२३

१९३३-३४ मधील ते दिवस. अस्पृश्यता-निवारण्यासाठी महात्माजींनी केलेला उपवास होऊन गेलेला होता. उपवासानंतर महात्माजींनी हिंदुस्थानभर दौरा काढला. अस्पृश्यता दूर करा, मंदिरे, घरेदारे मोकळी करा, असे महापुरुष सांगत होता. थोर पुरुष धर्माला पुन्हा निर्मळ रूप देत असतात. महात्माजी त्या वेळेस त्या प्रश्नाशी जणू तन्मय होऊन गेले होते. अस्पृश्य बंधूंस त्यांनी ‘हरिजन’ असे नाव दिले. जणू देवाचे लोक, प्रभूचे आवडते, असे ते म्हणू लागले. कारण ज्याला माणसे दूर ठेवतात, त्याला प्रभू जवळ करीत असतो.


त्या वेळेस महात्माजींना अमुक मंदिर उघडले, अमुक विहीर मोकळी झाली, अशी स्वप्ने पडत. वास्तविक त्यांची झोप गाढ असे. परंतु ध्यानी-मनी अस्पृश्यता-निवारण त्यांना दिसत होते. एकच ध्यास त्यांना लागला होता.

दौरा काढता काढता ते ओरिसा प्रांतात आले. याच प्रांतात सप्तपुरीतील ती पवित्र जगन्नाथपुरी. हिंदुस्थानातून येथे यात्रेकरू येतात, नऊ हंड्यांतील भात प्रसाद म्हणून नेतात. जगन्नाथाचा प्रसिद्ध रथ कोणास माहीत नाही? मोक्ष मिळावा म्हणून या रथाखाली चिरडून मेलेले किती तरी श्रद्धावान होऊन गेले. जगन्नाथपुरीचा समुद्र अती सुंदर आहे. निळा निळा गंभीर सागर. येथेच बंगालमधील थोर भक्त चैतन्य समुद्र पाहून देहभान विसरले. तो निळा निळा समुद्र पाहून कृष्णभगवानच समोर आहे असे वाटून चैतन्य सागरात शिरू लागले. अशा जगन्नाथपुरीला महात्माजी आले.

महात्माजींनी अस्पृश्यता-निवारणाचा पुढील संदेश दिला : ‘धर्म सर्वांना जोडतो. आपल्याच भावा-बहिणींना दूर ठेवलंत तर प्रभूही दूर राहील. कोणास कमी मानू नका. सारी प्रभूची लेकरं, स्वराज्यही नाही.’

महात्माजींच्या बरोबर कस्तुरबा होत्या, महादेवभाई होते. सायंकाळची सभा झाली, प्रार्थना झाली. महात्माजी विसावा घेत होते. कस्तुरबांना जगन्नाथाचे दर्शन घेण्याची इच्छा झाली.

‘महादेव, तू येतो, बरोबर? चल, आपण प्रभूचं दर्शन घेऊन येऊ. ते पवित्र मंदिर पाहून येऊ.’ कस्तुरबा म्हणाल्या.

महादेवभाई कस्तुरबांबरोबर गेले. दोघे मंदिरात गोली. कस्तुरबा प्रभूसमोर उभ्या राहिल्या. दोघे परतली. महात्माजींस कळले की, महादेव आणि कस्तुरबा मंदिरात गेली आहेत. महात्माजी बेचान झाले. त्यांना काही सुचेना. हृदय धडधडू लागले. ते अती अस्वस्थ झाले.

इतक्यात कस्तुरबा आल्या, महादेवभाई आले. ‘तुम्ही देवळात कसे गेलात? मी स्वत:ला हरिजन-अस्पृश्य समजत असतो. जिथं हरिजनांना मज्जाव, तिथं आपण कसं जायचं? इतरांना मी क्षमा केली असती; तुम्ही तर माझ्याशी एकरूप झालेली माणसं. तुम्ही त्या मंदिरात जाऊन आलात. जिथं हरिजन जाऊ शकत नाहीत, तिथं गेलात. छे:, मी हे कसं सहन करू? माझी वेदना कुणास सांगू? तुम्ही मंदिरात गेलात म्हणजे मीच गेल्यासारखं आहे. कारण, माझ्याजवळच्या माणसांच्या वर्तनावरूनच माझीही परीक्षा केली जाणार?’ महात्माजींना बोलवेना. छातीचे ठोके वेगाने पडत होते. नाडी अती जलद चालू लागली. महादेवभाई कष्टी झाले. महात्माजींचे प्राण जणू कंठी आले. एवढा घोर परिणाम होईल, असे कस्तुरबा व महादेवभाई यांना वाटले नव्हते. परंतु आता काय? डॉक्टरांची धावपळ सुरू झाली. कस्तुरबा प्रार्थना करीत बसल्या. महादेवभाई मुके होते.

हळूहळू महात्माजींचे मन शांत झाले. नाडी ठीक झाली. हृदयाची धडधड कमी झाली. पुढे ते शांत पडून राहिले. अनर्थ टळला. जीवनदान मिळाले. महादेवभाईंनी लिहिले, ‘संतांची सेवा करणं, त्यांच्याजवळ राहणं हे अती कठीण आहे. केव्हा काय होईल याचा नेम नसतो.’

महात्माजी काही बाबतीत भावनाप्रधान होते.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel