जगात नाना प्रकारची मतमतांतरे असतात. कोणी काही सांगतो, कोणी काही. नाना प्रकारची दर्शने, नाना तत्तवज्ञाने. बुद्ध आपल्या शिष्यांना उपदेशितात, ‘तुमच्यासमोर जे जे विचार मांडले जातील, जे निरनिराळे कार्यक्रम ठेवले जातील, त्यांना तर्काची कसोटी लावून पाहत जा. जीवनाची कसोटीही त्यांना लावून पाहा. केवळ एखाद्याविषयी आपणास आदर वाटतो, एवढ्यावरुन त्याचे म्हणणे स्वीकारु नये.’ बुद्धांनी या नियमाला स्वत:चाही अपवाद ठेवला नाही. ते म्हणतात केवळ ऐकीव गोष्टीवर विश्वासून ती स्वीकारु नका; परंपरा प्राप्त म्हणूनही स्वीकारु नका; असे असलेच पाहिजे असे अधीर होऊन म्हणू नका; अमूक एखादे वचन आपल्या पुस्तकात आहे, एवढ्यावरुन ते स्वीकारु नका; हे स्वीकारण्यास हरकत नाही अशाही समजुतीने स्वीकारु नका; किंवा अमूक आपल्या गुरुचे म्हणणे आहे एवढ्यावरुनही तुम्ही ते स्वीकारु नये.’ आपल्या अनुयायांना सहृदपणे प्रार्थून ते म्हणतात, ‘माझ्या नावाच्या मोठेपणामुळे तुम्ही स्वत:च्या विचारांत व्यत्यय येऊ देऊ नका, माझ्या व्यक्तिमत्त्वामुळे तुमच्या विचारसरणीत बाधा न येवो.’

सारिपुत्राने म्हटले, “भगवन् तुमच्याहून अधिक थोर असा ज्ञानवेत्ता महात्मा मागे कधी झाला नाही, पुढे कधी होणार नाही व आजही नाही.”

भगवन् बुद्धांनी विचारले, “का रे सारिपुत्रा, मागे होऊन गेलेले सारे बुद्ध तुला माहीत असतीलच ना?”

“नाही महाराज.”

“तर मग भविष्यकाळातील तरी तुला माहीत असताल?”

“नाही महाराज.”

“तर मग निदान तू तरी जाणत असशील? माझ्या मनात तरी तू खूप खोल डोकावून पाहीले असशील?”

“तसेही नाही महाराज.”

“तर मग हे सारिपुत्रा, अशी पुप्पित वाणी, असे अगडबंब शब्द का उच्चारलेस? असे धीट बोल तू कसा बोललास?”

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel