हे जुलूम का केले जातात ?  मनुष्य इतका निर्दय, कठोर कसा होतो ? माझ्याजवळ जे आहे तेच सत्य असल्यामुळे त्याच्या आड जो जो येईल तो उडवलाच पाहिजे, ही आसुरी वृत्ती त्यातून जन्मते. माझ्या सत्याला विरोध करायला कोणी उभा राहता कामा नये, यासाठी सर्वांना दहशत बसवावी असे त्यांना वाटते. नाझी लोकांना वाटे, 'जर्मन वंशच श्रेष्ठ, बाकीचे मानव म्हणजे केरकचरा, त्यांना जाळले काय, छळले काय, काय बिघडले ?' कम्युनिस्टांना वाटते, 'आम्हीच जगाचे उध्दारकर्ते. दुस-यांजवळ सत्य नाही. आमचा मार्ग म्हणजे मानवी सुखाचा, विकासाचा. त्या मार्गात जे जे आड येतील ते वाटेल त्या रीतीने नष्ट करणे हेच योग्य.'  अशा वृत्तीमुळे कम्युनिस्टी छळबुध्दी आणि खुनी वृत्ती जन्मली. संघाच्या लोकांना असेच वाटे. आणि अखेर महात्माजींचा वधही अशाच प्रवृत्तीतून झाला. एकदा ' मीच खरा '  हा अहंकार जडला की त्याच्यामागून अंधता, निर्दयता, सारे काही येते.

जैन हे अहिंसाधर्माचे उपासक. स्याद्वादाचा त्यांचा सिध्दान्त. 'इदमपिस्यात् ' हेही असू शकेल - असे ते म्हणत. स्वत:चे मत मांडतांना, त्याची सत्यता स्थापतांना दुसरीही बाजू असू शकेल, अशी अनाग्रही वृत्ती या स्वाद्वादात आहे. स्याद्वाद म्हणजे संशयात्मा नव्हे. मला या क्षणी जे सत्य वाटते ते मी घेऊन जावे ;परंतु त्याला विरोध करणा-यांची मी चटणी नाही उडवता कामा. कारण कदाचित् उद्या मला सत्य वाटणारी गोष्ट चुकीची ठरू शकेल. अशी वृत्ती समाजात राहील तर समाजात अहिंसा राहील. हिंदुस्थानात नाना दर्शने, नाना तत्त्वज्ञाने जन्मली ; परंतु कोणी कोणाला छळले नाही. जाळले नाही. पोळले नाही. चार्वाकवादी आपले मत मांडत आहेत. अद्वैती आपले तत्त्वज्ञान मांडत आहेत. आपापली मते मांडा. जनतेला जे पटेल ते जनता घेईल. अशानेच सत्याची पूजा होईल. सत्य का तलवारीने शिकावयाचे असते ? जेथे संकुचितपणा असेल तेथून सत्य निघून जाते. अहंकाराजवळ कोठले सत्य ?महात्माजी नेहमी म्हणत 'मला पटवा. माझी चूक दिसली तर मी निराळा मार्ग घेईन.'  ते स्वत:च्या श्रध्देने जात होते. ती श्रध्दा अचल होती, परंतु सदैव नवीन घ्यायला ते सिध्द असत.

श्रीकृष्णमूर्ती एकदा म्हणाले, 'ट्रूथ कॅन नेव्हर बी ऑर्गनाइजड- सत्याची संघटना नाही करता येत.'  विनोबाजी हेच म्हणाले होते. तुरुंगातून सुटून आल्यावर ते महात्माजींना म्हणाले 'मला कोठे अध्यक्ष चिटणीस नका नेमू. हे घ्या राजीनामे.'

महात्माजींनी विचारले, 'परंतु काम करणार
आहेस ना ?'
ते म्हणाले, 'हो.'
महात्माजी म्हणाले, ' मग दे तुझे राजीनामे.'

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel