॥ श्रीगणेशाय नमः ॥

जयजयाजी आनंदकंदा । जयजयादि अभेदा ।

माझें नमन तुझ्या पदा । असो सर्वदा अनन्यभावें ॥१॥

हे राघवा रघुपती । पाव आतां शीघ्र गती ।

माझा अंत पहाशी किती ? । हें कांहीं कळेना ॥२॥

खर्‍या थोरांशी कठोरता । नाहीं शोभत अनंता ।

याचा विचार कांहीं चित्ता । करा आपुल्या ये काळीं ॥३॥

मी दीनवाणें मारितों हांका । मला दगा देऊं नका ।

हे जगदीशा जगन्नायका । पावा दासगणूस ॥४॥

महाराज असतां शेगांवांत । विप्र एक काशिनाथ ।

जो खंडेरावाचा होय सुत । गर्दे उपनांव जयाचें ॥५॥

तो आला दर्शना । समर्थांच्या वंदिले चरणां ।

मूर्ति पाहून त्याच्या मना । आनंद झाला अतिशय ॥६॥

माझ्या सन्माननीय वडिलानें । जीं जीवन्मुक्‍ताचीं लक्षणें ।

लिहिलीं अनुभवानें । त्याची प्रत्यक्ष मूर्ति ही ॥७॥

माझें भाग्य धन्य धन्य । म्हणून हें पाहण्या चरण ।

आलों खामगांवाहून । त्याचें सार्थक झालें कीं ॥८॥

तों समर्थांनीं लीला केली । कोपरखिळी मारिली ।

काशीनाथाच्या पाठीस भली । आपुल्या परमकृपेनें ॥९॥

जा तुझा हेत पुरला । वाट पाहे तारवाला ।

या भाषणें घोंटाळला । काशिनाथ मानसीं ॥१०॥

म्हणे काम ना माझें ये ठाईं । मी न आलों मागण्या कांहीं ।

तारवाला शिपाई । वाट पहातो काय हें ? ॥११॥

त्याचें गूध कळेना । पुसण्या छाती होईना ।

निमुटपणें वंदून चरणा । गेला निघून खामगांवीं ॥१२॥

तों तारवाला शिपाई । उभा दारांत होता पाही ।

तार घेतली घाई घाई । कशाची ती बघण्यास ॥१३॥

तारेंत हा मजकूर । तुमचा केला तक्‍रुर ।

मुनसफीच्या हुद्दयावर । मोर्शी तालुक्याकारणें ॥१४॥

तें पाहतां आनंदला । कोपरखिळीचा अर्थ कळला ।

त्या काशिनाथ पंताला । पहा संतांचें ज्ञान कैसें ? ॥१५॥

असो एकदां नागपुरीं । समर्थांची गेली स्वारी ।

गोपाळ बुटीचीया घरीं । त्याच्या अति आग्रहानें ॥१६॥

ही भोसल्याची राजधानी । पूर्वकालीं होती जाणी ।

त्या शहराची आज दिनीं । दैना झाली विबुध हो ॥१७॥

स्वातंत्र्यरुपी प्राण गेला । खरा धनी याचक ठरला ।

परक्यांचा बोलबाला । झाला जया शहरांत ॥१८॥

गज घोडे पालख्या अपार । नाहींशा झाल्या साचार ।

रस्त्यानें फिरे मोटार । अति जोरानें विबुध हो ॥१९॥

असो हा महिमा काळाचा । नाहीं दोष कवणाचा ।

वाडा गोपाळ बुटीचा । होता सिताबर्डीवर ॥२०॥

त्या भव्य सदनांत । नेऊन ठेविले सद्‌गुरुनाथ ।

जैसा वाघ किल्ल्यांत । कोंडोनिया टाकावा ॥२१॥

बुटीचा ऐसा विचार । या सिताबर्डीवर ।

महाराज ठेवावे निरंतर । जाऊं न द्यावें शेगांवा ॥२२॥

अक्रूरानें कृष्णाला । जैसा मथुरेमाजीं नेला ।

तोच प्रकार येथें झाला । काय वर्णन करावें ? ॥२३॥

शेगांव पडलें भणभणीत । अवघे लोक दुःखित ।

विनविती हरी पाटलाप्रत । महाराज येथें आणा हो ॥२४॥

कुडीमधून गेला प्राण । कोण पुसे तिजलागून ? ।

तैसें समर्थांवांचून । शेगांव हें प्रेत पहा ॥२५॥

तुम्ही गांवचे जमेदार । करा याचा विचार ।

बुटी मोठा सावकार । तेथें न आमुचा लाग लागे ॥२६॥

टक्कर हत्तीहत्तींची । होणें आहे योग्य साची ।

येथें आम्हांसम कोल्ह्याची । नाहीं मुळीं किंमत॥२७॥

जंबुमाळीसी लढायाला । मारुती हाच योग्य ठरला ।

जिंकावया कर्णाला । झाली योजना अर्जुनाची ॥२८॥

तुम्हीं नागपुराप्रती जावें । समर्थांसी घेऊन यावें ।

आम्हां अवघ्यांस सुखवावें । हीच आहे विनंति ॥२९॥

इकडे बुटीच्या घरांत । आजुर्दे राहिले संत ।

जेवीं हस्तिनापुरांत । कृष्ण नाहीं आनंदला ॥३०॥

महाराज म्हणती बुटीसी । जाऊं दे मज शेगांवासी ।

या आपुल्या भव्य सदनासी । ठेवून आम्हां घेऊं नको ॥३१॥

तें बुटी मुळींच मानीना । समर्था जाऊं देईना ।

अनागोंदीचा रामराणा । बुटी वाटे निःसंशय ॥३२॥

बुटी भाविक होता जरी । अहंता नव्हती गेली खरी ।

श्रीमंतीचा गर्व भारी । त्याच्या ठाईं वसतसे ॥३३॥

रोज ब्राह्मणभोजन । समर्थांपुढें सदा भजन ।

परी शेगांवचे येत जन । बंदी त्या तो करीतसे ॥३४॥

जाऊं न देई दर्शना । शेगांवचे लोकांना ।

बिगरपरवानगी श्रीमंतसदना । जातां नये कवणासी ॥३५॥

शेगांवचे लोक भले । जरी आणावया गेले ।

परी न कांहीं उपाय चाले । गेले तसेच आले परत ॥३६॥

इकडे भक्त पाटील हरी । कांहीं मंडळी बरोबरी ।

घेऊन निघाला नागपुरीं । समर्थासी आणावया ॥३७॥

बसला अग्निरथांत । त्याच वेळीं वदले संत ।

त्या गोपाळबुटीप्रत । येणें रीतीं तें ऐका ॥३८॥

अरे गोपाळा पाटील हरी । निघाला यावया नागपुरीं ।

तो येण्याच्या आंत परी । मला येथून जाऊं दे ॥३९॥

तो येथें आल्यावर । शांतता नाहीं राहणार ।

तो पडला जमेदार । याचा विचार करावा ॥४०॥

तुझ्या धनाच्या जोरावरी । उडया या जाण निर्धारी ।

तो मनगटाच्या बळावरी । नेईल मजला येथून ॥४१॥

हरी पाटील तेथें आला । शिपायानें अटकाव केला ।

परी तो न त्यानें मानिला । प्रवेश केला सदनांत ॥४२॥

गोपाळ बुटीचिया घरीं । पंगत होती थोर खरी ।

पाटील आल्याच्या अवसरीं । आले ब्राह्मण भोजना ॥४३॥

ताटें चांदीचीं अवघ्यांस । शिसमचे पाट बसण्यास ।

होत्या पातळ पदार्थांस । वाटया जवळ चांदीच्या ॥४४॥

नानाविध पक्वान्नें । होतीं भोजनाकारणें ।

मध्यभागीं आसन त्यानें । मांडिलें समर्थ बसण्यास ॥४५॥

ऐशी बुटीची श्रीमंती । तिचें वर्णन करुं किती ? ।

ज्याला कुबेर बोलती । लोक नागपूर प्रांतींचा ॥४६॥

असो हरी पाटील सदनांत । आले समर्था नेण्याप्रत ।

तो महाराज निघाले धांवत । द्वारीं त्यास भेटावया ॥४७॥

वांसरा गाय पाहून । जैसी येई धांवून ।

तैसें स्वामी गजानन । पाटलासाठीं धांवले ॥४८॥

चाल हरी शेगांवासी । येथें मुळीं न राहणें मसी ।

तूं आलास न्यावयासी । हें फार बरें झालें ॥४९॥

समर्थ जाऊं लागले । तें गोपाळानें पाहिलें ।

अनन्यभावें चरण धरिले । समर्थाचे येऊन ॥५०॥

विक्षेप माझा गुरुराया ! । नका करुं या समया ।

दोन घांस घेऊनियां । इच्छित स्थला मग जावें ॥५१॥

तैसेंच बुटी पाटलासी । बोलूं लागले विनयेंसी ।

तुम्ही घेऊन प्रसादासी । जावें हेंच मागणें ॥५२॥

येथें न रहाती महाराज । हें समजून आलें आज ।

पंक्तींत माझी राखा लाज । तुम्हीच पाटील येधवां ॥५३॥

आतांच समर्थ गेले जरी । लोक उपाशी उठतील तरी ।

आणि अवघ्या नागपुरीं । टीका माझी होईल पहा ॥५४॥

भोजनें होईपर्यंत । महाराज राहिले तेथ ।

शेगांवची समस्त । मंडळी पंक्तीस जेवली ॥५५॥

भोजनोत्तर तयारी । निघण्याची ती झाली खरी ।

दर्शनाची भीड भारी । झाली बुटीच्या वाडयांत ॥५६॥

कुटुंब गोपाळ बुटीचें । जानकाबाई नांवाचें ।

परम भाविक होते साचें । गृहलक्ष्मीच होती जी ॥५७॥

तिनें केली विनवणी । महाराजांचे चरणीं ।

माझा हेतु मनींच्या मनीं । बसूं पहातो गुरुराया ! ॥५८॥

तईं महाराज बोलले । तुझ्या मना मीं जाणीतलें ।

ऐसें म्हणून लाविलें । कुंकूं तिच्या कपाळास ॥५९॥

आणखी एक पुत्र तुला । परम सद्‌गुणी होईल भला ।

अंतीं जाशील वैकुंठाला । सौभाग्यासह बाळे ! तूं ॥६०॥

ऐसा आशीर्वाद देऊन । निघते झाले दयाघन ।

त्या सिताबर्डीहून । आले रघूजीच्या घरीं ॥६१॥

हा भोसला राजा रघूजी । उदार मनाचा भक्त गाजी ।

ज्यानें ठेविला राम राजी । आपुल्या शुद्ध वर्तनें ॥६२॥

त्याचें लौकीकीं राज्य गेलें । जें अशाश्वत होतें भलें ।

शाश्वत स्वरुपाचें आलें । सद्‌गुरुभक्तीचें राज्य घरा ॥६३॥

उत्तम प्रकारचा आदर । केला राजानें साचार ।

त्याचा घेऊन पाहुणचार । रामटेकासी गेले पुढें ॥६४॥

तेथें रामाचें दर्शन । घेऊन आले परतून ।

शेगांवच्या मठा जाण । हरीपाटलासमवेत ॥६५॥

धार-कल्याणचे रंगनाथ । जे थोर साधु मोंगलाईंत ।

होते ते भेटण्याप्रत । समर्था आले शेगांवीं ॥६६॥

अध्यात्माचीं बोलणीं । सांकेतिक केलीं दोघांनीं ।

त्याचा भावार्थ जाणण्या कोणी । तेथें नव्हता समर्थ ॥६७॥

श्रीवासुदेवानंद सरस्वती । कर्ममार्गी ज्याची प्रीति ।

कृष्णातटाका ज्याची महती । माणगांवीं जन्म ज्यांचा ॥६८॥

ते येण्याचे अगोदर । बाळाभाऊस साचार ।

बोलते झाले गुरुवर । स्वामी गजानन सिद्ध योगी ॥६९॥

अरे बाळा उदयिक । माझा बंधु येतो एक ।

मजलागीं भेटण्या देख । त्याचा आदर करावा ॥७०॥

तो आहे कर्मठ भारी । म्हणून उद्यां पथांतरीं ।

चिंध्या न पडूं द्या निर्धारी । अंगण स्वच्छ ठेवा रे ॥७१॥

चिंधी कोठें पडेल जरी । तो कोपेल निर्धारी।

जमदग्नीची आहे दुसरी । प्रतिमा त्या स्वामीची ॥७२॥

तो कर्‍हाडा ब्राह्मण । शुचिर्भूत ज्ञानसंपन्न ।

हें त्याचें कर्मठपण । कवचापरी समजावें ॥७३॥

ऐसें बाळास आदलें दिवशीं । सांगते झाले पुण्यराशी ।

तों एक प्रहर दिवसासी । स्वामी पातले ते ठायां ॥७४॥

एकमेकांसी पाहतां । दोघे हंसले तत्त्वतां ।

हर्ष उभयतांच्या चित्ता । झाला होता अनिवार ॥७५॥

एक कर्माचा सागर । एक योगयोगेश्वर ।

एक मोगरा सुंदर । एक तरु गुलाबाचा ॥७६॥

एक गंगाभागीरथी । एक गोदा निश्चिती ।

एक साक्षात् पशुपती । एक शेषशायी नारायण ॥७७॥

स्वामी जेव्हां मठांत आले । तेव्हां गजानन होते बैसले ।

आपल्या पलंगावरी भले । चिटक्या करानें वाजवीत ॥७८॥

स्वामी येतां चिटकी थांबलि । दृष्टादृष्ट दोघां झाली ।

तैं स्वामींनीं विचारिली । आज्ञा परत जावया ॥७९॥

फार बरें म्हणून । गजाननें तुकविली मान ।

स्वामी गेले निघून । बाळास कौतुक वाटलें ॥८०॥

बाळा म्हणे गुरुराया । हें दृश्य पाहूनियां ।

संशय उपजला चित्ता ठायां । त्याची निवृत्ति करा हो ॥८१॥

त्याचा मार्ग अगदीं भिन्न । तुमच्या ह्या मार्गाहून ।

ऐसें साच असून । तुमचा बंधु कसा तो ? ॥८२॥

ऐसा प्रश्न ऐकिला । समर्थ देती उत्तर त्याला ।

बरवा प्रश्न बाळा केला । त्वां हा आज आम्हांतें ॥८३॥

ईश्वराकडे जाण्याचे । तीन मार्ग असती साचे ।

हे तिन्ही मार्ग ज्ञानाचे । गांवा जाऊन मिळतात ॥८४॥

स्वरुपें त्यांचीं भिन्न भिन्न । दिसतीं पाहणारांकारण ।

तेणें घोटाळा वरितें मन । पाहाणारांचें राजसा ! ॥८५॥

सोंवळें ओंवळें संध्यास्नान । व्रत उपोषणें अनुष्ठान ।

या कृत्यांलागून । अंगें म्हणावीं कर्माचीं ॥८६॥

हीं अंगें जो आचरी । निरालसपणें खरीं ।

तोच समजावा भूवरी । ब्रह्मवेत्ता कर्मठ ॥८७॥

अधिक न्यून येथें होतां । कर्ममार्ग न ये हातां ।

म्हणून विशेष तत्परता । ठेविली पाहिजे आचरणीं ॥८८॥

येथें एवढीच खबरदारी । घ्यावी लागते जाण खरी ।

परांकारणें दुरुत्तरीं । कदा त्यानें ताडूं नये ॥८९॥

आतां भक्तिमार्गाचें । ऐक हें लक्षण साचें ।

भक्तिपंथानें जाणाराचें । मन पाहिजे शुद्ध अती ॥९०॥

मलीनता मनाठायीं । अंशेंही राहिल्या पाही ।

त्याच्या हातां येत नाहीं । भक्तिरहस्य बापा ! रे ॥९१॥

दया प्रेम लीनता । अंगीं पाहिजे तत्त्वतां ।

श्रवणीं-पूजनीं आस्था । पाहिजे त्याची विशेष ॥९२॥

मुखामाजीं नामस्मरण । करणें हरीस जाणून ।

ऐशीं अंगें असतीं जाण । या भक्ति-मार्गाला ॥९३॥

या अंगासह जो भक्त करी । त्यालाच भेटे श्रीहरी ।

भक्तिमार्गाची नये सरी । त्याचा विधि सोपा असे ॥९४॥

परी तो करण्या आचरण । कर्माहून कठीण जाण ।

जेवीं गगनानें जवळपण । नेत्रालागीं दिसतसे ॥९५॥

आतां योगमार्ग तिसरा । सांगतों मी ऐक खरा ।

या योगमार्गाचा पसारा । दोघांपेक्षां जास्त असे ॥९६॥

परी हा पसारा निश्चयेंसी । आहे ज्याचा त्याचे पासीं ।

योगमार्ग साधण्यासी । बाहेरचें न कांहीं लागे ॥९७॥

जेवढें आहे ब्रह्मांडांत । तेवढें आहे पिंडांत ।

त्या पिंडांतील साहित्य । घेऊन योग साधावा ॥९८॥

आसनें रेचक कुंभक । इडापिंगलेचे भेद देख ।

धौती मुद्रात्राटक । कळलें पाहिजे मानवां ॥९९॥

कुंडली आणि सुषुम्ना । यांचें ज्ञान पाहिजे जाणा ।

आधीं योग करणारांना । तरीच तो साधेल ॥१००॥

या तिन्ही मार्गांचें । अंतिम फळ ज्ञान साचें ।

परी तें ज्ञान प्रेमाचें । *वीण असतां कामा नये ॥१॥

जें जें कृत्य प्रेमावीण । तें तें अवघें आहे शीण ।

म्हणून प्रेमाचें रक्षण । करणें तिन्ही मार्गांत ॥२॥

काळा गोरा खुजा थोर । कुरुप आणि सुंदर ।

हे शरीराचे प्रकार । त्याची न बाधा आत्म्यातें ॥३॥

आत्मा अवघ्यांचा आहे एक । तेथें न पडे कदा फरक ।

शरीरभेद व्यावहारिक । त्याचें कौतुक कांहीं नसे ॥४॥

तीच या तिन्ही मार्गांची । स्थिति तंतोतंत साची ।

बाह्य स्वरुपें भिन्न त्यांचीं । परी मूळ कारण एक असे ॥५॥

मुक्कामास गेल्यावर । मार्गाचा न उरे विचार ।

जो मार्गी चालतो नर । महत्त्व त्याचें त्यास वाटे ॥६॥

पंथ चालण्या आरंभ झाला । परी मुक्कामास नाहीं गेला ।

अशाचाच होतो भला । तंटा पंथाभिमानानें ॥७॥

या तिन्ही मार्गांचे ते पांथ । मुक्कामीं पोंचल्या होती संत ।

मग तयांच्या संबंधांत । द्वैत नसे एतुलेंही ॥८॥

वसिष्ठ वामदेव जमदग्नी । अत्री पाराशर शांडिल्य मुनी ।

हे कर्ममार्गाच्या सेवनीं । मुक्कामासी पोंचले ॥९॥

व्यास, नारद, कयाधू-कुमर । मारुती, शबरी, अक्रूर ।

उद्धव, सुदामा, पार्थ, विदूर । हे गेले भक्तिमार्गें ॥११०॥

श्रीशंकराचार्य गुरुवर । मच्छिंद्र गोरख जालंदर ।

हे चढले जिना थोर । या योगमार्गाचा ॥११॥

जो वसिष्ठा लाभ झाला । तोच विदुराच्या पदरीं पडला ।

तोच मच्छिंद्रानें भोगिला । फळामाजीं फरक नसे ॥१२॥

तीच प्रथा पुढें चालली । येथें न शंका घ्यावी मुळीं ।

कर्ममार्गाची रक्षिली । बूज श्रीपादवल्लभें ॥१३॥

नरसिंह सरस्वती यतिवर । तैसेच झाले साचार ।

ठिकाण ज्यांचें गाणगापूर । वाडी औदुंबर ख्यात जगीं ॥१४॥

नामा सांवता ज्ञानेश्वर । सेना कान्हु चोखा महार ।

दामाजीपंत ठाणेदार । गेले भक्तिमार्गानीं ॥१५॥

शेख महंमद श्रीगोंद्यांत । आनंदी स्वामी जालन्यांत ।

सुर्जी-अंजनगांवांत । देवनाथ चाहाते योगाचे ॥१६॥

तैसेंच आहे सांप्रत । कर्ममार्गीं वासुदेव रत ।

मीं धरला भक्तिपंथ । आणिक बहुता जणांनीं ॥१७॥

पळुसचे धोंडीबुवा । सोनगीरचा नाना बरवा ।

जालन्याचे यशवंतरावा । भक्तिपंथ साध्य झाला ॥१८॥

खाल्ला आम्मा ती विदेही । तेवीं शिर्डीचे बाबा सांई ।

गुलाबरावांचे ठायीं । ज्ञानदृष्टि असे रे ॥१९॥

पहा चांदूर तालुक्याचा । वरखेडें नामें ग्रामाचा ।

आडकूजी नामें संत साचा । गेला याच वाटेनें ॥१२०॥

मुर्‍हा गांवचें संतरत्‍न । झिंगाजी तो होय जाण ।

तेवीं नागपूरचे ताजुद्दीन । भक्तिमार्गासी चहाते ॥२१॥

या अवघ्या संतांचें । आचरण भिन्न प्रकारचें ।

परी अधिकारी कैवल्याचे । ते बसले होउनी ॥२२॥

मार्ग असो कोणताही । त्याचें मुळीं महत्त्व नाहीं ।

जो मुक्कामास जाई । त्याचें कौतुक करणें असे ॥२३॥

आम्ही हीं भावंडें सारीं । येतें झालों भूमीवरी ।

कैवल्याच्या मार्गावरी । भाविक आणून सोडावया ॥२४॥

जें ज्याला आवडेल । तिकडे तो जाईल ।

आणि मोक्षरुपी भोगील फल । त्या त्या पंथा आचरोनी ॥२५॥

आतां नको पुसूंस कांहीं । हें न कोणा सांगे पाही ।

निवांत बसूं दे ये ठायीं । पिसेंपणाच्या पासोडीनें ॥२६॥

ज्याची निष्ठा बसेल । वा, जो माझा असेल ।

त्याचेंच कार्य होईल । इतरांची ना जरुर मला ॥२७॥

ज्यासी अनुताप झाला । ब्रह्मज्ञान सांगणें त्याला ।

उगीच तर्कटी वात्रटाला । स्फोट त्याचा करुं नये ॥२८॥

कोणी कांहीं म्हणोत । आपण असावें निवांत ।

तरीच भेटे जगन्नाथ । जगद्‌गुरु जगदात्मा ॥२९॥

ऐसा उपदेश ऐकिला । बाळाभाऊच्या नेत्रांला ।

प्रेमाश्रूंचा लोटला । पूर तो न आवरे त्या ॥१३०॥

अष्टभाव दाटले । शरीरा रोमांच उमटले ।

वैखरीचें संपलें । काम तेणें सहजची ॥३१॥

मौनेंच केला नमस्कार । श्रीगजानन साधु थोर ।

वर्‍हाड प्रांताचा उद्धार । करावयासी अवतरला ॥३२॥

साळुबाई नांवाची । एक असे कण्व शाखेची ।

ती होती महाराजांची । मनापासून भक्तीण ॥३३॥

तिला महाराज एके दिनीं । ऐशा परी वदले वाणी ।

डाळपीठ घेऊनी । स्वैंपाक करी अहोरात्र ॥३४॥

जे येतील तयांना । साळु घाल भोजना ।

येणेंच तूं नारायणा । प्रिय होशील निःसंशय ॥३५॥

ती साळुबाई मठांत । आहे अझूनपर्यंत ।

जी वैजापूरची असे सत्य । माहेर वाडेंघोडें जिचें ॥३६॥

प्रल्हादबुवा जोशाला । होता कृपेचा योग आला ।

तो न तया फलद झाला । तयाचिया दुर्दैवें ॥३७॥

खामगांवच्या सान्निध्यासी । जलंब गांव परियेसीं ।

त्या गांवचा रहिवासी । तुळसीराम एक असे ॥३८॥

पुत्र हा तुळसीरामाचा । आत्माराम नांवाचा ।

होता तैलबुद्धीचा । वेदाध्ययनीं प्रेम ज्याचें ॥३९॥

या धर्मपीठ वाराणसी । जी भागीरथीच्या तटा काशी ।

तेथें गेला अध्ययनासी । वेदवेदांग स्मृतीच्या ॥१४०॥

प्रत्यहीं भागीरथीचें स्नान । माधुकरीचें सेवी अन्न ।

गुरुगृहातें जाऊन । करी अध्ययन श्रुतीचें ॥४१॥

श्रोते विद्यार्थी ना तरी । अध्ययना जाती देशावरी ।

शिकण्याऐवजीं परोपरी । करुं लागती चैन ते ॥४२॥

चैनीमाजीं गुंतल्या मन । मग कशाचें अध्ययन ? ।

बिरुड आंब्यालागून । लागतां नास रसाचा ॥४३॥

आत्माराम नव्हता यापरी । विवेकसंपन्न सदाचारी ।

विद्या अवघी करुन पुरी । आला निजदेशातें ॥४४॥

स्वदेशीं येतां शेगांवासी । गेला असे अति हर्षी ।

हजिरी ती द्यावयासी । श्रीगजानन महाराजा ॥४५॥

तो वेद विद्येचा जाणता । गजानन केवळ ज्ञानसविता ।

आत्माराम वेद म्हणतां । कोठें कोठें चुकतसे ॥४६॥

त्या चुकीची दुरुस्ती । करुं लागले सदगुरुमूर्ती ।

आत्मारामाचे संगतीं । वेद म्हणती महाराज ॥४७॥

ऐकतां त्यांचें वेदाध्ययन । तन्मय होती विद्वान ।

न होय सराफावांचून । किंमत त्या हिर्‍याची ॥४८॥

शेवटीं समर्थांचेपाशीं । आत्माराम राहिला आदरेंसी ।

मधु टाकूनी मक्षिकेसी । जाणें कैसें आवडेल ? ॥४९॥

प्रत्यहीं सेवेकारण । यावें त्यानें जलंबाहून ।

चुकविला ना एकही दिन । ऐसा एकनिष्ठ भक्त तो ॥१५०॥

समर्थांच्या पश्चात । हाच होता मठांत ।

पूजा अर्चा करण्याप्रत । सद्‌गुरुच्या समाधीची ॥५१॥

मोबदला न घेतां भली । एकनिष्ठ सेवा केली ।

शेवटीं त्यानेंच अर्पिली । इस्टेट आपली महाराजा ॥५२॥

इस्टेट अल्प साचार । एक जमीन एक घर ।

येथें न दृष्टि किंमतीवर । देणें आहे भाग पहा ॥५३॥

भिल्लिणीनें रामाला । बोरें देऊन वश केला ।

तैसाच प्रकार हाही झाला । म्हणून केलें वर्णन ॥५४॥

स्वामी दत्तात्रय केदार । दुसरा नारायण जामकर ।

निवळ दुधाचा ज्यांचा आहार । तो दुधाहारी बुवा ॥५५॥

ऐसे श्रोते तिघेजण । स्वामीचे भक्त निर्वाण ।

ज्यांनीं आपुलें तनमन । समर्थचरणीं अर्पिलें ॥५६॥

मोरगांव भाकरे नांवाचा । गांव बाळापूर तालुक्याचा ।

तेथील मारुतीपंत पटवार्‍याचा । वृत्तान्त ऐका थोडासा ॥५७॥

श्रोते ! त्या मोरगांवांत । मारुतीपंताच्या शेतांत ।

पिकाचें रक्षण करण्याप्रत । तिमाजीनामें माळी होता ॥५८॥

तो माळी खळ्याभीतरीं । निजला निशीच्या अवसरीं ।

गाढ झोंप लागली खरी । ते अवसरीं तयाला ॥५९॥

उलटून गेले दोन प्रहर । कुंभाराचे दहावीस खर ।

खळ्यांत येऊनी दाण्यावर । पडले असती पांडयाच्या ॥६०॥

राखणदार झोंपीं गेला । गर्दभासी आनंद झाला ।

ते खाऊं लागले जोंधळ्याला । राशींत तोंड घालूनी ॥६१॥

हा पांडया मारुतीपंत । महाराजांचा होता भक्त ।

म्हणून सद्‌गुरुरायाप्रत । लीला करणें भाग आलें ॥६२॥

क्षणांत जाऊनी मोरगांवासी । हांक मारिली तिमाजीसी ।

अरे ! जागा होई त्वरेंसी । रासेसी गाढवें पडलीं ना ॥६३॥

ऐसें मोठयानें बोलून । तिमाजीस जागे करुन ।

महाराज पावले अंतर्धान । खळ्यामधून तेधवां ॥६४॥

तिमाजी उठून पाहतां । गाढवें दिसलीं तत्त्वतां ।

म्हणे काय करुं आतां । मालक रागे भरेल कीं ॥६५॥

पिकाचें रक्षण करण्यासाठी । त्यानें ठेविलें आहे मसी ।

विश्वासघात आज दिशीं । झाला त्याच्या माझ्या हातें ॥६६॥

तो विश्वासला माझ्यावर । मी निजता झालों निसूर ।

रास ही निम्यावर । खाऊन टाकली गाढवांनीं ॥६७॥

आतां समजूत मालकाची । कोण्या रीतीं घालूं साची ।

पहा त्या वेळीं इमानाची । किंमत होती लोकांस ॥६८॥

ना तरी हल्लींचे नोकर । निमकहराम शिरजोर ।

नफातोटयाची तिळभर । काळजी न त्यांना मालकाच्या ॥६९॥

तिमाजी तैसा नव्हता । हळहळ लागली त्याच्या चित्ता ।

म्हणे काय जाऊन सांगूं आतां । मी पांडयाकारणें ॥१७०॥

कांहीं असो चुकीची । माफी मागितली पाहिजे साची ।

उदार बुद्धि मारुतीची । आहे तो क्षमाच करील ॥७१॥

ऐसें मनाशीं बोलून । उदयास येतां नारायण ।

तिमाजी गांवांत येऊन । पाय धरी पंताचे ॥७२॥

महाराज माझ्या झोंपेनीं । बुडविलें तुम्हांलागूनी ।

दहावीस गांढवांनीं । येऊन रास खाल्ली कीं ॥७३॥

ती नुकसान किती झाली । ती पाहिजे पाहिली ।

खळ्यामाजीं जाऊनि भली । म्हणजे मज वाटेल बरें ॥७४॥

मारुती म्हणाले त्यावर । खळ्यांत यावया साचार ।

वेळ ना मला तिळभर । मी निघालों शेगांवा ॥७५॥

दर्शन घेऊन सद्‌गुरुचें । त्या गजानन महाराजांचें ।

उद्यां सकाळीं धान्याचें । काय झालें तें पाहीन ॥७६॥

ऐसें बोलून शेगांवाला । मारुतीपंत येतां झाला ।

दर्शनासाठीं मठांत गेला । दहा अकराचे सुमारास ॥७७॥

महाराज होते असनावरी । जगू पाटील समोरी ।

बाळाभाऊ बद्ध करीं । बसला जवळ पाटलाच्या ॥७८॥

मारुतीनें दर्शन । घेतां केलें हास्य वदन ।

तुझ्यासाठीं मजकारण । त्रास झाला रात्रीसी ॥७९॥

तुम्ही माझे भक्त होतां । मला राबण्या लावितां ।

झोंपाळू नोकर ठेवितां । आणि आपण निजतां खुशाल घरीं ॥१८०॥

मारुती काल रात्रीला । खळ्यांत तिमाजी झोंपीं गेला ।

गाढवांचा सुळसुळाट झाला । ते रास भक्षूं लागले ॥८१॥

म्हणून मी जागें केलें । जाऊन तिमाजीसी भले ।

रास सांभाळण्या सांगितलें । आणि आलों निघून ॥८२॥

ऐसी खूण पटतांक्षणीं । मारुतीनें जोडून पाणी ।

मस्तक ठेवूनियां चरणीं । ऐसें वचन बोलला ॥८३॥

आम्हां सर्वस्वीं आधार । आपुलाच आहे साचार ।

लेंकराचा अवघा भार । मातेचिया शिरीं असे ॥८४॥

आमुचें म्हणून जें जें कांहीं । तें अवघेंच आहे आपुलें आई ! ।

सत्ता त्यावरी नाहीं । तुम्हांवीण कवणाची ॥८५॥

खळें आणि जोंधळा । अवघाची आहे आपला ।

तिमाजी नोकर नांवाला । व्यवहारदृष्टीं आहे कीं ॥८६॥

ब्रह्मांडाचें संरक्षण । आपण करितां येथून ।

लेंकरासाठीं त्रास पूर्ण । माता सोसी वरच्यावरी ॥८७॥

मी लेंकरुं आपुलें । म्हणूनियां आपण केलें ।

खळ्यांत तें जाऊन भलें । मोरगांवीं संरक्षण ॥८८॥

ऐसीच कृपा निरंतर । स्वामी असावी माझ्यावर ।

आतांच जाऊन करितों दूर । नोकरीवरुन तिमाजीला ॥८९॥

ऐसें बोलतां मारुती । कौतुक वाटलें समर्थांप्रती ।

आणि भाषण केलें येणें रीतीं । तें आतां अवधारा ॥१९०॥

छे ! छे ! वेडया ! तिमाजीस । नको मुळींच काढूंस ।

नोकरीवरुन खास । त्याचें वर्म सांगतों तुला ॥९१॥

तिमाजी नोकर इमानी । खळ्यांत गाढवें पाहूनी ।

दुःखी झाला असें मनीं । तें म्यां तेव्हांच जाणिलें ॥९२॥

रात्रीची हकीकत । तुला सांगावया प्रत ।

आला होता भीत भीत । सकाळीं ना तुजकडे ॥९३॥

तैं तूं म्हणालास त्याला । मी जातों आहे शेगांवाला ।

उद्यां सकाळीं खळ्याला । येऊनियां पाहीन ॥९४॥

ऐसें गुरुवचन ऐकिलें। मारुतीसी चोज जहालें ।

पहा संतांचें कर्तृत्व भलें । कैसें आहे अगाध ॥९५॥

गाढवें खळ्यांत पडलेलीं । कोणीं न त्या सांगितलीं ।

तीं अंतर्ज्ञानें जाणिलीं । गजाननानें श्रोते हो ॥९६॥

शके अठराशें सोळासी । महाराज बाळापुरासी ।

असतां गोष्ट झाली ऐसी । ती थोडकी सांगतों ॥९७॥

तेथें सुखलाल बन्सीलालाची । एक बैठक होती साची ।

त्या बैठकीसमोर महाराजांची । स्वारी बैसली आनंदांत ॥९८॥

मूर्ति अवघी दिगंबर । वस्त्र नव्हतें तिळभर ।

त्या पाहून भाविक नर । नमन करुन जात होते ॥९९॥

तो होता हमरस्ता । बाजार पेठेचा तत्त्वतां ।

त्या पंथानें जात होता । एक पोलिस हवालदार ॥२००॥

नांव त्या हवालदाराचें । नारायण आसराजी होतें साचें ।

समर्था पाहून डोकें त्याचें । फिरुन गेलें तात्काळ ॥१॥

तो म्हणे हा नंगा धोत । मुद्दाम बसला पंथांत ।

साधू ना हा भोंदू सत्य । त्याची उपेक्षा न करणें बरी ॥२॥

ऐसें बोलून जवळीं गेला । अद्वातद्वां बोलूं लागला ।

लाज कैसी नाहीं तुजला । नंगा बसतोस रस्त्यावरी ॥३॥

हे घे त्याचें प्रायश्चित्त । तुला मी देतों आज येथ ।

ऐसें बोलून स्वामीप्रत । मारुं लागला छडीनें ॥४॥

वळ पाठ पोटावरी । उठते झाले निर्धारी ।

परी ना हवालदार आवरी । मारतां हात आपुला ॥५॥

ऐसें तेधवां पाहून । एक गृहस्थ आला धांवून ।

आपुल्या दुकानामधून । हुंडीवाला नाम ज्याचें ॥६॥

तो म्हणे हे हवालदार । तूं विचार कांहीं कर ।

उगेंच सत्पुरुषावर । हात टाकणें बरें नव्हे ॥७॥

कां कीं, संतांचा कैवारी । एक आहे श्रीहरी ।

वळ त्यांच्या पाठीवरी । उठले ते कां न दिसले तुला ॥८॥

या कृत्यानें तुझा अंत । जवळीं आला अत्यंत ।

आजारीच मोडितो पथ्य । मरावया कारणें ॥९॥

तेंच तूं आज केलें । हें न कांहीं बरें झालें ।

अजून तरी उघडी डोळे । माफी माग गुन्ह्याची ॥२१०॥

हवालदार म्हणे माफीचें । कारण मसीं न मागण्याचें ।

कावळ्याचे शापें साचें । काय ढोरें मरतील ! ॥११॥

हा नंगा धोत हलकट । बसला पाहून बाजारपेठ ।

तोंडानें गोष्टी चावट । अचाट ऐसा करीत हा ॥१२॥

ऐशा ढोंग्याला मारणें । ईश्वर जरी मानील गुन्हे ।

तरी मग न्याया कारणें । जागाच नाहीं राहिली ॥१३॥

तेंच पुढें सत्य झालें । हवालदार पंचत्व पावले ।

त्या बाळापूर नगरींत भले । आपण केलेल्या कृत्यानें ॥१४॥

एका पंधरवडयांत । हवालदाराचे अवघे आप्त ।

होते झाले भस्मीभूत । एका साधूस मारल्यानें ॥१५॥

म्हणून अवघ्या लोकांनीं । साधूसमोर जपूनी ।

वागावें प्रत्येकानीं । खरें कळेपर्यंत ॥१६॥

नगर जिल्ह्यांत संगमनेर । प्रवदा नदीचे कांठावर ।

गांव अति टुमदार । त्याचें वर्णन करवेना ॥१७॥

अनंतफंदी नांवाचा । कवि जेथें झाला साचा ।

तेथील हरी जाखडयाचा । ऐका तुम्ही वृत्तान्त हा ॥१८॥

हा हरी जाखडी माध्यंदिन । होता यजुर्वेदी ब्राह्मण ।

गांवोगांव फिरुन । पोट आपुलें भरीतसे ॥१९॥

तो फिरत फिरत शेगांवासी । आला समर्थ दर्शनासी ।

बसतां झाला पायापासीं । श्रीगजानन स्वामींच्या ॥२२०॥

तों हजारों घेती दर्शन । कोणी ब्राह्मणभोजन ।

कोणी खडीसाखर वांटून । नवस केलेला फेडिती ॥२१॥

तईं हरी म्हणे चित्तासी । हा केवढा ज्ञानरासी ।

येऊनियां पायापासीं । विन्मुख जाणें भाग मला ॥२२॥

कां कीं दैव खडतर । माझें आहे साचार।

निवळ पर्वत खडकावर । हरळ उगवेल कोठोनी ? ॥२३॥

आज अन्न मिळालें । उद्यांचें कोणीं पाहिलें ।

ऐसें करीत संपले । दिवस माझे आजवर ॥२४॥

संग्रहासी नाहीं धन । शेतवाडा मळा जाण ।

मी ना मुळींच विद्वान । मला कन्या कोण देईल ? ॥२५॥

हे स्वामी गजानना ! । सच्चिदानंदा दयाघना ! ।

संसारसुखाची वासना । जहालीं मनीं बलवत्तर ॥२६॥

ती तूं पूर्ण करावी । मुलें लेंकरें मला व्हावी ।

प्रथम बायको मिळावी । कुलीन आज्ञाधारक ॥२७॥

ऐसें जो इच्छी मनांत । तोंच त्याच्या अंगावर्त ।

थुंकते झाले सद्‌गुरुनाथ । इच्छेस त्याच्या जाणूनी ॥२८॥

या हरी जाखडयानें । बावंच्या मागला मजकारणें ।

म्हणून आले थुंकणें । या मूर्खाच्या अंगावर ॥२९॥

संसारापासून सुटावया । लोक भजती माझ्या पाया ।

यानें येथें येऊनियां । संसारसुख मागितलें ॥२३०॥

पहा जगाची रीत कैसी । अवघेच इच्छिती संसारासी ।

सच्चिदानंद श्रीहरीसी । पहाण्या न कोणी तयार ॥३१॥

ऐसें आपणासी बोलले । पुन्हां जाखडयासी पाहिलें ।

जें जें तूं इच्छिलें । सांप्रतकालीं मनांत ॥३२॥

तें तें अवघें होईल पूर्ण । पुत्रपौत्र तुजलागून ।

होतील संग्रहासी धन । तेंही थोडकें राहील ॥३३॥

जा आतां परत घरा । सुखें करी संसारा ।

करीत असावा परमेश्वर । आठव वेडया ! विसरुं नको ॥३४॥

ऐसें तयासी बोलून । प्रसाद म्हणून थोडकें धन ।

दिलें हरी जाखडयाकारण । लग्न स्वतःचें करावया ॥३५॥

हरी जाखडया संगमनेरीं । सुखी जहाला संसारीं ।

महाराजाची वाणी खरी । ती कोठून खोटी होईल ॥३६॥

ऐसाच एक निमोणकर । गोविंदाचा कुमार ।

रामचंद्र नामें साचार । ओव्हरसियरच्या हुद्यावरी ॥३७॥

बेंद्रे वासुदेव सर्व्हेअर । होता त्याच्या बरोबर ।

तो आणि निमोणकर । आले मुकना नदीवरी ॥३८॥

हा मुकना नाला डोंगरांत । आहे सह्याद्री पर्वतांत ।

इगतपुरी तालुक्यांत । बुध हो ! नासिक जिल्ह्याच्या ॥३९॥

वनश्री ती रमणीय अती । तिचें वर्णन करुं किती ।

हरीण बालकें बागडती । निर्भयपणें काननांत ॥२४०॥

फलभारें तरुवर । वांकले असती अपार ।

वन्य पशु फिरती स्वैर । बिब्बट लांडगे ते ठायां ॥४१॥

असो या मुकन्या नाल्यापासीं । जवळ एका खोर्‍यासी ।

एका जलाच्या प्रवाहासी । कपीलधारा नाम असे ॥४२॥

तेथें प्रत्येक पर्वणीस । भाविक येती स्नानास ।

लौकिक याचा आसपास । तीर्थ म्हणून पसरलासे ॥४३॥

असो एक्या पर्वणीसी । निमोणकर गेले स्नानासी ।

योगाभ्यास थोडा यासी । येत होता विबुध हो ॥४४॥

तो पूर्ण व्हावा म्हणून । इच्छित होतें त्याचें मन ।

गोसावी बैराग्यालागून । पुसूं लागला तेथल्या ॥४५॥

नाहीं नाहीं माहीत मात । ऐकूं येई सर्वत्र ।

तेणें निमोणकर चित्तांत । हताश पूर्ण जहाला ॥४६॥

काय करुं देवा आतां । मला योगाभ्यास शिकवितां ।

कोठें भेटेल तत्त्वतां । ती कृपा करुन सांगणें ॥४७॥

तो कपीलधारेवरी । एक पुरुष देखिला अधिकारी ।

ज्याचे हात गुडघ्यावरी । येऊन सहज लागले ॥४८॥

उंच बांधा मुद्रा शांत । बैसला होता ध्यानस्त ।

त्यास घातले दंडवत । निमोणकरानें अष्टांगेंसी ॥४९॥

बराच वेळ झाला जरी । योगी न कांहीं बोले परी ।

अस्तमानाची वेळ खरी । समीप येऊं लागली हो ॥२५०॥

पोटीं ना अन्न तिळभर । बिर्‍हाड राहिलें बहु दूर ।

कपीलधारेचें धरुन नीर । तुंब्यांत गोसावी निघाले ॥५१॥

तैं निमोणकर म्हणे समर्था ! । अंत माझा किती पहातां ।

ठाऊक असल्या योगगाथा । मशीं कांहीं शिकवा हो ॥५२॥

तो अखेर अस्तमानीं । बोलते झाले कैवल्यदानी ।

हा चित्रपट घेऊनी । जा आपुलें काम करी ॥५३॥

षोडाक्षरी त्यावर । मंत्र लिहिला आहे थोर ।

त्याचा वाणीनें निरंतर । जप आपुला करावा ॥५४॥

मंत्रप्रभावें थोडा बहुत । योग येईल तुजप्रत ।

योगमार्ग हा अत्यंत । कठीण सर्व योगामध्यें ॥५५॥

गोगलगाय शेप किडा । हिमालया न देईल वेढा ! ।

सागरीचा सिंप किडा । मेरु पर्वता न जाय कधीं ॥५६॥

नेटाचा केला यत्‍न । ब्रह्मचर्य संभाळून ।

येतील दहापांच आसन । धौती नौती केल्यावरी ॥५७॥

जा पुढें न विचारी मला । हा घे देतों प्रसाद तुला ।

ऐसें बोलून उचलिला । एक तांबडा खडा करें ॥५८॥

तो देऊनियां मजसी । गुप्त झालें पुण्यरासी ।

तेंच पुढें नाशिकासी । गंगेवरी भेटले त्या ॥५९॥

त्या पाहून निमोणक्र । गेले धांवत साचार ।

शिर ठेवून पायांवर । प्रश्न त्यांसी ऐसा केला ॥२६०॥

महाराज माझा कंटाळा । कांहो ! आपणच कां केला ।

आपुल्या नांव गांवाला । न सांगतां गेलाच कीं ॥६१॥

महाराज डोळे वटारुन । बोलते झाले त्याकारण ।

तांबडा खडा देऊन । नांव माझें कथिलें म्या ॥६२॥

नर्मदेचा गणपती । तांबडा असतो निश्चिती ।

तूं मूळचाच मूढ मती । रहस्य त्याचें न जाणिलें ॥६३॥

म्हणून त्याचें गूढ तुला । पडतें झालें जाण मुला ! ।

मी रहातों शेगांवाला । गजानन हें नांव माझें ॥६४॥

धुमाळ सदनापर्यंत । चाल माझ्या समवेत ।

पुन्हां भेटी तुजप्रत । होईल माझी ते ठायां ॥६५॥

ऐसें बोलूनी निघाले । महाराज रस्त्यांत गुप्त झाले ।

भिरभिरीं पाहूं लागले । चहूंकडे निमोणकर ॥६६॥

कंटाळून अखेरी । धुमाळाच्या आले घरीं ।

तों गजानन महाराज ओसरीवरी । बसले ऐसें पाहिले ॥६७॥

मौनेंच करुन वंदन । कथिलें धुमाळाकारण ।

कपीलधारेपासून । जें कां झालें इथवरी ॥६८॥

तें ऐकून धुमाळाला । अतिशय आनंद जहाला ।

तो म्हणे योगीराजाला । वाण कशाची सांग मज ॥६९॥

हे अवघ्या सामर्थ्याची । खाण निःसंशय आहेत साची ।

सार्वभौमपदाची । त्याच्या पुढें न किंमत ॥२७०॥

जो तांबडा खडा तुसी । दिला तो ठेवून पाटासी ।

करणें पूजा-अर्चेसी । सद्भावें निरंतर ॥७१॥

योगाभ्यास ही समोरी । त्या खेडयाच्या आदरें करी ।

त्याच्या कृपेनें कांहीं तरी । योगाभ्यास येईल ॥७२॥

तेंच पुढें झालें सत्य । योगाभ्यास थोडा बहुत ।

आला निमोणकराप्रत । श्रीगजाननकृपेनें ॥७३॥

एक शेगांवचा रहिवासी । तुकाराम कोकाटे परियेसीं ।

त्याची संतति यमसदनासी । जाऊं लागली उपजतांच ॥७४॥

म्हणून त्यानें समर्थाला । एकदां नवस ऐसा केला ।

जरी देशील संततीला । दीर्घायुषी गुरुराया ॥७५॥

तरी एक मुलगा त्यांतून । तुसी करान अर्पण ।

मनोरथ त्याचे पूर्ण । केले गजाननस्वामीनें ॥७६॥

दोन तीन मुलें झालीं । परी नवसाची न राहिली ।

आठवण तुकारामा भली । संततीच्या मोहानें ॥७७॥

तो थोरला मुलगा नारायण । रोग झाला त्याकारण ।

औषधोपचार केले जाण । परी न आला गुण कांहीं ॥७८॥

नाडी बंद होऊं लागली । नेत्रांची ती दृष्टि थिजली ।

धुगधुगी मात्र उरली । होती त्याच्या छातीला ॥७९॥

ती स्थिति पाहून । तुकारामा झाली आठवण ।

नवस केल्याची ती जाण । एकदम त्या समयाला ॥२८०॥

तुकाराम म्हणे गुरुराया । हा पुत्र माझा वांचलिया ।

अर्पण करीन सदया । सेवा तुमची करण्यास ॥८१॥

ऐसा वचनबद्ध होतांक्षणीं । नाडी आली ठिकाणीं ।

हळूहळू नेत्र उघडोनी । पाहूं लागला बाल तो ॥८२॥

व्याधि बरी झाल्यावर । तो नारायण-कुमार ।

आणून सोडला मठावर । नवस आपला फेडावया ॥८३॥

तो नारायण अझूनी । आहे तया ठिकाणीं ।

बोलिलेला नवस कोणी । महाराजांचा चुकवूं नये ॥८४॥

हेंच सांगण्या लोकांप्रत । नारायण आहे जिवंत ।

शेगांवीं त्या मठांत । संत-चरित्र ना कादंबरी ॥८५॥

असो पुढें आषाढमासीं । महाराज गेले पंढरीसी ।

घेऊन हरीपाटलासी । विठ्ठलासी भेटावया ॥८६॥

जो सर्व संतांचा । ध्येयविषय साचा ।

जो कल्पतरु भक्तांचा । कमलनाभ सर्वेश्वर ॥८७॥

जो जगदाधार जगत्पति । वेद ज्याचे गुण गाती ।

जो संतांच्या वसे चित्तीं । रुक्मिणीपती दयाघन ॥८८॥

पंढरीस आले गजानन । चंद्रभागेचें केलें स्नान ।

गेलें घ्याया दर्शन । पांडुरंगाचें राउळीं ॥८९॥

हे देवा पंढरीनाथा । हे अचिंत्या अद्वया समर्था ।

हे भक्तपरेशा रुक्मिणीकांता । ऐक माझी विनवणी ॥२९०॥

तुझ्या आज्ञेनें आजवर । भ्रमण केलें भूमिवर ।

जे जे भाविक होते नर । त्यांचे मनोरथ पूर्ण केले ॥९१॥

आतां अवतार-कार्य संपलें । हें तूं जाणसी वहिलें ।

पुंडलीक वरदा विठठले । जाया आज्ञा असावी ॥९२॥

देवा, मी भाद्रपद मासीं । जावया इच्छितों वैकुंठासी ।

अक्षय्यीचे रहावयासी । तुझ्या चरणांसन्निध ॥९३॥

ऐसी करुन विनवणी । समर्थांनीं जोडिले पाणी ।

अश्रु आले लोचनीं । विरह हरीचा साहवेना ॥९४॥

हरी पाटील जोडून हातां । पुसूं लागला पुण्यवंता ।

अश्रु कां हो सद्‌गुरुनाथा । आणिले लोचनीं ये वेळां ? ॥९५॥

किंवा मी कांहीं सेवेला । चुकलों आहे दयाळा ।

म्हणून आपणां खेद झाला । तें सांगा लवलाही ॥९६॥

महाराज म्हणाले त्यावर । हरी पाटलाचा धरुन कर ।

सांगितलें तरी न कळणार । त्याचें वर्म बापा तुला ॥९७॥

तो विषय खोल भारी । तूं न पडावें त्याभीतरीं ।

इतकेंच सांगतों श्रवण करी । संगत माझी थोडी असे ॥९८॥

चाल आतां शेगांवाला । तूं आपल्या ठिकाणाला ।

तुमच्या पाटील वंशाला । कांहीं न कमी पडेल ॥९९॥

पंढरीचें मावंदें केलें । शेगांवामाजीं भलें ।

चित्त चिंतेनें व्याप्त झालें । मात्र हरीपाटलाचें ॥३००॥

तो म्हणे मंडळीस । महाराज वदले पंढरीस ।

संगत राहिली थोडे दिवस । माझी विठूच्या राउळीं ॥१॥

पुढें श्रावणमास गेला । क्षीणता आली तनूला ।

पुढें भाद्रपदमास आला । काय झालें तें ऐका ॥२॥

गणेश चतुर्थीचे दिवशीं । महाराज म्हणाले अवघ्यांसी ।

आतां गणपती बोळवण्यासी । यावें तुम्हीं मठांत ॥३॥

कथा गणेशपुराणांत । ऐशापरी आहे ग्रथित ।

चतुर्थीच्या निमित्त । पार्थिव गणपती करावा ॥४॥

त्याची पूजा-अर्चा करुन । नैवेद्य करावा समर्पण ।

दुसरे दिवशीं विसर्जून । बोळवावा जलामध्यें ॥५॥

तो दिवस आज आला । तो साजरा पाहिजे केला ।

या पार्थिव देहाला । तुम्ही बोळवा आनंदें ॥६॥

दुःख न करावें यत्किंचित । आम्हीं आहों येथें स्थित ।

तुम्हां सांभाळण्याप्रती सत्य । तुमचा विसर पडणें नसे ॥७॥

हें शरीर वस्त्रापरी । बदलणें आहे निर्धारी।

ऐसें गीताशास्त्रांतरीं । भगवान् वदला अर्जुना ॥८॥

जे जे ब्रह्मवेत्ते झाले । त्यांनीं त्यांनीं ऐसेंच केले ।

शरीरवस्त्रासी बदलिलें । हें कांहीं विसरुं नका ॥९॥

चतुर्थीचा अवघा दिवस । आनंदामाजीं काढिला खास ।

बाळाभाऊच्या धरिलें करास । आसनीं आपल्या बसविलें ॥३१०॥

मी गेलों ऐसें मानूं नका । भक्तींत अंतर करुं नका ।

कदा मजलागीं विसरुं नका । मी आहे येथेंच ॥११॥

ऐसें भाषण करुन । योगें रोधिला असे प्राण ।

दिला मस्तकीं ठेवून । त्या महात्म्या पुरुषानें ॥१२॥

शके अठराशें बत्तीस । साधारण नाम संवत्सरास ।

भाद्रपद शुद्ध पंचमीस । गुरुवारीं प्रहर दिवसाला ॥१३॥

प्राण रोधिता शब्द केला । ’जय गजानन’ ऐसा भला ।

सच्चिदानंदीं लीन झाला । शेगांवामाझारीं ॥१४॥

देहाचें तें चलनवलन । पार गेलें मावळोन ।

स्वामी समाधिस्त पाहून । लोक हळूहळूं लागले ॥१५॥

पुकार झाली गांवांत । स्वामी झाले समाधिस्थ ।

ऐसी ऐकतां मात । हृदय पिटती नारीनर ॥१६॥

गेला गेला साक्षात्कारी । चालता बोलता श्रीहरी ।

गेला गेला कैवारी । आज दीनजनांचा ॥१७॥

गेला आमुचा विसांवा । गेला आमुचा सौख्यठेवा ।

विझाला हा ज्ञानदिवा । कालरुपी वार्‍यानें ॥१८॥

अहो गजाननस्वामी समर्था ! । आतां आम्हांस कोण त्राता ? ।

कां रे इतक्यांत पुण्यवंता । गेलास आम्हां सोडून ? ॥१९॥

मार्तंड पाटील, हरी पाटील । विष्णुसा बंकटलाल ।

ताराचंद प्रेमळ । भक्त स्वामीचा जो असे ॥३२०॥

श्रीपतराव कुळकर्णी । मठामाजीं जमले जाणी ।

विचार केला अवघ्यांनीं । ऐशा रीतीं श्रोते हो ॥२१॥

आज आहे पंचमीचा दिवस । समाधि न द्या स्वामीस ।

हाळोपाळीच्या लोकांस । येऊं द्या हो दर्शना ॥२२॥

आतां पुढें ही मूर्ति । लोपणार आहे निश्चिती ।

अस्तमानापर्यंत ती । लोकांची ती वाट पहा ॥२३॥

ज्यांच्या नशिबीं असेल । तयांना दर्शन घडेल ।

नका करुं आतां वेळ । जासूद धाडा चोहींकडे ॥२४॥

गोविंदशास्त्री डोणगांवचे। एक विद्वान् होते साचे।

ते बोलिले आपुल्या वाचें । सर्व लोकांस येणें रीतीं ॥२५॥

त्यांच्या आवडत्या भक्तांसी । ते दर्शन देतील निश्चयेंसी ।

तोंपर्यंत प्राणासी । मस्तकीं धारण करतील ॥२६॥

त्याची प्रचीति पहावया । नको कोठें लांब जाया ।

पहा लोणी ठेवोनियां। येधवां मस्तकीं स्वामीच्या ॥२७॥

लोणी ठेवितां शिरावरी । तें पघळूं लागलें निर्धारीं ।

जो तो त्याचें कौतुक करी । बल हें योगशास्त्राचें ॥२८॥

तो प्रकार पहातां । गोविंदशास्त्री झाला बोलता ।

एक दिवसाची काय कथा । हे राहतील वर्षभर ॥२९॥

निःसंशय ऐशा स्थितींत । परी हें करणें अनुचित ।

आवडते अवघे आलिया भक्त । समाधि द्या स्वामीला ॥३३०॥

तें अवघ्यांस मानवलें । स्वामीपुढें आदरें भलें ।

भजन त्यांनीं मांडिलें । हजार टाळ जमला हो ॥३१॥

दुरदूरच्या भक्तांप्रत । स्वामी जाऊन स्वप्नांत ।

आपुल्या समाधीची मात । कळविते झाले विबुध हो ॥३२॥

तया ऋषिपंचमीला । अपार मेळा मिळाला ।

लोकांचा तो शेगांवाला । घ्याया दर्शन स्वामीचें ॥३३॥

रथ केला तयार । दिंड्या आल्या अपार ।

सडे घातले रस्त्यावर । गोमयाचे बायांनी ॥३४॥

रंगवल्या नानापरी । काढू लागल्या चतुर नारी ।

दीपोत्सव झाला भारी । त्या शेगावग्रामाला ॥३५॥

मूर्ति ठेविली रथात । मिरवणूक निघाली आनंदात ।

रात्रभरी शेगावात । तो ना थाट वर्णाचे ॥३६॥

वाद्यांचे नाना प्रकार । दिंड्या मिळाल्या अपार ।

होऊं लागला भगनगजर । विठ्ठलाच्या नावाचा ॥३७॥

तुळशी बुक्का गुलाल फुले । भक्त उधळू लागले ।

फूलांखाली झाकून गेले । श्री गजानन महाराज ॥३८॥

बर्फीपेढ्यांस नाही मिती । लोक वाटती खिरापती ।

कित्येकांनी रथावरती । रूपये पैसे उधळीले ॥३९॥

ऐशी मिरवणूक रात्रभर । शेगावी निघून अखेर ।

उदयास येता दिनकर । परत आली मठात ॥४०॥

समाधीच्या जागेवरी । मूर्ती नेऊनी ठेविली खरी ।

रूद्राभिषेक केला वरी । अखेरचा देहाला ॥४१॥

पूजा केली पंचोपचार । आरती उजळली अखेर ।

भक्तांनी केला नामगजर । गजाननाचे नावाचा ॥४२॥

जय जय अवलीया गजानना! । हे नरदेहधारी नारायणा ।

अविनाशरूपा आनंदघना । परात्परा जगत्पते ॥४३॥

ऐशा भजनाभीतरी । मूर्ति ठेविली आसनावरी ।

उत्तराभिमुख साजिरी । शास्त्रमार्गाप्रमाणे ॥४४॥

अखेरचे दर्शन । अवघ्यांनी घेतले जाण ।

’जय स्वामी गजानन’ । औइसे मुखे बोलोनी ॥४५॥

मीठ अर्गजा अबीर । यांनी ती भरली गार ।

शिळा लावूनी केले द्वार । बंद भक्तांनी शेवटी ॥४६॥

दहा दिवसपर्यंत । समाराधना चालली तेथ ।

घेऊनी गेले असंख्यात । लोक स्वामींच्या प्रसादा ॥४७॥

खरोखरीच संतांचा । अधिकार तो थोर साचा ।

सार्वभौम राजाचा । पाड नाही त्यांच्या पुढे ॥४८॥

स्वस्ती श्रीदासगणूविरचित । हा गजाननविजय नामे ग्रंथ ।

भाविका दावो सत्पथ । भक्ती हरीची करावया ॥३४९॥

शुभं भवतु ॥ श्रीहरिहरार्पणमस्तु ॥

॥ इति एकोनविंशोऽध्यायः समाप्तः ॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel