रेल्वे अपघात व्हायच्या आधी चाकाखाली लिंबू ठेवायचं राहून गेलं

वाचली असती लोकं कदाचित त्या अपघाताच्या कचाट्यातून


बलात्कार होणा-या स्त्रीच्या काखोटीला एखादं 

लिंबू बांधायचं राहून गेलं 

वाचली असती बिचारी त्या वासनांध नजरेतून


पुरात वाहून जाणा-या संसारात, एखाद्या टोपलीत

लिंबू ठेवायचं राहून गेलं, 

वाचली असती बिचारी त्या महापुराच्या विळख्यातून


असंच ठेवलं असतं लिंबू दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी अन् गौरी लंकेश ने आपआपल्या बुडाखाली

तर वाचले असते कदाचित धर्मांधांच्या गोळीतून

पण पुरोगामी विचारांच्या धुंदीत त्यांचं लिंबू ठेवायचं राहून गेलं


तसं ते राहिलं होतं ठेवायचं रथाखाली रावणाच्या अन् कर्णाच्याही

पृथ्वीराज चौहान अन् शंभूराजेही विसरले ठेवायला त्याला घोड्यांच्या टाचेखाली स्वारीला निघताना

उगी गर्व केला त्यांनी हातातील ताकदीवर आणि स्वत:च्या बुद्धीवर 

एका लिंबानी शत्रूची त्रेधातिरपीट उडत असतांना


त्या झाडांनीही ठेवायला हवं होतं ज्यांची रातोरात कत्तल झाली

अन् त्या निष्पाप जीवांनीही ज्यांची दिवसाढवळ्या हत्या झाली


आता मटनासोबत लिंबूही विकत न्या म्हणावं गो रक्षकांना दाखवायला

असावं सोबत एखादं

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel