राजयोग

बोधिसत्त्व केवळ हठयोग आणि तपश्चर्या यांच्यामध्येच आपला सर्व काळ कंठीत होता असें नाही.  तसें कारणें कोणत्याही तपस्व्यांना शक्य नव्हतें.  मधून मधून त्यांना चांगलें अन्न खावें लागत असे.  शरीरांत थोडें बळ आलें म्हणजे पुन्हा ते उपोषणादिकांच्या योगाने देहदंडन करीत.  सात वर्षांच्या कालांत बोधिसत्त्व प्राधान्येंकरून तपश्चर्या आचरीत असला, तरी मधून मधून चांगलें अन्न सेवन करीत होता, आणि शांत समाधीही अनुभवीत होता, यांत शंका नाही.  हठयोग सोडून आपण आनापानस्मृतिसमाधीची भावना कशी करीत होतों, हें भगवान बुद्धाने आनापानसंयुत्ताच्या पहिल्या वग्गवाच्या आठव्या सुत्तांत सांगितलें आहे.

भगवान् म्हणतो :-''भिक्षुहो, आनापानस्मृतिसमाधीची भावना केली असतां मोठा फायदा होतो.  तिची कशा रीतीने भावना केली असतां मोठा फायदा होतो ?  एखादा भिक्षु अरण्यांत झाडाखाली किंवा दुसर्‍या एकांत जागीं आसनमांडी घालून बसतो.  तो दीर्घ आश्वास घेत असला, तर दीर्घ आश्वास घेत आहे, असें जाणतो; दीर्घ प्रश्वास सोडीत असला तर, दीर्घ प्रश्वास सोडीत आहे, असें जाणतो; र्‍हस्व आश्वास घेत असला, इत्यादि.* ......... याप्रमाणें आनापानस्मृतिसमाधीची भावना केली असतां मोठा फायदा होतो.  भिक्षुहो, मी देखील संबोधिज्ञान होण्यापूर्वी, बोधिसत्त्वावस्थेंत असतांना बहुधा हीच भावना करीत होतों.  त्यामुळे माझ्या शरीराला आणि डोळ्यांना त्रास होत नसे, आणि माझें चित्त पापविचारांपासून मुक्त होत असे.''
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
*  विशेष माहितीसाठी, समाधिमार्ग पृ. ३८-४८ पहा.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
यावरून स्पष्ट दिसून येईल की, बोधिसत्त्व सदोदित हठयोग आचरीत नव्हता.  मधून मधून ह्या शांत राजयोगाचा तो अभ्यास करी व त्यायागें त्याला समाधान मिळत असे.

ध्यानमार्गाचा अवलंब


अशा रीतीने उपोषणें आणि आहार घेणें, हठयोग आणि राजयोग यांच्यामध्ये हेलकावे खात खात अखेरीस बोधिसत्त्वाच्या मनाचा एकाएकी असा निश्चय झाला की, तपश्चर्या निखालस निरर्थक आहे; तिच्यावाचून मुक्ति मिळणें शक्य आहे.  म्हणून ती सोडून त्याने पुन्हा पूर्णपणें ध्यानमार्गाचें कसें अवलंबन केलें, याचें थोडक्यांत वर्णन महासच्चक सुत्तांत केलें आहे.

भगवान सच्चकाला म्हणतो, ''हे अग्गिवेस्सन, माझ्या शाक्य पित्याच्या शेतावर काम चाललें असतां जंबुवृक्षाच्या शीतल छायेंत बसून प्रथमतध्यान प्राप्‍त करून घेतल्याची मला आठवण झाली, आणि त्या आठवणीला अनुसरून माझी समजूत झाली की, हाच बोधाचा मार्ग असला पाहिजे.  आणि जें सुख चैनीच्या पदार्थांच्या उपभोगावाचून आणि अकुशल विचारांपासून लाभतें, त्या सुखाला मी कां भ्यावें ?  असा माझ्या मनांत विचार आला, आणि त्यानंतर या सुखाला मी भिणार नाही, असा मी निश्चय केला.  परंतु तें सुख अत्यंत कृश झालेल्या देहाने मिळणारें नव्हतें.  म्हणून थोडा थोडा आहार खाण्याचा विचार करून मी त्याप्रमाणें वागूं लागलों.  त्या वेळीं पांच भिक्षु माझी सेवा करीत होते.  कां की, मला ज्या धर्माचा बोध होईल तो धर्म त्यांना शिकवीन, असें त्यांस वाटे.  परंतु जेव्हा मी अन्न खाऊं लागलों (तपश्चर्या सोडून दिली), तेव्हा, 'हा गोतम तपश्चर्येपासून भ्रष्ट होऊन खाण्यापिण्याकडे वळला,' असें वाटून ते पांच भिक्षु मला कंटाळून निघून गेले.''

तथापि बोधिसत्त्वाचा निश्चय ढळला नाही.  तपश्चर्येचा मार्ग सोडून साध्या ध्यानमार्गानेच तत्त्वबोध करून घेतला पाहिजे, याबद्दल त्याची खात्री झाली.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel