त्यांना डॉ.जॉन्सन याप्रमाणें जगाचें, जगांतील लोकांच्या मनोवृत्तीचें ज्ञान नीट झालें नाही. डॉ.जॉन्सन लोकांवर प्रथम असाच संतापे. परंतु तो पुढें कमी संतापूं लागला; कारण तो म्हणतो. 'जगापासून मी अपेक्षाच थोडी करितों-त्यामुळें आतां जग मला चांगलें दिसूं लागलें आहे' जॉन्सरला मनुष्य स्वभाव कळला. मनुष्य हा जात्याच आळशी सुखलोलुप आहे. राजवाडे यांस हा लोकांचा स्वभाव कळला असेल: परंतु तो कळून जॉन्सनप्रमाणें ते संतुष्ट न होतां उलट जळफळत. लोकांचा त्यांस तिरस्कार वाटे. गुलामगिरीमध्येंच गौरव मानूं पाहणारे आपले भाईबंद पाहिले म्हणजे त्यांच्या स्वाभिमानी मनाचा भडक होई. यामुळें ही सर्व मंडळें स्थापूनही कार्य करावयास लोक तयार नाहीत हें पाहून ते पुनरपि एकाकीच काम करूं लागले.

मंडळें जमवूनच सर्व काम होईल असें त्यांस वाटत नव्हतें. मंडळें निर्माण करून कांही मंडळी कार्यार्थ तयार करणें म्हणजे निम्में काम झालें असें ते म्हणत. ते लिहितात 'संशोधनार्थ विद्वान निर्माण करणें आणि त्यांची सहानुभाविकांची मंडळें स्थापण्याचें कार्य थोडें फार झाले आहे. परंतु एवढयाने संपत नाही. देशांत संशोधक मंडळें व संशोधक यांची संख्या वाढली म्हणजे पन्नास हिस्से फत्ते झाली. बाकी राहिलेली पन्नास हिस्से फत्ते एका बाबीवर अवलंबून आहे. ती बाब म्हणजे द्रव्यबल, द्रव्यबलासाठीं देशांत मायेचें व जिव्हाळयाचें Home-rule स्वराज्य होण्याची आवश्यकता नितांत भासमान होते.' स्वतंत्र देशांत निरनिराळया संशोधकांस व संशोधक मंडळास केवढा सरकारी पाठिंबा असतो हें पाहून राजवाडे यांचा जीव तुटे. आपल्या देशांतील सरकार तर बोलून चालून परकी. विद्येच्या अभिवृध्यर्थ, शास्त्र प्रसारार्थ तें जनतेस कसें साहाय्य करणार ? परंतु सरकारनें कानावर हात ठेविले.

देशांतील लोकांनी या शास्त्रसंवर्धनाच्या कार्यास हातभार नको का लावावयास ? राजवाडे संतापून लिहितात 'विद्या वृध्दर्थ द्रव्य कां, कसें व कोठें खर्चावें हें समजण्याची अक्कल अद्याप लोकांना, राजांना, परिषदांना व सभांना फुटावयाची आहे. कबुतरें, वारवनिता, पेहेलवान, तमाशेवाले यांची पारख धनिकांना होऊं शकते. विद्वान्, संशोधक व विचारद्रष्टे यांना ओळखण्याची इंद्रिये अद्याप राजांना व परिषदांना आलेली नाहीत. ती आली म्हणजे वागीश्वरांची ओळख धनेश्वरांना पटून शास्त्रे, कला, ज्ञानप्रसार व विदग्ध वाड्.मय यांनी भूमि फुलून जाईल.' आपल्याकडील धनिक वर्ग देशकार्यास व शास्त्रकार्यास मदत करीत नाहीत याचें त्यांस आश्चर्य वाटे. लोक नाटकें, तमाशे व सिनेमा यांस पैसे खर्चतात, परंतु या देशकार्यार्थच त्यांस उदासिनता कां येतें ? राजवाडे म्हणतात 'दुष्काळानें व महर्गतेनें पोटभर अन्न न मिळालें तरी चालेल; परंतु भांडी विकून व बायको गहाण ठेवून नाटकें पाहाणारे कारागीर ज्या देशांत फार झाले तो देश पक्का वेडा बनला असला पाहिजे, यांत बिलकूल संशय नाही. दहा वर्षांच्या खटपटीनें पैसा फंडाचें महाराष्ट्रांत आठ हजार मिनतवारीनें जमतात; एकटया मुंबईतील सर्व नाटक कंपन्यांचें आठवडयाचें उत्पन्न वीस हजारावर आहे ! (विश्ववृत्त सप्टेंबर १९०७)' राजवाडे यांना लोकांच्या या कर्तव्याच्या विस्मृतीची चीड येई. त्यांचा स्वत:चा जीव भारतवर्ष प्राचीन वैभवानें पुनरपि विलसूं लागेल त्याच्यासाठी तळमळत होता. इंग्रज सरकारास घालवून देऊन देश देहानें, मनानें, बुध्दीनें स्वतंत्र कसा होईल याचीच तळमळ त्यांस लागून राहिली होती. 'हिंदुस्थानांतून इंग्लिशांस घालवून देणें हेंच सुशिक्षित हिंदवासीयांचे आद्य कर्तव्य होय.' असें त्यांनी स्पष्टपणें एके ठिकाणी लिहिलें आहे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel