समर्थ आहे भारतभूमी, समर्थ सेनादळे

’सदैव असतो जय सत्याचा’ इतुके आम्हां कळे

लोकशाहिचे सदा समर्थक, आम्ही भारतवासी

शांतिप्रिय जन, स्नेह आमुचा सार्‍या जगताशी

हुकुमशाहिशी मात्र मित्रता मुळी न आम्हां जुळे

स्वातंत्र्यास्तव लढती, त्यांचे आम्ही पाठीराखे

चळे न अमुची निष्‍ठा, अरिच्या शस्‍त्राच्या धाके

अन्यायाची उखडून काढू, छाया, पाळे-मुळे

नसे कुणाशी वैर आमुचे, नको दुजी भूमी

तत्‍त्‍वासाठी साहाय्य होतो, दुबळ्यांच्या कामी

निरापराध्या होता पीडा, हृदय आमुचे जळे

विजयी सेना, विजयी जनता, विजयी जननेते

तरी न आम्ही, कधी आक्रमक कोणाचे जेते

समान सारे देश आम्हांला, सारी मानवकुळे

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel