गदाधर: चैतन्या, काय सांगू, कोणत्या तोंडाने बोलू? ज्या गोष्टीनं आनंद झाला पाहिजे होता, त्या गोष्टीनंच मला दु:ख होत आहे. माझं दु:ख सांगण्याची मला लाज वाटते. परंतु तुझ्याशी खोटं कसं बोलू? चैतन्या, न्यायशास्त्रावर मीही एक ग्रंथ लिहिला आहे; परंतु तुझा ग्रंथ वाचून माझ्या ग्रंथाची मला लाज वाटली. सूर्यासमोर काजवा, सागरापुढं डबकं, गरूडापुढं घुंगुरटं, त्याचप्रमाणे तुझ्या ग्रंथापुढं माझा ग्रंथ होय! चैतन्या, माझा ग्रंथ पंडितमान्य होईल, जगन्मान्य होईल असं मला वाटत होतं; परंतु माझा गर्व गळाला. सारी अहंता सरली. चैतन्या, तुझा ग्रंथ असताना माझा ग्रंथ हातात कोण धरील? सोनं मिळालं असता. मातीला कोण विचारील? तुझा ग्रंथ पाहून मला आनंद झाला पाहिजे होता; परंतु इतक्या वर्षांची माझी आशा क्षणात धुळीस मिळाल्यामुळं मी दु:खी झालो. ही निराशा सहन करण्याचं धैर्य मला नाही. चैतन्या, किती झालं तरी मी मनुष्यप्राणी आहे. तुझ्याबद्दल मला मत्सर वाटतो असं नाही; परंतु माझी घोर निराशा मला दु:ख देत आहे. हळुहळू ती निराशा मी जिंकून घेईन. चैतन्या, माझा तिरस्कार तुला वाटत असेल; असा कसा हा मित्र, असे तू म्हणत असशील! परंतु क्षमा कर. खरं ते तुला सांगितलं. तुला पाहून मला आनंद झाला; परंतु तुझा हा अपूर्व ग्रंथ पाहून माझी फार निराशा झाली.

गदाधरांना पुढे बोलवले नाही. दोघे मित्र नदीच्या प्रवाहाकडे पाहात होते. वादळ येणार होते; परंतु ढग वितळले, नाहीसे झाले. सूर्य पुन्हा दिसू लागला. लोकांना आनंद झाला. नाव झरझर चालू लागली. तासा अर्ध्या तासाने किनारा येईल असे नावाडी म्हणू लागले.

चैतन्य काही तरी विचार करीत होते. त्यांची चर्या गंभीर होती. डोळे स्थिर होते. त्यांच्या डोळयांत त्या वेळेस प्रेम, करूणा वगैंरे भावनांचे मिश्रण दिसत होते. चैतन्यांच्या मांडीवर तो ग्रंथ होता. सुंदर वेष्टणात गुंडाळलेला होता. चैतन्यांनी तो ग्रंथ हातात घेतला. 'हे काय, हे काय' असे गदाधर म्हणत आहे तोच, तो ग्रंथ चैतन्यांनी त्या विशाल नदीच्या पात्रात फेकून दिला. नदीच्या गंभीर प्रवाहाने तो ग्रंथ शत-तरंगांनी आपल्या हृदयाशी धरला आणि खोल अंतरंगात ठेवून दिला.

चैतन्यांच्या गंभीर तोंडावर आता प्रेम पसरले होते. सरोवरावर कमळे फुलावी तसे प्रेम त्यांच्या मुखावर फुलले होते. त्या वेळेस चैतन्यांच्या तोंडावर असा काही मोहकपणा होता की, त्याचे वर्णन कोण करीत?

गदाधर: चैतन्या, काय रे हे केलंस? काय केलंस? तुझ्या अशा करण्यानं मला आनंद आहे. ग्रंथ लिहीत असताना कितीदा तरी मनात येई की मी व तुझं नाव चिरंतनच स्मरणीय राहील. चैतन्या, मित्रा, अरे असा अमोल ग्रंथ कसा रे फेकलास? क्षणभर माझी निराशा झाली, पण मी विसरून गेलो असतो. जगाचं फार मोठं नुकसान तू केलंस. तू केलंस असं म्हणण्यापेक्षा मीच ते केलं. माझं तोडं उतरलं नसतं, माझं दु:ख मी सांगितलं नसतं तर असं होतं ना; परंतु आता काय! चैतन्या, गडया!'

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel