१८९५
"प्रापंचिक माणसाने घरातले सर्व देऊन टाकू नये, परंतु प्रसंग आला तर सर्व
देण्याची तयारी पाहिजे. थोर मनाच्या माणसालाच खरा परमार्थ साधतो."
श्रींचा व्याप झपाटयाने वाढत होता, त्यामुळे दर्शनाला येणार्‍या मंडळींची संख्या खूप वाढू लागली. बाहेर गावाहून येणार्‍या मंडळींना श्री आपण होऊन बरेच दिवस ठेवून घेत, त्यामुळे थोरले राममंदिर अपुरे पडू लागले. म्हणून श्रींनी धाकटे राममंदिर बांधले आणि विशेषतः सहकुटुंब येणार्‍या भक्तमंडळींना उतरण्यास व सामान ठेवण्यास सोयीचे व्हावे म्हणून काही खोल्यादेखील बांधल्या. आपले कुलोपाध्याय चिंतुबुवा यांना गोंदवल्यास आणून राहायला जागा दिली आणि एक शेत पण दिले. धाकटे राममंदिर बांगले त्यावेळी श्रींनी एक गायत्रीपुरश्चरण व रुद्रस्वाहाकार करविला. निरनिराळ्या ठिकाणचे वैदिक विप्र बोलावून त्यांच्याकडून सर्व वैदिक कर्मे यथासांग पार पाडली. सर्वांना भरपूर अन्न, वस्त्र व दक्षिणा देऊन त्यांना यथेचित गौरव केला. आठ दिवस अन्नछत्र ठेवून गोंदवल्यातील व आजुबाजूच्या गावातील लोकांना पोटभर जेवायला घालून तृप्त केले. श्रींनी घरच्या शेतीची वाढ केली. जुनी जमीन साफ करून खत घालून तयार केली. नवीन विहीर बांधली. नवीन जमीन विकत घेतली आणि ती सर्व रामाच्या खर्चाला लावून दिली. या काळात पुष्कळ वेळा श्री स्वतः नांगर हाकणे, जमीन उकरणे, खडे गोटे काढणे, हरळी उपटणे इत्यादि कामे करीत. त्यामुळे बरोबरीच्या मंडळींना - श्रीमंत व शहरी लोकांनाही त्यांच्यासारखे काम करावे लागे. जेवायला रोजबाजरीची भाकरी व तिखट आमटी असायची. कधीकधी कडधान्याची उसळ जोडीला असे. भात फक्त सणावारी मिळायचा. श्रींच्या प्रेमासाठी लहान-मोठे, श्रीमंत-गरीब, विद्धान-अडाणी, स्त्री-पुरुष सर्वजण मोठया आनंदाने कष्ट करीत. जे मिळेत ते आनंदाने खाऊन पुष्कळ दिवस गोंदवल्यास मुक्काम करीत. एकदा मंडळींबरोबर बोलत बसले असता श्री म्हणाले, "परमार्थ साधण्यासाठी मोठी उदारवृत्ती आवश्यक आहे. जो पंत असेल तोच संत बनेल." हे ऐकून एक जणाने विचारले, "महाराज, असे असेल तर गरीब माणसाला परमार्थ कसा साधेल ?" त्यावर श्री म्हणाले, "कां बरे ? गरीब माणूसही-अगदी भिक्षेकरीसुद्धा पंत असू शकतो." "ते कसे काय ? असे त्यांनी विचारले, त्यावर श्री म्हणाले, "केव्हा तरी सांगेन." त्यानंतर ८/१० दिवस गेले. श्री सकाळी लवकर उठले व मंडळींना म्हणाले, "आजमाझ्या गुरूंची - तुकामाईंची पुण्यतिथी आहे, आपण गावात भिक्षा मागून त्यांना प्रसाद करू." श्रींनी आपल्या हातात झोळी घेतली व भजन करीत आणि श्रीसमर्थांचे मनाचे श्लोक म्हणत, बरोबर ५/१० मंडळींना घेऊन श्री भिक्षेला निघाले. प्रत्येक घरासमोर उभे राहून श्री "जय जय रघुवीर समर्थ " असे म्हणत. प्रत्येक घरातून ओंजळभर किंवा माप भरून धान्य एखादा पैसा किंवा आणा, अशी भिक्षा मिळत गेली. सांपत्तिक स्थिती चांगली असलेल्या श्रींच्या समागमासाठी गोंदवल्यास येऊन राहिलेल्या मंडळींना कोणी रुपया, पाच रुपये, दहा रुपये दिले. एकाने तर शंकर रुपये त्यांच्या झोळीत टाकले. याप्रमाणे भिक्षा मागत असताना दुपारचे बारा वाजले. ओढयाच्या पलीकडे राहणार्‍या एका रामदासी बुवाच्या झोपडीपुढे जाऊन श्रींनी ’जय जय रघुवीर समर्थ ’ अशी गर्जना केली. हा रामदासी ३॥ कोटी जपाचे अनुष्ठान करण्यासाठी येऊन राहिला होता. सकाळपासून बारा वाजेपर्यंत तो आपली उपासना करी. त्यानंतर गावात कोरडी भिक्षा मागण्यासाठी तो जाई. चारच घरी भिक्षा मागून जे पीठ येईल ते ओढयातील पाण्यात कालवून तो खाई आणि पुन्हा जप करीत बसे. श्री त्याच्या झोपडीपुढे गेले तेव्हा तो भिक्षा मागून नुकताच परत आला होता. श्रींचा शब्द ऐकल्याबरोबर हातातला झोळी घेऊनच बाहेर आला व सर्व भिक्षा श्रींच्या झोळीमध्ये ओतली व त्यांना साष्टांग नमस्कार घातला. त्याबरोबर श्री म्हणाले, "हा खरा पंत, याच्याजवळ जेवढे होते ते सर्व त्याने झोळीत टाकले. त्याच्याजवळ काही शिल्लक उरले नाही, त्याला आजपूर्ण उपवास घडणार, हा खरा उदार माणूस. हा भिक्षेकरी असला तरी तो पंत आहे. प्रापंचिक माणसाने घरातले सर्व देऊन टाकू नये ही गोष्ट खरी, परंतु प्रसंग आला तर सर्व देण्याची तयारी पाहिजे हेही खरं. थोर मनाच्या माणसालाच खरा परमार्थ साधतो."

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel