इराण देशाच्या इतिहासातील ही करुणगंभीर कथा आहे. या कथेवर महाकवींनी महाकाव्ये लिहिली आहेत. करुण व वीर रसाने भरलेली ही कथा. रुस्तुम इराणच्या राजाच्या पदरी होता. रुस्तुम हा महान योद्धा होता. त्याच्यासारखआ वीर झाला नाही. तो बलभीम होता. लोक कौतुकाने म्हणायचे, ‘रुस्तुम मुठीने पर्वताचे चूर्ण करील, रविचंद्र धरून आणील.’ खरोखरच त्याची शक्ती अचाट होती. सिंहाला तो धरून ठेवी. एक थप्पड मारून त्याची गोगलगाय बनवी. माजलेल्या हत्तीला तो ची ची करीत पळवून लावी. रुस्तुम इराणचे भूषण होता.

तो धिप्पाड पहाडासारखा दिसे. त्याचे ते मांसल खांदे, रुंद छाती, पीळदार दंड, भरदार मांड्या पाहून जणू हा मूर्तिमंत सामर्थ्य आहे असे वाटे. द्वंद्वयुद्धात त्याच्यासमोर कोणी टिकत नसे. सूर्यासमोर का काजवा टिकेल? सागरापुढे का थिल्लर गर्जेल? हंसाबरोबर का कावळा उडेल?

असा हा बलभीम रुस्तुम राजाचा आवडता होता. त्याला काही कमी नव्हते; परंतु रुस्तुम सुखी नव्हता. कोणते होते त्याला दु:ख, कोणती होती चिंता? रुस्तुम मुलगा नव्हता. आपणाला मुलगा व्हावे असे त्याला फार वाटे. आपल्याला मुलगा झाला तर त्यालाही बलभीम करायचे, अजिंक्य वीर बनवायचे असे तो म्हणे.

ब-याच वर्षांनी रुस्तुमची चिंता दूर झाली. तो आनंदी दिसू लागला. त्याच्या पत्नीला काही दिवस गेले; परंतु मुलगा होणार की मुलगी? देवाला माहीत. रुस्तुमची पत्नी बाळंतपणासाठी माहेरी जाणार होती. पतीपत्नी बोलत होती.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel