याप्रमाणे बोधिसत्त्वाच्या प्रव्रज्येला साधारणपणे तीन कारणे दिली आहेत. (१) आपल्या आप्तांनी परस्परांशी लढण्यासाठी शस्त्र धारण केल्यामुळे त्याला भय वाटले, (२) घर अडचणीची व कचर्‍याची जागा आहे असे वाटले आणि (३) आपण जन्म, जरा, मरण, व्याधि यांनी सबंद्ध असता अशाच प्रकारच्या वस्तूंवर आसक्त होऊन राहता कामा नये असे वाटले. या तीन्ही कारणांची संगति लावता येणे शक्य आहे.

बोधिसत्त्वाचे जातभाई शाक्य व कोलिय यांच्यामध्ये तंटे बखेडे उत्पन्न झाले आणि त्या प्रसंगी त्यात आपण शिरावे की नाही हा बोधिसत्त्वाला प्रश्न पडला. मारामारीने हे खटले मिटणार नाहीत हे त्याने जाणले. पण त्यात जर आपण शिरलो नाही तर लोक आपणाला भित्रा म्हणतील व गृहस्थाचा धर्म पाळला नाही असे होईल. अर्थात गृहस्थाश्रम त्याला अडचणीची जागा भासू लागली. त्यापेक्षा संन्यासी होऊन निरपेक्षपणे रानवनात हिंडत राहणे काय वाईट होते. परंतु त्याचे आपल्या पत्नीवर आणि मुलावर प्रेम असल्यामुळे गृहत्याग करणे फार कठीण होते. तेव्हा त्याला आणखीही काही विचार करावा लागला. मी स्वत: जाति-जरा-व्याधि-मरणधर्मी असता अशाच स्वभावाने बद्ध झालेले जे पुत्रदारादिक त्यांच्यावर आसक्त होऊन ह्या अडचणीच्या आणि कचर्‍याच्या गृहस्थाश्रमात पडून राहणे योग्य नाही असे त्याला वाटले. आणि म्हणून तो परिव्राजक झाला. या तीन्ही कारणात मुख्य कारण म्हटले म्हणजे शाक्यांच्या आणि कोलियांच्या मारामार्‍या होत हे लक्षात ठेवले असता बोधिसत्त्वाने पुढे बुद्ध होऊन शोधून काढलेल्या मध्यम मार्गीचा अर्थ बरोबर समजेल.

राहुल कुमार


बोधिसत्त्वाचे लग्न तरुणपणी होऊन गृहत्याग करण्यापूर्वी त्याला राहुल नावाचा मुलगा झाला. याला त्रिपिटकात अनेक ठिकाणी आधार सापडतात. जातकाच्या निदानकथेत राहुल कुमार ज्या दिवशी जन्मला त्याच रात्री बोधिसत्त्वाने गृहत्याग केला असे म्हटले आहे. पण दुसर्‍या अट्ठकथकारांचे म्हणणे असे दिसते की, राहुल कुमार जन्मल्यानंतर सातव्या दिवशी बोधिसत्त्वाने गृहत्याग केला. या दोन्ही विधानांना आधार प्राचीन वाङमयात सापडत नाही. एवढे खास की, बोधिसत्त्वाने गृहत्याग करण्यापूर्वी त्याला राहुल नावाचा एक मुलगा होता. गोतम बोधिसत्त्व बुद्ध होऊन कपिलवस्तूला आला आणि त्याप्रसंगी त्याने राहुलाला दीक्षा दिली, अशी वर्णने महावग्गात व इतर ठिकाणी सापडतात. त्या वेळी राहुल सात वर्षांचा होता, असे अट्ठकथांत अनेक ठिकाणी म्हटले आहे. राहुलला भगवंताने श्रामणेर केले की काय आणि तो त्या वेळी किती वर्षांचा असावा याचा विचार सहाव्या प्रकरणात करण्यात येईल. का की, श्रामणेराचा संबंध भिक्षुसंघाशी येतो.

राहुलमाता देवी

राहुलच्या आईला महावग्गात आणि जातकअट्ठकथेत सर्वत्र ‘राहुलमाता देवी’ म्हटले आहे. यसोधरा (यशोधरा) हे तिचे नाव फक्त अपदान ग्रंथात सापडते. जातकाच्या निदानकथेत म्हटले आहे की, “ज्या वेळी आमचा बोधिसत्त्व लुम्बिनी वनात जन्मला त्याच वेळी राहुलमाता देवी, छन्न अमात्य, काळुदायि (काळा उदायि) अमात्य, कंथक अश्वराजा (बुद्धगयेचा), महाबोधि वृक्ष आणि चार निधिकुंभी (द्रव्याने भरलेले रांजण) उत्पन्न झाले.” यात बोधिवृक्ष आणि ठेव्याचे रांजण त्याच वेळी उत्पन्न झाले, ही शुद्ध दन्तकथा समजली पाहिजे. पण बोधिसत्त्व, राहुलमाता, छन्न आणि कळा उदायि ही एकाच वेळी जन्मली नसली तरी समवयस्क होती असे मानण्याला हरकत नाही. राहुलमातेचे देहवसान ७८ व्या वर्षी म्हणजे बुद्धाच्या परिनिर्वाणापूर्वी दोन वर्षे झाले असावे. अपदानात (५८४) ती म्हणते,

अट्ठसत्ततिवस्साहं पच्छिमो वत्तत्ति भवो।
.... .... ....
पहाय वो गमिस्सामि कतम्मे सरणमत्तनो।।


‘मी आज ७८ वर्षांची आहे, हा माझा शेवटचा जन्म. तुम्हाला मी सोडून जाणार. माझी मुक्ति मी संपादिली आहे.’

या शेवटल्या जन्मी आपण शाक्य कुलात जन्मलो असेही ती म्हणते. परंतु त्या कुलाची माहिती कोठेच सापडली नाही. ती भिक्षुणी होऊन राहिली आणि ७८ व्या वर्षी बुद्धाजवळ जाऊन तिने वर दिल्याप्रमाणे भाषण केले, असे अपदानकाराचे म्हणणे दिसते. पण भिक्षुणी झाल्यावर तिने कोणताही उपदेश केल्याचे किंवा तिचा कशाही प्रकारे बौद्धसंघाशी संबंध आल्याचे आढळून येत नाही. तेव्हा ती खरोखरच भुक्षुणी झाली की नाही हे निश्चयाने सांगता येणे कठीण आहे. अपदान ग्रंथात तिचे नाव यशोधरा आणि ललितविस्तरात गोपा असे आले आहे. तेव्हा यापैकी खरे नाव कोणते, किंवा ही दोन्ही तिची नावे होती हे समजत नाही.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel