प्रवचन ३ रे

क्रान्तिवाद नि सुधारणावाद या दोन मार्गांनी जगाला सुधारण्याचे प्रयत्न चालले आहेत, असे कालच्या प्रवचनाच्या वेळेस मी सांगितले. या दोन्ही मार्गांहून महात्मा गांधींचा मार्ग भिन्न आहे. असहकार अधिक सत्याग्रह यांनी समन्वित असा हा गांधीजींचा मार्ग अभिनव आहे, अपूर्व असा आहे. महात्माजींच्या मते क्रान्तिवाद आणि सुधारणावाद अपुरे आहेत. युरोपांत हे मार्ग ब-याच काळापासून रूढ झाले आहेत. महात्मा गांधी स्वतःला क्रान्तिकारक समजतात. मीहि क्रान्ति करू इच्छितो, असे अनेकदा त्यांनी म्हटले आहे, लिहिले आहे. परंतु क्रान्तीची त्यांची कल्पना भिन्न आहे. त्यांना अधिकाधिक निर्दोष, अधिक पूर्ण नि सर्वांगीण अशी क्रान्ति हवी आहे. जीवनाच्या सर्व क्षेत्रांत क्रान्ति करूं पाहणारे सोव्हिएट रशियांतील क्रांतीतहि काही होते. परंतु महात्माजींची क्रांति सर्वांगीण असली तरी सक्तीची नाही. ती अहिंसक आहे. इंग्लंड, फ्रान्स वगैरे देशांत लोकशाही क्रांति झाली. या देशांत हळूहळू सुधारणा व्हावी म्हणणारे व जलद सुधारणा व्हावी म्हणणारे असे पक्ष उत्पन्न झाले. महात्माजींचे साधर्म्य त्वरेने सुधारणा व्हावी म्हणणा-या पक्षांशी अधिक आहे; परंतु महात्माजींचा विशेष अहिंसेत आहे. शत्रूला मारायचे नाही. हा बाह्यात्कारी भेद समजायला अंतरंगाचाहि विचार करायला हवा. क्रांति परिणामकारक व्हावी म्हणूनच गांधीजी अहिंसेवर भर देतात. आत्म्याचे, हृदयाचे परिवर्तन होऊन जी क्रांति होईल ती टिकेल असे त्यांना वाटते. तीच क्रांति टिकेल. महात्माजींच्या क्रांतिशास्त्रात हृदयपरिवर्तनास महत्त्वाचे स्थान आहे. किंबहुना या क्रांतिशास्त्राचा हा प्राणच आहे.

सुधारणावाद नि क्रान्तिवाद

ब्रिटिश लोक साधारणपणे क्रांतीच्या विरुध्द असतात. क्रांतिवृत्ति ही नैसर्गिक नाही, सृष्टीच्या विरुध्द अशी ही वृत्ति आहे, असे ते प्रतिपादतात; परंतु त्यांचे म्हणणे खरे नाही. विकास कसा होतो? जगद्विकासाचे तत्त्व क्रांतिमय आहे की उत्क्रांतिमय आहे? या सृष्टीत क्रमविकास आहे की क्रांतिविकास आहे? महात्माजींनी एका लेखांत याला उत्तर दिले आहे. ते लिहितात: या सृष्टींत क्रमविकास आहे तद्वत क्रांतीहि आहे. एकदम मोठा फरक होणे, महान् परिवर्तन होणे ही गोष्ट अनैसर्गिक नाही. परमेश्वराच्या या निसर्गात ही गोष्ट दिसून येते. निसर्गांत केवळ उत्क्रांतीच नाही, तर क्रांतीहि आहे. परमेश्वर हा महान् क्रान्तिकारक आहे असे निसर्गांकडे पाहून वाटते. ''हा अनुभव नवीन नाही. मनुष्याच्या अंतःकरणांत जी वृत्ति असते तिने तो सृष्टीकडे बघतो. मार्क्सवादी सर्वत्र विरोधविकासाचे तत्त्व लावतो; आध्यात्मवादी सर्वत्र आत्मतत्त्व पाहतो. भौतिक क्रान्तिकारकाला सर्वत्र विरोधविकास दिसेल तर आध्यात्मवादी मनुष्याला सर्वत्र ईशशक्ति काम करीत आहे असे वाटेल. आपण कोणाला क्रांतिवादी म्हणतो, कोणाला सुधारणावादी म्हणतो. महात्मा गांधींना कोणती संज्ञा द्यावयाची? ते उभयरूप आहेत. ते क्रांतिवादीहि आहेत व सुधारणावादीहि आहेत. सृष्टीत ज्याप्रमाणे क्रमविकासहि आहे, क्रांतीहि आहे, त्याप्रमाणे महात्माजींच्या जीवनशास्त्रांत उभय गोष्टी आहेत. म्हणूनच त्यांचे विकासशास्त्र संपूर्ण आहे; ते एकांगी नाही. सृष्टि योग्य काळी क्रान्ति व उत्क्रान्ति दोहोंचा अवलंब करते. जन्ममरण हे द्वंद पहा. नऊ महिने मूल क्रमशः वाढत असते; परंतु एक दिवस अकस्मात् जन्म. नऊ महिने क्रमविकास तर एक दिवस क्रान्ति. तसेच मरण. आजारी असतो, परंतु पुढे एका क्षणांत सारा खेळ खलास होतो. मनुष्य जन्माला आल्यावर पुन्हा क्रमविकास सुरू होतो. यांतहि मधून क्रान्ति होते, मधून महान् बदल होतात आणि शेवटी मरणाची महान क्रान्ति येते. मनुष्याच्या विकासाला जीवन व मरण दोन्ही आवश्यक. परमेश्वर हा महान् क्रांतिकारक आहे. महात्माजी लिहितात: ''पर्यंत हळूहळू वाढले, उभे राहिले; परंतु एकदम उत्पात होतो. ते गडप होतात. मी आकाशाकडे कधी कधी आदराने, आश्चर्याने बघत असतो. त्या निरभ्र आकाशांत एकदम मेघमाला संमीलित होतात. त्या नितान्त शान्त आकाशांत एकदम केवढा फरक !'' ते अन्यत्र म्हणतात: इंग्लंडच्या, हिंदुस्थानच्या, दोहोंच्या इतिहासात मी क्रान्ति आणि क्रमविकास दोन्ही गोष्टी पाहिल्या आहेत. आज इंग्रज लोक क्रान्तीच्या विरुध्द बोलतात, कारण त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न सुटलेला आहे. ज्यांचा पोटापाण्याचा प्रश्न सुटतो ते क्रमविकासवादी होतात; ज्यांचे पोट रिकामे असते ते क्रान्तिवादी होतात. पोट भरलेले असले म्हणजे दोन तासांनी राजकारण केले तरी चालते. परंतु जो भुकेला आहे तो अशी वाट पहात बसेल तर तो निकालांत निघायचा. तो थांबेल तर मरेल.''

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel