तेव्हा यात्रवन्क्य पुन्हा तिला म्हणाले, ‘गोंधळात पाडणारे असे मी काहीत सांगितले नाही. हे प्रिये, खरोखरच तो आत्मा शाश्वत आहे, अविनाशी आहे. जोपर्यंत द्वैत आहे तोपर्यंत एक दुस-यास बघतो, एक दुस-याची चव घेतो, एक दुस-यास अभिवादन करतो, एक दुस-याचे ऐकतो, एक दुस-यास स्पर्श करतो, एक दुस-यास जाणतो. परंतु जेव्हा सर्वत्र आत्माच भरलेला असतो, त्या वेळेस आपण दुस-या कोणाला बघावे, कोणाचे ऐकावे, कोणाला स्पर्शावे, कोणाला हुंगावे, कोणाला जाणावे? ज्याच्या शक्तीमुळे आपण हे सारे जाणतो, त्याला आपण कसे जाणावे? त्या आत्माचे नेति नेति असेच वर्णन करावे लागते. तो दुर्बोध आहे. त्याचे ज्ञान होणे कठिण. तो अविनाशी आहे, कारण त्याचा नाश होणे शक्य नाही. तो कोणाशी बद्ध होत नाही म्हणून तो बंधनातीत आहे. तो बंधन जाणत नाही, दु:ख जाणत नाही, नाश जाणत नाही. हे प्रिये, त्या ज्ञाताला आपण कसे जाणावे?’ तो प्रकाशाचा प्रकाश आहे. एका सुंदर उता-यात म्हटले आहे, ‘जे प्रज्ञावंत त्या ब्राह्माला स्वत:च्या आत्म्यात पाहतात, त्यांना चिरशांती मिळते. इतरांना नाही. ते ब्रह्म ते हे, असे ते म्हणतात व अनिर्वचनीय आनंद अनुभवतात. तर मग त्याला कसे जाणायचे? त्याला स्वत:चा प्रकाश आहे, की ते ब्रह्म दुस-यापासून प्रकाश घेते; तेथे सूर्य प्रकाशत नाही; चंद्र, तारे प्रकाशत नाहीत; तेथे वीज नाही, अग्नी नाही. जेव्हा आत्मा प्रकाशतो, तेव्हा सारे प्रकाशित होते. त्याच्या प्रकाशाने सारे जगत् प्रकाशित होते.’

उदानामध्ये बुद्धाच्या निर्वाणाच्या कल्पनेचे बरोबर वर्णन आहे. उदानात म्हटले आहे, की ‘ती जी अंतिम सत्यता, ती तृष्णेच्या, अज्ञानाच्या, द्वैताच्या पलीकडे आहे; तेथे ना आसक्ती, ना मोह. ती सत्यता म्हणजे परतीर; ती सत्यता स्थिर आहे, शाश्वत आहे; कशानेही ती सत्यता विचलीत होत नाही.’ असे हे निर्वाण आहे. उदानातील हे वर्णन बुद्धांच्या निर्वाणास तंतोतंत लागू पडते. बुद्धांनीच स्वत: म्हटले आहे, की ‘असा एक लोक आहे, की जेथे ही पृथ्वी नाही; तेथे वायू नाही, प्रकाश नाही; तेथे ही पंचमहाभूते नाहीत; तेथे दिक्काल नाहीत; तेथे कशाचे भान नाही, किंवा कशाचे भान नाही असेही नाही; तेथे ही अनंत जाणीव नाही, तेथे शून्यताही नाही; तेथे ना इहलोक ना परलोक; ना चंद्र ना सूर्य. मी त्याला येणेही म्हणत नाही वा जाणेही म्हणत नाही; ते तिष्ठणेही नाही. तेथे ना गती ना विश्रांती; तेथे ना जन्म ना मरण; तेथे स्थिरता नाही, बदलता अखंड प्रवाह नाही; तेथे आधार नाही, काही नाही; अशी ती स्थिती म्हणजे दु:खाचा अंत.’ बुद्धांनी वर्णिलेली ही स्थिती दिक्कालात मावू शकत नाही. ही स्थिती कालाच्या अतीत आहे, सर्व अवकाशांच्या अतीत आहे. ही स्थिती सर्व चांचल्याच्या, सर्व फेरबदलांच्या, स्थित्यंतरांच्या अतीत आहे. त्या स्थितीत कर्म नाही, दु:ख नाही. त्या स्थितीत गती वा विश्रांती समानार्थकच आहेत.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel