‘अग, जयंता का आता लहान आहे? असा हळुबाई करून कसे चालेल? जाऊ दे. झोप आली तर दगड उशाला घेऊन झोपेल. नाही खायला मिळाले तर पाला खाईल. होऊ दे धीट.’

शेवटी जयंत निघाला. सर्व लोकांना आश्चर्य वाटले. जयंत पायी निघाला. त्याने पाठीवर कापडाचे गाठोडे बांधून घेतले. खांद्यावरही काही ठाणे होती. नमस्कार करून तो निघाला. हळूहळू चालला. त्याला काही घाई नव्हती.

गाणी गुणगुणत तो चालला होता.

‘घ्या रे घ्या रे कापड. सुंदर सुंदर कापड. विटणार नाही. फाटणार नाही. पोते-यासारखे होणार नाही. अक्षय रंगाचे कापड. अक्षय टिकणारे कापड. घ्या रे घ्या कापड. हे कापड सर्वांना आवडते. लहानांना आवडते, मोठ्यांना आवडते, स्त्रियांना आवडते, पुरुषांना आवडते. सुंदर सुंदर कापड. घ्या रे घ्या कापड.’

‘या कापडाला प्रेमाचा रंग आहे. सुंदर सुंदर रंग. या कापडाला दयेचा रंग आहे. सुंदर सुंदर रंग. या कापडाला सहानुभूतीचा रंग आहे. सुंदर सुंदर रंग.’

‘घ्या रे घ्या कापड. न विटणारे कापड.’

अशा अर्थाची गाणी गात तो जात होता. त्याला गाव लागेना. माणूस भेटेना. गाव का सारे उठले, बेचिराख झाले? माणसे का परागंदा झाली? कोठे गेले गाव, कोठे गेली माणसे? त्यांना का खायला मिळत नव्हते म्हणून गेली? त्यांना का अंगावर वस्त्र नव्हते म्हणून गेली? त्यांना का राहायला घरदार नव्हते म्हणून गेली? कर्जात बुडाली म्हणून का गेली? गाईगुरे उरली नाहीत म्हणून का गेली? काय झाले?

जयंत पुढे पुढे चालला. तो ओसाड माळरान लागले. जिकडे तिकडे दगड. मोठमोठे काळवत्री दगड. मोठमोठे फत्तर. त्याला नीट चालताही येईना. ते दगड पायांना लागत. रक्तही येई. किती हे दगड! केव्हा संपेल हे दगडाळ माळरान असे त्याला झाले.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel