‘दादा, बाबा असे काय बोलतात?’

‘तू जाऊन झोप.’

कृष्णनाथ रडत गेला. तो जाऊन अंथरुणावर पडला. बाहेर प्रचंड वादळ घोंगावत होते. आकाशात मेघ गरजत होते. विजा लखलखत होत्या आणि पाऊसही सुरु झाला. मुसळधार पाऊस. झाडे एकमेकांवर आदळत होती. का एकमेंकास संकटांत धीर देत एकमेकांस मिठी मारीत होती? रघुनाथ वडिलांजवळ बसून होता. पहाटेची वेळ झाली. रमाही आता जागी होती.

‘तुम्ही जरा पडा. मी बसते.’  ती म्हणाली.

‘तू आईजवळ बस. मी आता झोपेत नाही. बाबांचे लक्षण काही बरे नाही. रात्र एकदांची संपू दे. काळरात्र.’


‘रात्र आलीच संपत. पाऊसही थांबला आहे. माझे ऐका. नाही तर तुम्ही आणखी आजारी पडाल.’

‘आपण टोचून घेतले आहे.’

‘तुम्ही हट्टी आहात.’

‘तू काय कमी आहेस? आपले दोघांचे स्वभाव सारखेच म्हणून तर आपले पटते. खरे ना? जा, आईजवळ बस जा.’ रमा सगुणाबाईंजवळ जाऊन बसली.

‘रमा, त्यांचे कसे आहे?’

‘तुम्हांला झोप नाही का लागली? मला वाटले की डोळा लागला आहे तुमचा.’

‘डोळे मिटायचीच आता वेळ आहे. रघुनाथला बोलाव बरं!’

तिने रघुनाथाला बोलावले.
‘काय आई, काय हवं?’

‘काही नको. त्यांचे कसे आहे?’

‘बाबांचे बरे नाही. वातातच आहेत.’

‘रघुनाथ.....’

‘काय आहे?’

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel