार्‍या कार्यकर्त्या हजारो पुरुषांना व स्त्रियांना एकदम उचलून तरुंगात ठेवून दिले.  पण त्या अटकेमुळे जेव्हा देशभर जिकडें तिकडे दंगे उसळून सारा देश हादरून गेला तेव्हा मात्र त्यांना ते त्यांच्या अपेक्षेपलीकडचे म्हणून आश्चर्य वाटून ते स्तिमित झाले, आणि त्या सरकारचे दडपशाही करण्याचे विशाल राज्ययंत्र तात्पुरते निखळले. पण सरकारच्या हाती अवाढव्य साधने वाटेल तेवढी होती, व ह्या सार्‍या साधनांचा उपयोग ह्या प्रजेच्या बंडातली हिंसात्मक व अहिंसात्मक, दोन्ही प्रकारची निदर्शने मोडून काढण्याकडे केला.  समाजापैकी वरच्या वरच्या व श्रीमंत वर्गापैकी बरेचसे लोक भीतभीतच पण थोडीफार राष्ट्रीय वृत्ती बाळगून होते एवढेच नव्हे तर ते अधूनमधून सरकारवर टीकादेखील करीत.  पण सार्‍या देशभर झालेल्या या सामुदायिक आंदोलनात कोणाच्या परंपरागत हक्काची कोणाला पर्वा राहिली नाही व त्यात नुसत्या राजकीय क्रांतीचाच नव्हे तर सामाजिक स्थित्यंतराचाही वास दरवळतो आहे हे पाहून ही मंडळी बिचकून गेली.  बंड मोडून जिकडे तिकडे स्थिरस्थावर करण्याचा सरकारचा प्रयत्न यशस्वी होतो आहे असे दिसू लागताच एक पाय राष्ट्रीय पक्षाकडे तर दुसरा सरकारकडे अशी व्दिधा मन झालेली व संधिसाधू मंडळी जी होती ती उघड सरकारच्या बाजूने उभी राहिली आणि सरकारी अधिकाराला उघडे आव्हान देऊन हे प्रकार घडवून आणणार्‍यांना शिव्याशाप देऊ लागली.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel