‘आमची घोडयाची गाडी घेऊन येईन.’

‘कशाला? तुम्ही या. आपण आमच्या मोटारीतून तुमच्या घरी येऊ.’

‘आभारी आहे.’

रघुनाथ घरी आला. त्याने पत्नीला सारे सांगितले. रमा खूष झाली. तिने तिसरे प्रहरी फराळाचे केले. फळे कापून ठेविली. ठरल्या वेळी रघुनाथ बोलवायला गेला. मालक भेटले. मोटारीतून ते आले.

दिवाणखान्यात वाटोळया टेबलाभोवती खर्च्या मांडल्या होत्या. टेबलावर सुंदर स्वच्छ कपडा होता आणि खाद्यपेयांचे सामान आले. रमाही एका खुर्चीवर बसली.

‘या आमच्या मिसेस.’  रघुनाथ म्हणाला.

‘नमस्कार!’  मॅनेजरसाहेब म्हणाले.
खाणेपिणे सुरु होते. रमाबाईंनी बोलता बोलता मुद्यावर गोष्ट आणली.

‘त्या लहान मुलाचे काम पाहून तोंडात बोटे घातली. असे नव्हते काम पाहिले. अगदी लहान मुले घेऊन तुम्ही शिकवीत असाल, नाही?’

‘हो. अंग वळत आहे तोच शिकवावे लागते. लहान मुले मिळत नाहीत. मोठया कष्टाने मिळवावी लागतात. या मुलांच्या घरी आम्ही पगार पाठवितो, गरीब आईबापांची मुले मिळतात.’

‘आमच्याकडे एक मुलगा आहे. तो सर्कशीत नाव काढील. तुम्हांला हवा का? तरतरीत, देखणा आहे. शिकवा त्याला. पगारही द्यायला नको. त्याला कोणी नाही.’

‘कोठे आहे मुलगा?’

‘दुरुनच पाहा. तो बिचकतो जरा.’

‘होईल पुढे धीट.’

‘कृष्णनाथ, अरे कृष्णनाथ!’

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel